श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची अमृतवचने

१. एक साधक मनात भजन गुणगुणत असतांना त्याच वेळी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनीही तेच भजन म्हणणे, याविषयी त्यांनी सांगितलेले शास्त्र

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

‘एकदा एक साधक चारचाकीमध्ये श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या समवेत बसला असतांना तो मनात एक भजन गुणगुणत होता. त्याच क्षणी शेजारी बसलेल्या सद्गुरु (सौ.) गाडगीळकाकूही तेच भजन म्हणू लागल्या. हे पाहून तो साधक एकदम आश्चर्याने काकूंकडे पाहून म्हणाला, ‘‘मीही हेच भजन मनामधे गुणगुणत होतो.’’ त्यावर काकू म्हणाल्या, ‘‘संतांचे मन भोवतालच्या हालचालींविषयी सतर्क असते. साधनेमुळे त्यांचे सूक्ष्म मन जागृत झालेले असल्याने कधी कधी ते आजूबाजूच्या स्पंदनांशी एकरूप झाल्याने संतांना सभोवतालच्या घटनांची जाणीव आधीच होते. तसेच हे झाले. साधकाच्या मनात चालू असलेल्या भजनांची स्पंदने म्हणूनच मला ओळखता आली आणि तेच भजन माझ्या ओठांवर आले.’’

२. ईश्वरी ज्ञानाच्या माध्यमातून होणारी साधना

केवळ ज्ञानप्राप्ती करणे; पण त्यानुसार आचरण न करणे, हे अज्ञानासमानच आहे. ‘प्रथम ज्ञानार्जन करणे, त्याप्रमाणे स्वतः आचरण करणे आणि नंतर ते ज्ञान समष्टीला देणे’, ही ईश्वरी ज्ञानाच्या माध्यमातून होणारी साधना आहे.

२ अ. ज्ञानातील चैतन्य योग्य दिशेने कार्य करण्यासाठी ज्ञानार्जनातील ‘श्री गुरूंचा संकल्प’ महत्त्वाचा आहे ! : जे ज्ञान ईश्वरी कृपेने लाभलेले आहे, ज्याचा साक्षात्कार अनुभवातून अन् अनुभूतीतून झालेला आहे, अशा अहंशून्य ज्ञानामध्ये दैवी चैतन्य स्थिर झालेले असते. हे दैवी चैतन्यच पुढे भगवंताच्या रूपाने कार्य करते. ज्ञानातील चैतन्य योग्य दिशेने कार्य करण्यासाठी मुख्यतः ज्ञानार्जनातील ‘श्री गुरूंचा संकल्प’ महत्त्वाचा आहे.

२ आ. ‘ईश्वरी ज्ञाना’ची फलनिष्पत्ती : काळानुसार साधनेसाठी आवश्यक ज्ञान, ज्ञान मिळवणार्‍या साधकाची साधनेची तळमळ आणि त्याची स्वतःची साधना अन् शेवटी साधनेसाठी ज्ञानाचा प्रत्यक्ष लाभ करून घेणार्‍या जिवाची जिज्ञासू वृत्ती या सर्व घटकांवर ईश्वरी ज्ञानाची फलनिष्पत्ती अवलंबून असते.’

– श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ (२९.४.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक