उच्च कोटीचे संत असूनही सहजावस्थेत असलेले परात्पर गुरु परशुराम पांडे महाराज आणि तळमळीने साधकांकडून साधना करून घेणार्‍या सनातनच्या ६९ व्या संत पू. (सौ.) अश्विनी पवार !

‘एकदा आम्ही (मी आणि पू. (सौ.) अश्विनी पवार) आम्हाला लाभलेल्या परात्पर गुरु पांडे महाराज (प.पू. बाबा) यांच्या सत्संगाविषयी बोलत होतो. तेव्हा माझ्या लक्षात आलेल्या ‘परात्पर गुरु पांडे महाराज आणि पू. (सौ.) अश्विनी पवार’ यांच्यामधील दैवी गुणांविषयी पुढे दिले आहे.

आज परात्पर गुरु पांडे महाराज यांची पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त त्यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून हा लेख प्रसिद्ध करत आहोत.

परात्पर गुरु पांडे महाराज

परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !

१. उच्च कोटीचे संत असूनही शिकण्याच्या स्थितीत असलेले परात्पर गुरु पांडे महाराज !

पू. अश्विनीताईंनी मला सांगितले, ‘‘प.पू. बाबा साधकांना होणार्‍या त्रासांचे निवारण होण्यासाठी आणि समष्टी कार्यातील अडथळे दूर होण्यासाठी नामजपादी उपाय सांगायचे. ते आश्रमातील परिसरात फेर्‍या मारतांना त्यांना लक्षात आलेल्या साधकांच्या चुका सांगायचे. त्यानंतर प.पू. बाबा मला साधनेचा आढावा दिल्याप्रमाणे त्यांनी केलेल्या कृतीविषयी सांगायचे. ते मला विचारायचे, ‘‘मी जे केले, ते योग्य आहे का ?’’ ते मला म्हणायचे, ‘‘साधक त्यांच्या मनातील अनावश्यक आणि नकारात्मक विचार तुला सांगतात अन् स्वतःचे मन रिकामे करतात.’’

२. परात्पर गुरु पांडे महाराज यांच्यामधील दैवी गुण आणि शिकायला मिळालेली सूत्रे

२ अ. साधकांप्रती प्रीती असणे आणि साधकांना हसत खेळत घडवणे

२ अ १. साधकांची आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी प्रयत्नशील असणे : प.पू. बाबा साधकांची आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी सतत तळमळीने प्रयत्न करायचे. ते साधकांना साधनेची तत्त्वे सांगून प्रेरणा देत असत. ते साधकांना त्यांच्याकडून झालेल्या चुका सांगून त्यामध्ये सुधारणा होईपर्यंत पाठपुरावा करायचे. सर्वसाधारणपणे ज्ञानमार्गी संतांचे बोलणे रुक्ष आणि समजायला कठीण असते; परंतु प.पू. बाबा साधकांना सहजतेने अन् हसत खेळत साधना सांगून त्यांच्याकडून साधना करून घेत असत.

२ अ २. वरील सूत्रांतून ‘साधकांनी सहसाधकांशी प्रेमाने वागून त्यांना साधनेत साहाय्य करणे किती आवश्यक आहे ?’, याची मला जाणीव झाली.

२ आ. अहंशून्यता आणि शिकण्याची वृत्ती

२ आ १. उच्च कोटीचे संत असूनही ‘योग्य काय ?’, ते जाणून घेणे : प.पू. बाबा उच्च कोटीचे संत होते. त्यांनी केलेल्या कृतीविषयी त्यांना पू. अश्विनीताईंना आढावा देण्याची काहीच आवश्यकता नव्हती, तरीही ते स्वतःकडून झालेल्या कृतीचा आढावा देत असत आणि ‘योग्य काय ?’, ते जाणून घेत असत.

२ आ २. यातून ‘साधकांनी ‘व्यष्टी साधना आणि समष्टी सेवा’ यांचा आढावा संबंधित उत्तरदायी साधकांना किती गांभीर्याने द्यायला हवा ?’, हे मला शिकायला मिळाले.

३. साधकांना घडवण्याची तळमळ असलेल्या पू. (सौ.) अश्विनी पवार !

पू. (सौ.) अश्विनी पवार

अ. पू. अश्विनीताई त्यांची साधना आणि सेवा म्हणून साधकांमधील स्वभावदोष दूर होण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात.

आ. पू. ताई त्यांच्या संपर्कात येणार्‍या साधकांविषयी कोणताही पूर्वग्रह न ठेवता आणि अपेक्षा न करता साधकांना व्यष्टी अन् समष्टी साधनेत प्रेमाने साहाय्य करतात.

इ. पू. ताई साधकांना त्यांच्यातील गुण-दोषांसह स्वीकारतात. त्या साधकांवर प्रेमाचा वर्षाव करून साधकांना घडवतात.

ई. पू. ताई परात्पर गुरु डॉ. आठवले यांना अपेक्षित अशी, म्हणजेच ईश्वरेच्छेने सेवा करतात.

उ. ‘समुद्र मंथनातून निघालेले हलाहल (विष) भगवान शिवाने पचवले. पू. अश्विनीताई साधकांचे दुर्गुणरूपी विष पचवून आम्हाला चैतन्यरूपी साधनेचे अमृत पाजत आहेत’, याची मला सतत जाणीव होते.

ऊ. ‘पू. अश्विनीताई देवद, पनवेल येथील सनातन आश्रमात नसत्या, तर साधकांमधील स्वभावदोष आणि अहं वाढून त्यांची साधनेत घसरण झाली असती. आश्रमातील पावित्र्य आणि चैतन्य अल्प झाले असते’, असे मला वाटते.

पू. शिवाजी वटकर

या प्रसंगातून मला परात्पर गुरु पांडे महाराज आणि पू. अश्विनीताई यांच्यामधील दैवी गुण शिकायला मिळाले अन् साधना करण्यासाठी प्रेरणा मिळाली. आध्यात्मिक स्तरावर राहून हसत खेळत साधना शिकवणारे धन्य ते परात्पर गुरु पांडे महाराज ! आणि तळमळीने साधकांकडून साधना करून घेणार्‍या धन्य त्या पू. (सौ.) अश्विनी पवार ! ज्यांच्या कृपाशीर्वादाने हे घडत आहे, त्या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या चरणी मी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’

– (पू.) शिवाजी वटकर (वय ७६ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (९.२.२०२३)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक