लोकमान्य टिळक जन्मभूमीचे  संवर्धन करा !

  • अधिवक्ता धनंजय भावे यांची पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे मागणी

  • लोकमान्य टिळक जन्मभूमीचे लोखंडी गेट आणि सुरक्षा जाळीची झाली चोरी

लोकमान्य टिळक जन्मभूमी

रत्नागिरी – लोकमान्य टिळक जन्मभूमीच्या मागील भागाकडील लोखंडी गेट आणि पुढील भागातील लोखंडी सुरक्षा जाळीचा एक भाग चोरून नेला आहे. या दोन्ही गोष्टींची दुरुस्ती तातडीने होणे आवश्यक आहे. वर्ष ‘२००६’ मध्ये लावलेले चांगले भित्तीचित्र (म्युरल) केव्हाच पडून दुभंगले आहे, त्याची दुरुस्ती करण्यात यावी आणि ते मूळ जागी लावण्यात यावे. या परिसरात ‘सीसीटीव्ही’ लावण्याची व्यवस्था करण्यात यावी आणि अन्य मागण्या यांविषयी येथील अधिवक्ता धनंजय भावे यांनी एका निवेदन पालकमंत्री उदय सामंत यांना दिले आहे.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जन्मभूमीमधील सुशोभिकरणाचा भूमीपूजन समारंभाच्या अनुषंगाने अधिवक्ता भावे यांनी पालकमंत्री सामंत यांना निवेदन दिले.

या निवेदनात म्हटले आहे की,

१. मी येथील सुविधांविषयी सुमारे ३ वर्षे सातत्याने निवेदन, समाजमाध्यमांवर लिखाण करत आहे. त्यावर आता कार्यवाही होत असल्याविषयी आनंद वाटतो.

२. टिळक जन्मभूमीविषयीची तातडीने कार्यवाही झाल्यास लाखो पर्यटकांना चांगली वास्तू जतन केल्याचा आणि ती पहायला मिळाल्याचा आनंद नक्कीच मिळेल.

३. टिळक जन्मभूमीमध्ये तातडीने एक अतिरिक्त पहारेकरी नेमावा.

४. पर्यटक आणि नागरिकांना टिळक जन्मभूमी पहाण्यासाठीची वेळ १ एप्रिल ते १५ जून तसेच दिवाळी, नोव्हेंबर-डिसेंबर महिन्याच्या कालावधीमध्ये सकाळी ९ ते सायं. ६ पर्यंत ठेवण्यात यावी. सध्या सकाळी १० ची वेळ असल्यामुळे अनेक पर्यटक बाहेरूनच परत जातात.

५. संध्याकाळी स्वच्छतागृहांची स्वच्छता करण्यात यावी. पर्यटकांसाठी पिण्याच्या पाण्याची योग्य सोय करण्यात यावी.

लोकमान्य टिळक यांचे जन्मस्थान ‘राष्ट्रीय स्मारक’ घोषित करण्याची हिंदु जनजागृती समितीनेही केली होती मागणी !

लोकमान्य टिळक यांच्या रत्नागिरीतील टिळक आळी येथील जन्मस्थानाची दुरवस्था झाली आहे.

पुरातत्व विभागाने या दुरवस्थेकडे तात्काळ लक्ष देऊन लोकमान्य टिळक यांचे जन्मस्थान ‘राष्ट्रीय स्मारक’ घोषित करावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, कोकण प्रांत आणि गुजरात राज्य समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी २० नोव्हेंबर २०२१ या दिवशी समितीच्या पत्रकार परिषदेत केली होती.

हे पहा –
‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे’, असे ठणकावणार्‍या लोकमान्य टिळक यांचे रत्नागिरीतील जन्मस्थान दुरवस्थेत !
https://sanatanprabhat.org/marathi/529131.html

संपादकीय भूमिका

अशी मागणी का करावी लागते, खरे तर शासनानेच देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःचे आयुष्य वेचणार्‍या क्रांतीकारकांच्या जन्मस्थानांचे संवर्धन करायला हवे !