तुर्भे गावात खड्ड्यांचे साम्राज्य !

प्रशासनाच्या निष्क्रीयतेचा परिणाम !

नवी मुंबई – तुर्भे गावातील अंतर्गत आणि मुख्य रस्त्यांवर पुष्कळ प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे स्थानिक रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तुर्भे गावामध्ये तीन नगरसेवक, तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष यांचे वास्तव्य आहे. असे असतांनाही तेथे पायाभूत सुविधांची वानवा आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी किंवा तथाकथित समाजसेवक याकडे लक्ष देत नाहीत. खड्ड्यांमुळे किरकोळ अपघात होत आहेत. मणक्यांचे आजार असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना याचा अधिकच फटका बसत आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकार्‍यांनी यात लक्ष घालून येथील रस्ते लवकरात लवकर दुरुस्त आणि खड्डेमुक्त करावेत, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.