झारखंड सरकारच्या विरोधात आमरण उपोषण करणार्‍या जैन साधूंचा प्राणत्याग !

झारखंडमधील जैन समाजाचे ‘सम्मेद शिखरजी’ हे तीर्थक्षेत्र पर्यटनस्थळ बनवण्याचे प्रकरण

मुनी सुग्यसागर महाराज

रांची (झारखंड) – झारखंडमधील जैन समाजाच्या ‘सम्मेद शिखरजी’ हे तीर्थक्षेत्र वाचवण्यासाठी आमरण उपोषणाला बसलेले मुनी सुग्यसागर महाराज यांनी प्राणत्याग केला. ‘सम्मेद शिखरजी’ला पर्यटनस्थळ बनवण्याच्या झारखंड राज्य सरकारच्या निर्णयाच्या विरोधात २५ डिसेंबर २०२२ पासून ते जयपूरच्या सांगानेर येथील जैन समाज मंदिरात आमरण उपोषण करत होते. उपोषणाच्या दहाव्या दिवशी, म्हणजे ३ जानेवारी २०२२ या दिवशी त्यांनी प्राणत्याग केला. झारखंडमधील गिरिडीह जिल्ह्यातील पारसनाथ टेकडीवर असलेल्या सम्मेद शिखरजीला पर्यटनस्थळ म्हणून घोषित केल्याच्या विरोधात देशभरात निदर्शने चालू आहेत. पारसनाथ टेकडी सम्मेद शिखरजी म्हणून प्रसिद्ध आहे. जगभरातील जैन लोकांचे हे सर्वोच्च तीर्थक्षेत्र आहे.

संपादकीय भूमिका

  • संत-महंतांविषयी संवेदनशून्य असणारी व्यवस्था सामान्य जनतेशी कशा प्रकारे वागत असेल, याचा विचारही न केलेला बरा !
  • यातून झारखंड मुक्ती मोर्चा सरकारची जनताद्रोही आणि असंवेदनशील वृत्ती दिसून येते. आमरण उपोषण करणार्‍या साधूंना प्राणत्याग करण्यास भाग पाडणार्‍या सरकारमधील संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा !