पाकिस्तानने अफगाणिस्तानवर आक्रमण करण्याची चूक करू नये !  

इम्रान खान यांचा पाक सरकारला सल्ला !

इम्रान खान

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकचे गृहमंत्री राणा सनाउल्लाह हे अफगाणिस्तानवर आक्रमण करण्याविषयी वक्तव्य करत आहेत. असे झाले, तर पुन्हा शांतता कायम रहाणार नाही. जर पाकच्या सैन्याने अफगाणिस्तानवर आक्रमण केले, तर युद्ध चालू होईल जे कधीही संपणार नाही. त्यामुळे पाकिस्तानने अफगाणिस्तानवर आक्रमण करण्याची चूक करू नये, असा सल्ला पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी पाक सरकारला दिला. गृहमंत्री सनाउल्लाह यांनी गेल्या आठवड्यात म्हटले होते की, तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान ही आतंकवादी संघटना पाकिस्तानमध्ये आक्रमणे करत आहे. त्यांना अफगाणिस्तानात आश्रय मिळतो. ही आक्रमणे त्वरित थांबली नाहीत, तर आमचे सैन्य अफगाणिस्तानात घुसून आक्रमण करील.

इम्रान खान पुढे म्हणाले की, अफगाणिस्तान हा आपला शेजारी देश आहे. त्यांच्याशी आपले चांगले संबंध असले पाहिजेत. सरकारने जनतेसमोर खोटे बोलणे बंद करून सत्य सांगावे. जरा विचार करा की, अफगाणिस्तानने चर साहाय्य थांबवले, तर काय होईल ? सरकार अफगाणिस्तानला का धमकावत आहे ?, त्यांच्याशी चर्चा का करत नाही ? ‘खैबर पख्तुनख्वामध्ये आमचे सरकार आहे’, असे स्थानिक लोक म्हणतात. पोलीस आतंकवादाविरुद्ध लढू शकतील कि नाही ?, त्यांच्याकडे तर शस्त्रेही नाहीत. अमेरिकेने गेल्या वर्षी १५ ऑगस्टला अफगाणिस्तान सोडले होते. त्यानंतर अफगाणिस्तानात आपली (पाकची)  मुळे घट्ट करण्याची सुवर्णसंधी होती; पण ती आपण गमावली. आज आपल्या देशात अनुमाने ४० सहस्र तालिबानी आतंकवादी आहेत.

संपादकीय भूमिका

इम्रान खान पाक सरकारला अन् त्यांच्या सैन्याला ‘भारतात जिहादी आतंकवादी कारवाया करू नयेत’, असे का सांगत नाही ? स्वतः पंतप्रधान असतांना त्यांनी या कारवाया का थांबवल्या नाहीत ? आता अफगाणिस्तानातील तालिबानी आतंकवादी पाकला ‘जशास तसे’ उत्तर देत असल्यानेच इम्रान खान यांना भीती वाटू लागली आहे आणि त्यामुळेच ते अशा प्रकारचा सल्ला देत आहेत, हे लक्षात येते !