उत्तरप्रदेश विधानसभेने ६ पोलिसांना सुनावली १ दिवसाच्या कारावासाची शिक्षा !

१९ वर्षांपूर्वी घडलेले विशेषाधिकार भंगाचे प्रकरण

पोलीस

लक्ष्मणपुरी – उत्तरप्रदेशच्या विधानसभेत भाजपचे तत्कालीन आमदार सलील बिश्‍नोई यांनी १९ वर्षांपूर्वी आमदाराचा विशेषाधिकार भंग झाल्याच्या प्रकरणी तक्रार केली होती. त्याच्यावर सुनावणी होऊन या प्रकरणी आमदाराशी असभ्य वर्तन करणार्‍या ६ पोलिसांना एका दिवसाच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.

अ. १५ सप्टेंबर २००४ या दिवशी कानपूर येथे वारंवार वीज खंडित होत असल्याच्या प्रकरणात जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यासाठी आमदार बिश्‍नोई एका शिष्टमंडळासह जिल्हाधिकारी कार्यालयात निघाले होते.

आ. वाटेत त्यांना पोलिसांनी रोखले आणि त्यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. त्या वेळी पोलिसांनी बिश्‍नोई यांना शिवीगाळ करत मारहाण केली. या प्रकरणी बिश्‍नोई यांनी आमदाराच्या विशेषाधिकाराचा भंग झाल्याच्या प्रकरणात ऑक्टोबर २००४ मध्ये विधानसभेच्या तत्कालीन अध्यक्षांकडे याविषयी तक्रार केली होती. त्या वेळी हे प्रकरण विधानसभेच्या विशेषाधिकार समितीकडे सोपवण्यात आले होते.

इ. २७ जुलै २००५ मध्ये विशेषाधिकार समितीने आमदाराचा अवमान झाल्याच्या प्रकरणी तत्कालीन पोलीस अधिकारी अब्दुल समद यांना कारावासाची शिक्षा देण्याचा, तर श्रीकांत शुक्ला, उपनिरीक्षक त्रिलोकी सिंह, हवालदार छोटे सिंह, विनोद मिश्रा आणि मेहरबान सिंह यांंना विधानसभेच्या सभागृहात बोलावून चेतावणी देण्याचा ठराव केला होता. त्या वेळी हे प्रकरण काही कारणास्तव पुढे जाऊ शकले नव्हते. (हे प्रकरण पुढे का जाऊ शकले नाही, याची माहिती सामान्य जनतेला मिळायला हवी ! – संपादक)

ई. आता त्याच प्रकरणात संबंधितांना १ दिवसाच्या कारावासाची शिक्षा देण्यात आली आहे.