स्वाईन फ्ल्यू’चा आजार पसरू नये, यासाठी काय करावे ?

‘स्वाईन फ्ल्यू’ हा संसर्गजन्य आजार आहे, याविषयीची माहिती आपण मागील लेखात वाचली. त्यामुळे शक्यतो हा आजार होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. ही काळजी केवळ स्वत:पुरती मर्यादित नसावी. आपल्या शरिरात आजाराचे विषाणू असतील, तर आपल्यामुळे इतरांना त्याची लागण होऊ नये, ही दक्षता घेणेही आवश्यक आहे. त्यासाठी खालील गोष्टी प्रतिबंधक उपायांमध्ये अंतर्भूत आहेत.

१. प्राथमिक स्तरावर घ्यावयाची काळजी !

अ. हात नेहमी शिकेकाई, रिठे अथवा उष्ण पाणी यांनी धुवावेत. (ही सवय कुठल्याही संसर्गजन्य आजारासाठी प्रतिबंधात्मक म्हणून उपयोगी ठरते.)

आ. गर्दीमध्ये जाण्याचे टाळावे.

इ. ताप, सर्दी आणि खोकला असलेल्या रुग्णांपासून लांब रहावे.

ई. हस्तांदोलन करणे अथवा आलिंगन देणे टाळावे.

उ. खोकतांना किंवा शिंकतांना तोंडाला रूमाल लावावा.

ऊ. पुरेशी झोप घ्यावी.

ए. संतुलित आणि ताजा आहार घ्यावा.

ऐ. सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये. ‘ही चांगली सवय भारतातील लोकांना कशी आणि कधी लागणार ?’, हा मोठा प्रश्न आहे. पादचारी किंवा वाहनात असलेले लोकही रस्त्यावर बिनधास्त थुंकतात. थुंकणारा माणूस पाहिला नाही, असा एकही दिवस जात नाही. काही सांगायला गेले, तर लोक शिवीगाळच करतात. हे तर त्याहून वाईट आहे.

ओ. तोंडावर मास्क लावावा.

औ. या आजारावर प्रतिबंधक लस उपलब्ध आहे. तिचे दुष्परिणाम जाणून घेऊन सारासार विचार करून तिचा वापर करावा.

२. स्वाईन फ्ल्यूची लक्षणे

स्वाईन फ्ल्यूची लक्षणे ही सर्वसाधारण फ्ल्यूसारखीच असतात. यात बारीक थंडी वाजणे किंवा थंडी वाजून येणे, १०० अंश फॅरनहाईटहून अधिक ताप येणे, सर्दी (वहाणारी), खोकला, घसादुखी, अंगदुखी, डोकेदुखी, मळमळ, उलटी, जुलाब आणि क्वचित् कधीतरी पोटदुखी इत्यादी लक्षणांचा समावेश असतो.

३. साधी सर्दी आणि स्वाईन फ्ल्यू यांतील भेद कसा ओळखावा ?

फ्ल्यूची लक्षणे सर्दीच्या लक्षणांच्या मानाने काही काळ अगोदर दिसतात. सर्दीच्या लक्षणांपेक्षा स्वाईन फ्ल्यूची लक्षणे अधिक तीव्र स्वरूपाची असतात. स्वाईन फ्ल्यू झालेल्या व्यक्तीला २ ते ३ आठवडे सतत अशक्तपणा जाणवत रहातो, नाक सतत बंद असते किंवा वहात रहाते. नंतर डोकेदुखी आणि घसादुखी यांचा त्रास होतो. त्यानंतर ताप येऊन अंग दुखते.

४. पडताळणी

घशातील स्रावाची प्रयोगशाळेत पडताळणी करून या आजाराचे निश्चित निदान करता येते. बर्‍याच वेळा हा स्राव जमा करण्याची पद्धतच रुग्णाला अधिक त्रासदायक ठरते. खासगी प्रयोगशाळांमधील ही निदानप्रक्रिया काहीशी खर्चिकही आहे.

५. प्रतिबंधात्मक उपचार

अ. कामाला सुटी देऊन पूर्ण विश्रांती घ्यावी. अगदी स्नानाचे परिश्रमही शरिराला देऊ नयेत. अशक्तपणा जाईपर्यंत विश्रांती घ्यावी.

आ. स्वाईन फ्ल्यू आजारासाठी भारत सरकारने ‘टॅमी फ्ल्यू’ हे औषध पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून दिले आहे; परंतु ‘स्वाईन फ्ल्यू’ विषाणू शरिरात नसतांना त्याचा प्रयोग केल्यास त्या औषधाचा प्रभाव नाहीसा होतो. त्यामुळे आधुनिक वैद्यांच्या (डॉक्टरांच्या) सल्ल्याविना औषध घेऊ नये. अन्य उपचार योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने केल्यास औषधाची आवश्यकता भासेलच, असे नाही.

इ. जनसंपर्क शक्य तितका टाळावा.

ई. आहारात उष्ण आणि पातळ पदार्थ पुरेशा प्रमाणात घ्यावेत, उदा. भाजलेल्या तांदळाची पेज, मूग किंवा मसूर शिजवून त्यांवरील पाणी (याला शास्त्रात ‘यूष’ म्हणतात. यात जिर्‍याची पूड आणि मीठ घालावे.) किंवा लाह्यांची पेज इत्यादी.

उ. तहान लागल्यावर गरम पाणी प्यावे. नागरमोथा, सुंठ, पटोल या चूर्णांचे १५ गॅ्रम मिश्रण अर्धा लिटर पाण्यात घालून उकळावे. तहान लागल्यावर हेच पाणी प्यावे. (थर्मासमध्ये ठेवल्यास हे पाणी गरम रहाते.)

ऊ. भूक असेल, तरच आहार घ्यावा, अन्यथा लंघन करावे. भूक नसतांना केलेल्या लंघनाने अशक्तपणा वाढत नाही. उलट अग्नी प्रदिप्त झाल्याने आधीच्या अपचनाचे परिणाम निस्तरून अशक्तपणा अल्प होण्यास साहाय्य होते; परंतु लंघन कधी थांबवायचे, यासाठी वैद्यांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

ए. घसादुखी न्यून होण्यासाठी गरम पाण्याच्या गुळण्या कराव्यात. काही जण हळद-दूध घेतात; पण ते चुकीचे आहे. कफाचा स्राव असतांना दूध घेऊ नये. हळद पाण्यासमवेत किंवा मधासमवेत घ्यावी.

ऐ. ताप, डोकेदुखी आणि अंगदुखी यांवर नेहमीच्या वैद्यांकडून औषध घ्यावे.

मुळात स्वाईन फ्ल्यू हा आजार प्राणघातक नाही. (यात होणारे मृत्यू बर्‍याच वेळा अन्य आजारांमुळे झालेले असतात.) योग्य उपचारानंतर १० दिवसांत रुग्ण बरा होऊ शकतो. हे लक्षात घेतले, तर भीती दूर होऊन आजार बरा होतो.

– वैद्या सुचित्रा कुलकर्णी (साभार : साप्ताहिक ‘विवेक’)

वर्ष २०१० मध्ये ‘जागतिक आरोग्य संघटने’ने स्वाईन फ्ल्यूची साथ संपल्याचे घोषित केले आहे, तरीही तो तुरळक स्वरूपात अजूनही काही ठिकाणी आढळतो. या रोगाचे विषाणू केवळ एकाच प्रकारचे नाहीत. त्याचे H1N1, H3N2, H1N2, H2N1, H3N1, H2N3 असे एकूण ६ प्रकारचे विषाणू असतात. एका प्रकारच्या विषाणूच्या लसीचा दुसर्‍या प्रकारच्या विषाणूसाठी उपयोग नसतो. त्यामुळे ‘लस घेतल्यावर सगळे काही आलबेल होते’, हा अपसमज पाळू नये.