मंदिरांचे आणि धर्मशिक्षण घेण्याचे महत्त्व जाणल्याने मुलाला ‘कॉन्व्हेंट’ शाळेत घालण्याचा विचार रहित करणारे पानवळ, बांदा येथील श्री. दत्तप्रसाद पावसकर !

बांदा (जिल्हा सिंधुदुर्ग) येथे एक ‘कॉन्व्हेंट’ शाळा (ख्रिस्ती मिशनरी संचालित शाळा) आहे. पानवळ, बांदा येथील श्री. दत्तप्रसाद पावसकर त्यांच्या मुलाला या शाळेत प्रवेश घेण्यासाठी गेले होते.

प.पू. दास महाराज

१. श्री. पावसकर यांना श्रीराम पंचायतन मंदिराच्या परिसरात आल्यावर सात्त्विकता जाणवणे

श्री. पावसकर शाळेत जाऊन नंतर श्रीराम पंचायतन मंदिराच्या आवारात आले. तेव्हा त्यांना मंदिराच्या परिसरात चांगली स्पंदने जाणवू लागली. त्यामुळे त्यांच्या विचारांत पालट झाला. त्यांना ‘मुलाला ‘कॉन्व्हेंट’ शाळेत न घालता मराठी माध्यमाच्या शाळेतच घालूया’, असे वाटू लागले. त्यांनी लगेच त्यांच्या पत्नीला सांगितले, ‘‘मला मुलाला त्या शाळेत घालायचे नाही. माझा विचार पालटला आहे.’’

२. नंतर श्री. पावसकर यांनी सांगितले, ‘‘मला शाळेत गेल्यावर दाब जाणवत होता. माझे डोके जड झाले होते. श्रीराम मंदिराच्या परिसरात आल्यावर मला हलकेपणा आणि उत्साह जाणवू लागला.’’

३. मंदिरांचे आणि धर्मशिक्षण घेण्याचे महत्त्व जाणलेले श्री. पावसकर !

श्री. पावसकर यांना श्रीरामाच्या कृपेने ‘गौतमारण्य’ आश्रमातील श्रीराम पंचायतन मंदिरातील चैतन्याची अनुभूती येऊन मंदिरांचे महत्त्वही लक्षात आले. त्यांना धर्मशिक्षण घेण्याचेही महत्त्व लक्षात आल्याने त्यांनी स्वतःच्या मुलाला ‘कॉन्व्हेंट’ शाळेत न घालण्याचा निर्णय लगेच घेतला.’ (‘यातूनच ‘मंदिरे ही चैतन्याचे स्रोत आहेत’, हे पुन्हा सिद्ध झाले, तसेच प.पू. दास महाराज यांच्या तपःसाधनेमुळे श्री. पावसकर यांना मंदिराच्या परिसरात आल्यावर चांगली स्पंदने जाणवली.’ – संकलक)

– आपला चरणसेवक,

प.पू. दास महाराज, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.६.२०२२)

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या आणि साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक