जैन समाजाची समाजाप्रती लोककल्याणकारी भावना आहे ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

योगगुरु बाबा रामदेव, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, ११ मार्च (वार्ता.) – जैन समाज हा दुसर्‍यांच्या सुख दुःखात साथ देणारा समाज आहे. जैन समाजाने संकटप्रसंगी देशाला भरभरून साहाय्य केले आहे. समाजाप्रती त्यांची लोककल्याणकारी भावना सर्वांना ठाऊक आहे, असे गौरवोद्गाार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे काढले.

राष्ट्रसंत प.पू. श्री नयपद्मसागर सुरीश्वरजी महाराज यांना ‘आचार्य पद’ प्रदान महा-महोत्सव कार्यक्रम ११ मार्च या दिवशी मुंबई येथील महालक्ष्मी रेसकोर्स येथे झाला. त्या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, योगगुरु बाबा रामदेव, तसेच देश-विदेशांतील संत आणि जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, राज्यशासनाने नुकताच राज्याचा अर्थसंकल्प घोषित केला असून यात सर्व लोकांची प्रगती आणि उन्नती यांचा विचार करण्यात आला आहे. त्याचसमवेत या अर्थसंकल्पात गो-सेवा आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. राष्ट्रसंत नयपद्मसागरजी आणि प्रशांतसागरजी यांना आचार्य पदवी मिळाल्याविषयी मुख्यमंत्री शिंदे यांनी महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्यांचे अभिनंदन केले.

जैन समाजाची आचार्य पदवी ही तपश्चर्या ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आज राष्ट्रसंत नयपद्मसागर यांना प्रदान करण्यात आलेली आचार्य ही पदवी असली, तरी हे पद तपश्चर्या आहे. आचार्य बनण्यासाठी तप करावे लागते. या पदावर पोचल्यानंतर कोटी कोटी जनतेच्या विधायक आशा-आकांक्षा यांना आशीर्वाद द्यावा लागतो. हे काम अविरतपणे चालू रहाणारे आहे.

राष्ट्रसंत नयपद्मसागर केवळ संत नसून एक विचार आहेत. ते समाजाला संघटित करून पुढे नेत आहेत. ते धर्मासमवेतच लोकांना राष्ट्रभक्तीचीही शिकवण देत आहेत. समाजातील सर्व लोकांना योग्य वाटेने जाण्याचे मार्गदर्शन राष्ट्रसंत नयपद्मसागरजी यांच्याकडून मिळेल. या वेळी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री लोढा आणि योगगुरु रामदेव यांच्या हस्ते महान मंगल ग्रंथाचे विमोचन करण्यात आले.