कोकणातील लोककलेला राजाश्रय हवा !

आमदार शेखर निकम यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान झळकावले फलक

आमदार शेखर निकम अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान फलक झळकावतांना

मुंबई – कोकणातील लोककलेला राजाश्रय हवा. यासाठी शासकीय पातळीवर सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. कोकणातील खेळे/नमन, जाखडी या लोककलांना अनुदान आणि कलाकार यांना मानधन मिळाले पाहिजे, या मागणीसाठी चालू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शेखर निकम यांनी फलक झळकावून या समस्येकडे सरकारचे लक्ष वेधले.

कोकणातील नमनाचा खेळ

कोकणच्या कलावंतांनी स्वत:च्या कलेतून जतन केलेल्या लोककला आजही रसिकांच्या मनात कायम आहेत; मात्र या लोककलांना अजूनही राजाश्रय मिळालेला नाही.

फेब्रुवारी मासाच्या पहिल्या आठवड्यात लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या अरविंद जाधव अपरांत संशोधन केंद्राच्या वतीने पर्यटन लोककला सांस्कृतिक आणि कोकणी खाद्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ज्येष्ठ साहित्यिक लेखक प्रकाश देशपांडे आणि रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. तानाजीराव चोरगे यांनी लोककलेला राजाश्रय मिळावा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती; मात्र अद्यापही शासनाने या मागणीकडे लक्ष दिलेले नाही. शिंदे-फडणवीस सरकारने या लोककलांना राजाश्रय मिळवून दिला, तर खर्‍या अर्थाने लोककलावंतांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.