कृष्णा नदीत सातत्याने होणार्‍या माशांच्या मृत्यूप्रकरणी हरित लवादाने अहवाल मागवला !

निष्क्रीय आणि दायित्वशून्य प्रदूषण नियंत्रण मंडळ !

सांगली – कृष्णा नदीतील मासे मृत्यूमुखी पडले होते. या प्रकरणी पडताळणी करण्यासाठी संयुक्त समिती नियुक्तीचे आदेश राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण (एन्.जी.टी.) यांच्या पश्चिम महाराष्ट्र क्षेत्राच्या पुणे खंडपीठाने दिले आहेत. या समितीने घटनास्थळी भेट देऊन ‘४ आठवड्यांत अहवाल सादर करावा’, असे आदेश दिले आहेत. ‘स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी प्रविष्ट केलेल्या याचिकेवर हा आदेश देण्यात आला आहे’, असे अधिवक्ता ओंकार वांगीकर यांनी सांगितले.

स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी मौजे डिग्रज, तसेच पलूस ते सांगली परिसरात असलेल्या अनेक उद्योगांद्वारे प्रक्रिया न केलेले सांडपाणी कृष्णा नदीत सोडल्याने माशांचा मृत्यू, तसेच जैवविवितेची हानी होत असल्याविषयी याचिका प्रविष्ट केली आहे. यास संदर्भात २४ ऑगस्ट या दिवशी ‘व्हिडिओ कॉन्फरन्स’द्वारे सुनावणी झाली.

हरित लवादाकडे प्रविष्ट केलेल्या याचिकेत म्हटले आहे की,

१. महापुराच्या पाण्यात घातक रसायनयुक्त पाणी सोडले जाते. याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी डोळेझाक करतात. दूषित पाणी नदीच्या सोडणार्‍या एकाही साखर कारखान्यांवर आतापर्यंत प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई केलेली नाही.

२. सांगली जिल्ह्याच्या हद्दीत अनेक कारखाने येतात; मात्र कोणत्याही साखर कारखान्याला नोटीस बजावलेली नाही. अधिकार्‍यांनी ठिकठिकाणी पाणी नमुने घेतले आहेत. गाळमिश्रित पाणी आणि शेरीनाले यांमुळेच मासे मृत्यूमुखी पडले, असा पवित्रा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सांगलीतील कार्यालयाने घेतला आहे.

संपादकीय भूमिका

हिंदूंच्या उत्सवाच्या वेळी जागे होणारे कथित पर्यावरणवादी हरित लवादाच्या भूमिकेविषयी आता काय म्हणणार आहेत ?