राजस्थानमध्ये ३ लाख हिंदूंच्या धर्मांतराचे ख्रिस्ती मिशनर्‍यांचे षड्यंत्र !

धर्म जागरण मंचचा दावा

जयपूर (राजस्थान) – नुकतेच उत्तरप्रदेशच्या मेरठ येथील ४०० हिंदूंचे धर्मांतर झाल्याची बातमी समोर आली होती. ‘राजस्थानमध्येही मोठ्या प्रमाणात हिंदूंच्या धर्मांतराचे षड्यंत्र रचण्यात आले आहे. राज्यातील १२-१३ जिल्ह्यांतील ख्रिस्ती मिशनरी साधारण ३ लाख हिंदूंच्या संपर्कात असून ते या हिंदूंचे धर्मांतर करण्याच्या प्रयत्नात आहेत’, असा दावा धर्म जागरण मंच या हिंदुत्वनिष्ठ संघटनेकडून करण्यात आला आहे. ख्रिस्ती मिशनरी मूर्तीपूजेला विरोध करून हिंदूंचा बुद्धीभेद करत आहेत.

धर्म जागरण मंचने केलेल्या दाव्यानुसार,

१. राजधानी जयपूरपासून केवळ २२ किमी अंतरावर असलेल्या वाटिका गावात असलेल्या ढाणी बैरावाल येथे मिशनरी कार्यरत आहेत. येथे ४०० हिंदु कुटुंबांच्या धर्मांतराचा प्रयत्न केला जात आहे.

२. ख्रिस्ती मिशनरी हिंदूंना मूर्तीपूजा बंद करणे, व्रतांचे पालन न करणे, हिंदु देवतांना न मानणे असे प्रकार करण्यास सांगत आहेत. तसेच ते दावा करत आहेत की, येशू ख्रिस्ताची उपासना केली, तर आजारपणासह अन्य सर्व समस्यांचे निराकरण होईल. देवतांची पूजा केली, तर अनर्थ घडेल.

३. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार ख्रिस्ती मिशनरी हे हिंदूंना नोकरीचे आमीष दाखवून देवतांच्या मूर्ती नदी अथवा तलाव येथे फेकण्यास किंवा पिंपळाच्या झाडाखाली ठेवण्यास सांगत आहेत.

संपादकीय भूमिका

  • हिंदूंमधील धर्मशिक्षणाच्या अभावामुळेच ते ख्रिस्त्यांच्या प्रलोभनांना सहज बळी पडतात. त्यामुळे त्यांना धर्मशिक्षण देण्याची, तसेच केंद्र सरकारने राष्ट्रव्यापी धर्मांतरविरोधी कायदा करण्याची आवश्यकता आहे !
  • या दाव्यात तथ्य असेल, तर काँग्रेसच्या राज्यात ख्रिस्त्यांना मोकळे रान मिळणे, यात काय आश्‍चर्य ?

सिवनी (मध्यप्रदेश) येथे हिंदूंचे बलपूर्वक धर्मांतर करणार्‍या ८ ख्रिस्त्यांना अटक !

मध्यप्रदेशच्या सिवनी जिल्ह्यातील डाला या गावात हिंदूंचे बलपूर्वक धर्मांतर करणार्‍या ८ ख्रिस्त्यांना अटक करण्यात आली आहे. गावातील सोहनलाल नागेश नावाच्या व्यक्तीच्या घरी हिंदूंचे धर्मांतर चालू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. धर्मांतराच्या बदल्यात आर्थिक मोबदलाही देण्याविषयी या वेळी सांगण्यात येत होते.

यासंदर्भात श्रीराम सेनेचे प्रांतीय अध्यक्ष शुभम सिंह यांनी सांगितले की, सिवनी, बालाघाट, छिंदवाडा आणि जवळपासच्या क्षेत्रांमधून धर्मांतराच्या घटना वारंवार घडत असतात.