हिंदूंच्या विरोधात केलेल्या वक्तव्यांसंदर्भात बॉलीवूडवाल्यांना वैध मार्गाने आणि सातत्याने विरोध करा !

अधिवक्ता सुभाष झा, सर्वाेच्च न्यायालय

६ सप्टेंबरच्या रात्री अभिनेता रणबीर कपूर आणि त्याची पत्नी आलिया भट हे उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेले होते. तेव्हा काही हिंदुत्वनिष्ठांनी त्या दोघांना मंदिरात जाण्यापासून रोखले. रणबीर कपूर याने ‘मी गोमांस खातो’, असे विधान केल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांना मंदिरात जाता आले नाही. या दृष्टीकोनातून सर्वाेच्च न्यायालयाचे वरिष्ठ अधिवक्ता सुभाष झा यांचे विचार सर्व हिंदूंना प्रेरक आहेत. हिंदु जनजागृती समिती आयोजित एका चर्चासत्रामध्ये त्यांनी मांडलेले विचार येथे देत आहोत.

अधिवक्ता सुभाष झा म्हणतात, ‘‘आज बॉलीवूडवाले अल्पसंख्यांकांच्या श्रद्धास्थानांवर आघात करणारे चित्रपट काढण्यास घाबरतात; कारण त्यांना त्यांचा जीव जाईल किंवा मोठ्या विरोधाला सामोरे जावे लागेल, याची भीती वाटत असते. हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात केल्यावर हिंदु समाजही आपल्याला आर्थिक वा सामाजिक हानी मोठ्या प्रमाणावर पोचवू शकतो, याची जाणीव बॉलीवूडवाल्यांना झाली की, ते हिंदूंच्या विरोधात चित्रपट काढण्याचे धाडस करणार नाहीत. यासाठी सर्व हिंदूंनी संघटित होऊन असे चित्रपट आणि चित्रपटांचे सर्व प्रायोजक यांच्या वस्तूंवर बहिष्कार घालायला हवा. तसेच त्यांना वैध मार्गाने तीव्र विरोध करायला हवा. तसे झाले, तरच बॉलीवूडवाले त्याची (हिंदूंच्या विरोधाची) नक्कीच नोंद घेतील. यासाठी हिंदूंनी सतत प्रयत्न केले पाहिजेत आणि अन्य हिंदूंचे प्रबोधन करून त्यांना शिक्षित केले पाहिजे.