राज्यात तात्काळ लव्ह जिहादविरोधी आणि धर्मांतरबंदी कायदा लागू करा ! – समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी

वर्धा, १७ डिसेंबर (वार्ता.) – हिंदु मुलींना फसवून प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे धर्मपरिवर्तन करणे, त्यांच्याशी ‘निकाह’ करणे, याला नकार दिल्यास बलात्कार करणे, ब्लॅकमेल करणे, हत्या करणे आदी गंभीर प्रकारांची सहस्रो प्रकरणे यापूर्वी उघड झाली आहेत. आपल्या मुली-बाळींना पळवण्यासाठी हे नराधम आपल्या घरापर्यंत पोचले आहेत. त्यामुळे ‘लव्ह जिहाद’च्या घटना रोखण्यासाठी येत्या हिवाळी अधिवेशनात ‘लव्ह जिहादविरोधी’ आणि ‘धर्मांतरबंदी’ कायदा करण्यात यावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १७ डिसेंबर या दिवशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती धरणे आंदोलनाच्या माध्यमातून शासनाकडे करण्यात आली.

या आंदोलनामध्ये सर्वश्री ह.भ.प. किशोर महाराज मुळे, भाजपचे नेते कमल कुलधरिया, श्रीराम मंदिरचे उपाध्यक्ष संजीव लाभे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष वरुण पाठक, अतुल शेंडे, विश्व हिंदु परिषदेचे जिल्हा सहमंत्री अनिल पुरुषोत्तम कावळे, विश्व हिंदु परिषदेचे जिल्हा कोषाध्यक्ष अतुल देशपांडे, संजय बडगीलवार, हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक हितेश निखार, सचिन पाटील, सनातन संस्थेच्या सौ. भार्गवी क्षीरसागर, सौ. माधुरी चिमूरकर, सौ. वंदना कलोडे आदी अनेक धर्माभिमानी उपस्थित होते.

वसईतील श्रद्धा वालकर हिची आफताबकडून ३५ तुकडे करून निर्घृण हत्या, उत्तरप्रदेशातील निधी गुप्ता या हिंदु तरुणीने धर्मांतर करण्यास नकार दिल्यामुळे तिची सुफीयानकडून चौथ्या मजल्यावरून फेकून हत्या, अशा अनेक घटना समोर येत आहेत.  अशी अनेक उदाहरणे यापूर्वीही समोर आलेली आहेत. असे अनेक ‘आफताब आणि सूफियान’ उजळ माथ्याने समाजात फिरत आहेत. ज्याच्यावर प्रेम करतो, त्या व्यक्तीची अशी निर्घृण हत्या कुणी करणार नाही. त्यामुळे वासनांध, क्रूर आणि नराधम ‘लव्ह जिहादी’ आफताब आणि सूफीयान यांना तात्काळ फासावर लटकवावे, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.