कै. (सौ.) शालिनी मराठे यांच्या निधनानंतर त्यांचा अंत्यसंस्कार विधी आणि त्यांच्या लिंगदेहाचा मृत्यूत्तर प्रवास यांचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

‘कै. (सौ.) शालिनी मराठे यांची देहत्यागापूर्वी आध्यात्मिक पातळी ६७ टक्के होती. देहत्यागानंतर अवघ्या २९ दिवसांत त्यांची पातळी ४ टक्क्यांनी वाढून ती ७१ टक्के झाली आहे. त्यांनी संतपद प्राप्त केले आहे. कु. मधुरा भोसले यांनी सौ. मराठेकाकूंच्या अंत्यसंस्कार विधीच्या केलेल्या सूक्ष्म-परीक्षणामध्ये ‘कै. (सौ.) शालिनी मराठे यांनी देहत्यागानंतर संतपद प्राप्त केले आहे, असा उल्लेख केला आहे, तसेच त्या वेळी होत असलेल्या सूक्ष्मातील घटनाक्रमाचे वर्णन केले आहे. ही त्यांना मिळालेली पूर्वसूचनाच आहे. कै. (सौ.) शालिनी मराठे यांना संतपद प्राप्त होणार आहे, हे अगोदरच ओळखल्याबद्दल कु. मधुरा भोसले यांचे अभिनंदन !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘१६.७.२०२२ या दिवशी पहाटे ३.०६ वाजता सनातन संस्थेच्या साधिका सौ. शालिनी मराठे (वय ७४ वर्षे) यांचे आजारामुळे निधन झाले. त्यांचा पार्थिव देह सर्वांना दर्शनासाठी ठेवला होता. त्यांच्या निधनानंतर देवाच्या कृपेने माझ्याकडून त्यांचा अंत्यसंस्कार विधी आणि त्यांच्या लिंगदेहाचा मृत्यूनंतरचा प्रवास यांचे झालेले सूक्ष्म परीक्षण येथे देत आहे.

कु. मधुरा भोसले

१. कै. (सौ.) शालिनी मराठेकाकू यांच्या पार्थिव देहात पंचमहाभुतांच्या स्तरांवर चैतन्य कार्यरत झाल्यामुळे जाणवलेली वैशिष्ट्ये

२. कै. (सौ.) शालिनी मराठेकाकू यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतांना जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे आणि त्यांच्यामागील आध्यात्मिक कार्यकारणभाव

पू. (कै.) सौ. शालिनी प्रकाश मराठे

२ अ. कै. (सौ.) मराठेकाकू यांचा साधक ते संत हा आध्यात्मिक प्रवास पूर्ण झाला असून ‘परात्पर गुरु डॉ. आठवले त्यांच्या संदपदाची घोषणा लवकरच करतील’, असे जाणवणे : कै. (सौ.) मराठेकाकू यांचा साधक ते संत हा प्रवास पूर्ण झाल्यामुळे त्यांच्या लिंगदेहाची वाटचाल महर्लाेकातून जनलोकाकडे झालेली आहे. त्यामुळे त्यांचा पार्थिव देह आणि लिंगदेह यांच्या भोवती असणार्‍या निळसर रंगाच्या महर्लाेकाच्या वायुमंडलाचा लोप होऊन तेथे पिवळसर रंगाचे जनलोकाचे दैवी वायुमंडल निर्माण झाले आहे. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले ‘कै. (सौ.) शालिनी मराठेकाकू यांनी संतपद प्राप्त केल्याचे लवकरच घोषित करतील’, असे मला जाणवले.

(प्रत्यक्षातही मृत्यूनंतर कै. (सौ.) शालिनी मराठे यांनी संतपद प्राप्त केले आहे. हे ओळखल्याबद्दल कु. मधुरा भोसले यांचे अभिनंदन ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१८.७.२०२२)

२ आ. कै. (सौ.) मराठेकाकू यांच्या शिवात्म्याला प्रथम वैकुंठ आणि नंतर जनलोक येथे घेऊन जाण्यासाठी साक्षात् विष्णुदूत येणे : कै. (सौ.) मराठेकाकू यांच्या मृत्यूसमयी त्यांना श्रीमन्नारायणाच्या रूपातील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे दर्शन झाले. तेव्हा श्रीगुरूंच्या नारायणरूपाचे दिव्य दर्शन घेता घेताच त्यांचे प्राण त्यांच्या दोन्ही डोळ्यांतून बाहेर पडले. कै. (सौ.) शालिनी मराठेकाकू यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना गुरुस्थानी मानून संपूर्ण आयुष्यभर श्रद्धेने आणि भावपूर्णरित्या व्यष्टी अन् समष्टी साधना केल्यामुळे त्यांच्यावर श्रीमन्ननारायण प्रसन्न झाले आहेत. त्यामुळे कै. (सौ.) मराठेकाकू यांची आध्यात्मिक उन्नती होऊन त्यांनी संतपद प्राप्त केले आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या भक्तीभावामुळे त्यांच्या शिवात्म्याला काही काळ वैकुंठात रहाण्याचे सौभाग्य प्राप्त होऊन त्यांची सगुणातील साधना पूर्ण होणार आहे. (येथे त्यांच्या आत्म्याला ‘शिवात्मा’ म्हटले आहे; कारण त्यांच्या आत्म्यावरील मायेचे आवरण दूर होऊन त्याला आत्मानुभूती आल्यामुळे त्याला ‘शिवात्मा’ असे संबोधले आहे.) त्यानंतर त्यांच्याकडून निर्गुणाची साधना होण्यासाठी त्यांच्या लिंगदेहाला जनलोकात स्थान मिळणार आहे. (त्यांना त्यांच्या मृतदेहाच्या अंत्यसंस्काराच्या विधीच्या वेळी नेमकी काय प्रक्रिया होते आणि परात्पर गुरुदेव मृत साधकाच्या लिंगदेहाला कशा प्रकारे संबंधित लोकापर्यंत पोचवतात ?’, ही जाणून घेण्याची जिज्ञासा असल्यामुळे त्यांचा शिवात्मा अंत्यसंस्कार विधी पूर्ण होईपर्यंत पृथ्वीच्या कक्षेतच होता. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या शिवात्म्याला प्रथम वैकुंठात आणि नंतर जनलोकात घेऊन जाण्यासाठी चतुर्भुज रूपातील विष्णुदूत आले होते. तेव्हा भूलोक ते वैकुंठ आणि जनलोक या दिव्य महामार्गावर दोन्ही बाजूला पणत्या लावल्या होत्या आणि हा मार्ग पुष्पांचा गालीचा पसरून सुंदर सजवला होता. संतांचा शिवात्मा वैकुंठात येणार म्हणून सर्व देवता आणि त्यानंतर जनलोकात येणार म्हणून सर्व ऋषिमुनींना आनंद झाला.

३. ‘कै. (सौ.) मराठेकाकूंचा अंत्यविधी चालू नसून मोठा उत्सवच चालू आहे’, असे जाणवणे

कै. (सौ.) शालिनी मराठेकाकू यांची साधना भावभक्ती आणि चैतन्य यांच्या स्तरांवर चालू असल्यामुळे त्यांच्या देहावसानानंतर आश्रमातील वातावरण उदासीन न वाटता प्रफुल्लित, चैतन्यमय आणि आनंददायी झाले होते. त्यांचा पार्थिव देह आणि लिंगदेह अत्यंत चैतन्यमय असल्यामुळे त्यांतून संपूर्ण आश्रमामध्ये चैतन्य अन् आनंद यांची उधळण होत होती. त्यामुळे ‘कै. (सौ.) मराठेकाकूंचा अंत्यविधी चालू नसून मोठा उत्सवच चालू आहे’, असे जाणवत होते.

४. कै. (सौ.) शालिनी मराठेकाकू यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंकार होत असतांना सूक्ष्म स्तरावर जाणवलेली सूत्रे

४ अ.‘त्या गाढ निद्रेत आहेत’, असे जाणवण्यामागील कार्यकारणभाव : मृत्यूपूर्वी कै. (सौ.) मराठेकाकूंचे ईश्वराशी अनुसंधान वाढून त्यांची वृत्ती अंतर्मुख झाली होती. वृत्तीची अंतर्मुखता मुखावर गाढ ध्यान किंवा निद्रा यांच्या रूपाने व्यक्त होते. त्यामुळे कै. (सौ.) मराठेकाकूंचा पार्थिव देह पहातांना ‘त्या गाढ निद्रेत आहेत’, असे जाणवले.

४ आ. देहातून उत्सर्जित होणारा सूक्ष्म चैतन्यदायी वायू तिरडीच्या बांबूंच्या पोकळीमध्ये आकृष्ट होणे : सर्वसामान्य व्यक्तीच्या निधनानंतर तिच्या देहातून उत्सर्जित होणारा सूक्ष्म दूषित वायू तिरडीच्या बांबूंच्या पोकळीमध्ये आकृष्ट होतो.

कै. (सौ.) शालिनी मराठेकाकू यांच्या देहातून चैतन्यदायी वायूचे प्रक्षेपण झाल्यामुळे बांबूंच्या पोकळीमध्ये चैतन्यदायी वायू शोषला जाऊन संपूर्ण तिरडी चैतन्यदायी झाली. त्यांची तिरडी सूक्ष्मातून पिवळसर रंगाची दिसत होती.

४ इ. कै. (सौ.) शालिनी मराठेकाकू यांच्या पार्थिवावर त्यांचे यजमान श्री. प्रकाश मराठे यांनी दर्भाने तिलोदक प्रोक्षण केल्यावर सूक्ष्मातून झालेला परिणाम : दर्भामध्ये तेजतत्त्वाच्या स्तरावर सात्त्विक लहरी धारण आणि प्रक्षेपित करण्याची क्षमता असते अन् तिळाकडे पितृलहरी आकृष्ट होतात. जेव्हा श्री. प्रकाश मराठेकाका यांनी कै. (सौ.) शालिनी मराठेकाकू यांच्या पार्थिवावर दर्भाने तिलोदक (काळे तीळ घातलेले पाणी)  प्रोक्षण केले, तेव्हा त्यांच्या पार्थिव देहाभोवती तेजतत्त्वामक लहरींचे आच्छादन निर्माण झाले. त्यामुळे वातावरणात भटकणार्‍या वाईट शक्तींना कै. (सौ.) शालिनी मराठेकाकू यांच्या पार्थिव देहाचे नियंत्रण मिळवता आले नाही. तिळमिश्रित जलाकडे कै. (सौ.) शालिनी मराठेकाकू यांच्या पितरांच्या लहरी आकृष्ट होऊन त्यांच्या लिंगदेहाच्या स्पंदनांशी पितरांच्या लहरी जोडल्या गेल्या. कै. (सौ.) शालिनी मराठेकाकू यांच्या शिवात्म्याला नेण्यासाठी विष्णुदूत आले. त्यांना नेण्यासाठी शिवदूत आले नाहीत; कारण त्यांनी जन्मभर श्रीविष्णूची उपासना केली होती आणि त्यांच्या ‘शिवात्म्याला’ विष्णुलोकात श्रीविष्णूच्या चरणी स्वत:ला समर्पित होण्यासाठी जायचे होते; म्हणून त्यांचा शिवात्मा वैकुंठात गेला. ते पाहून त्यांच्या पितरांनाही आनंद झाला आणि त्यांनी कै. (सौ.) शालिनी मराठेकाकू यांच्या दिव्य ज्योतिर्मय शिवात्म्याचे दर्शन घेतले. जेव्हा जिवाला आत्मबोध होतो, तेव्हा त्याच्या आत्म्यावरील मायारूपी अज्ञानाचे आवरण पूर्णपणे निघून जाते आणि तेव्हा त्याच्या आत्म्यातील दिव्य तेज निरांजनाच्या ज्योतीप्रमाणे, चैतन्याच्या गोळ्याप्रमाणे किंवा केवळ प्रकाशाचा झोताप्रमाणे शिवात्म्याचे दर्शन होते.

४ ई. उत्तरक्रियेच्या अंतर्गत श्री. प्रकाश मराठे यांनी कै. (सौ.) शालिनी मराठेकाकू यांच्या पार्थिव देहाला भस्मलेपन करणे : कै. (सौ.) शालिनी मराठेकाकू यांच्या उत्तरक्रियेच्या वेळी त्यांचे कपाळ, हात इत्यादी भागांवर भस्माचे पट्टे लावून भस्मलेपन केले होते. भस्मामध्ये शिवाची तारक-मारक शक्ती, वैराग्यदायी शक्ती आणि निर्गुण चैतन्य कार्यरत असल्यामुळे भस्मलेपन केल्याने कै. (सौ.) शालिनी मराठेकाकू यांचा पार्थिव देह आणि लिंगदेह यांच्याभोवती शिवतत्त्वात्मक  चैतन्यलहरींचे संरक्षककवच निर्माण झाले. त्यामुळे यमदुतांनी लांबूनच कै. (सौ.) शालिनी मराठेकाकूंच्या पार्थिवदेहाला नमन केले. तेव्हा श्रीविष्णूने कै. (सौ.) शालिनी मराठेकाकूंचा लिंगदेह शिवात्मास्वरूप झाल्यामुळे त्याला यमलोकात न नेता थेट वैकुंठात नेण्याचे आदेश दिले. (शिवात्मास्वरूप होणे, हे शिवाशी संबंधित नसून ती आत्म्याची एक अवस्था आहे. कै. (सौ.) मराठेकाकूंनी जन्मभर श्रीविष्णूची उपासना केली होती आणि त्यांच्या ‘शिवात्म्याला’ विष्णुलोकात श्रीविष्णूच्या चरणी स्वत:ला समर्पित होण्यासाठी जायचे होते म्हणून त्यांचा शिवात्मा वैकुंठात गेला.) त्यामुळे श्रीविष्णूच्या आज्ञेने यमदेवाने यमदूतांना कै. (सौ.) शालिनी मराठेकाकूंच्या लिंगदेहावरील संपूर्ण नियंत्रण विष्णुदूतांना देण्यास सांगितले. त्याप्रमाणे कै. (सौ.) शालिनी मराठेकाकूंच्या शिवात्मास्वरूप लिंगदेहाचे संपूर्ण दायित्व विष्णुदूतांनी घेतले; कारण त्या विष्णुभक्त आहेत.

४ उ. श्री. प्रकाश मराठे यांनी कै. (सौ.) शालिनी मराठेकाकूंच्या पार्थिव देहाला पांघरलेल्या पांढर्‍या वस्त्राचा उर्वरित भाग कापून उपरणे म्हणून अंगावर घेतल्यावर सूक्ष्मातून घडलेली प्रक्रिया : कै. (सौ.) शालिनी मराठेकाकूंच्या पार्थिव देहाची स्पंदने त्यांना पांघरलेल्या पांढर्‍या वस्त्रामध्ये आली. या वस्त्राचा उर्वरित भाग श्री. प्रकाश मराठेकाका यांनी कापून तो उपरण्याप्रमाणे घेतल्यामुळे त्यांच्या भोवती कै. (सौ.) मराठेकाकूंची स्पंदने कार्यरत झाली. त्यामुळे श्री. प्रकाश मराठे यांनी केलेल्या अंत्यविधीच्या कृतींचा परिणाम त्या वस्त्रामध्ये आकृष्ट झालेल्या कै. (सौ.) मराठेकाकूंच्या स्पंदनांच्या माध्यमातून त्यांच्या लिंगदेहापर्यंत पोचला. अशा प्रकारे अंत्यसंस्कार विधीच्या अंतर्गत केलेल्या धार्मिक कृतींचा परिणाम थेट मृत व्यक्तीच्या लिंगदेहावर होऊन तिला सद्गती मिळण्यासाठी आवश्यक असणारे दैवी बळ तिच्यासाठी केलेल्या धार्मिक विधींतून मिळते.

४ ऊ. श्री. प्रकाश मराठे यांनी कै. (सौ.) शालिनी मराठेकाकूंच्या पार्थिव देहाला तुळशीहार घालून नमस्कार करणे : तुळशीच्या हारामध्ये कार्यरत असणार्‍या विष्णुतत्त्वाच्या लहरी तुळशीच्या पानांच्या सुगंधामध्ये कार्यरत होत्या. हा हार श्री. प्रकाश मराठे यांनी कै. (सौ.) शालिनी मराठेकाकूंच्या पार्थिवाला घातला. तेव्हा त्यांच्या पार्थिव देहाभोवती गंधमय विष्णुतत्त्वाच्या लहरींचे संरक्षककवच निर्माण झाले. कै. (सौ.) मराठेकाकूंचा पार्थिव देह चैतन्यमय झाल्यामुळे त्याला वाहिलेल्या तुळशीच्या हारामध्ये दिव्य चैतन्य प्रविष्ट होऊन तो हार चैतन्यामुळे सूक्ष्मातून सोनेरी रंगाचा झाला. यावरून कै. (सौ.) मराठेकाकूंमध्ये दिव्यत्व कार्यरत झाल्याची प्रचीती आली.

४ ए. कै. (सौ.) शालिनी मराठेकाकूंचा पार्थिव देह स्मशानात नेणे : एका वाहनातून कै. (सौ.) मराठेकाकूंचा पार्थिव देह स्मशानात नेण्यात आला. पार्थिव देहाचे दहन झाल्यावर मनुष्याचे पृथ्वीवरील अस्तित्व संपते. त्यामुळे कै. (सौ.) शालिनी मराठेकाकू यांच्या लिंगदेहाचे पृथ्वीवरील पार्थिव देहाच्या रूपाने असणारे काही क्षणांचे अस्तित्व संपुष्टात येण्यापूर्वी त्यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी शेवटची कृतज्ञता व्यक्त करून भावपूर्ण नमन केले. तेव्हा कै. (सौ.) शालिनी मराठेकाकूंच्या पार्थिव देहातून भावाची आणि त्यांच्या शिवात्मास्वरूप लिंगदेहातून भक्तीची स्पंदने सनातनच्या रामनाथी येथील आश्रमाकडे आली. तेव्हा त्यांचा भक्तीभाव पाहून परात्पर गुरुदेवांचे हृदयही प्रीतीने भरून आले आणि त्यांनी सूक्ष्मातून त्यांचा कृपाकटाक्ष स्मशानातील कै. (सौ.) शालिनी मराठेकाकूंच्या पार्थिव देहाकडे टाकला. तेव्हा परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सनातनच्या रामनाथी येथील आश्रमातून प्रक्षेपित झालेल्या चैतन्य, आनंद आणि शांती यांच्या सूक्ष्म लहरी स्मशानाच्या दिशेने प्रक्षेपित होऊन त्या कै. (सौ.) शालिनी मराठेकाकू यांचा पार्थिव देह आणि शिवात्मा यांनी ग्रहण केल्या. त्यामुळे कै. (सौ.) शालिनी मराठेकाकू यांच्या शिवात्म्याला  पृथ्वीपासून वैकुंठापर्यंतचे कैक कोटी कि.मी. दूर असणारे अंतर पार करून विविध लोकांतून मृत्यूत्तर प्रवास करून वैकुंठापर्यंत पोचण्यासाठी आध्यात्मिक ऊर्जा प्राप्त झाली.

५. कै. (सौ.) शालिनी मराठेकाकू यांच्या शिवात्म्याचा भूलोक ते वैकुंठ आणि जनलोक येथे झालेल्या दिव्य मृत्यूत्तर प्रवासातील आध्यात्मिक पैलू अन् त्यामागील गूढ अध्यात्मशास्त्र

तेव्हा मला असे दिसले की, विष्णुदुतांच्या रूपाने साक्षात् परात्पर गुरु डॉ. आठवले त्यांच्या ओंजळीमध्ये कै. (सौ.) शालिनी मराठेकाकूंचा ज्योतिर्मय शिवात्मा घेऊन पृथ्वीपासून उर्ध्व दिशेने असणारा पितरलोक आणि विविध देवतांचे लोक पार करून वैकुंठाकडे निघाले आहेत. यावरून गुरु-शिष्य आणि भगवंत-भक्त या आध्यात्मिक स्तरांवरील नात्यांतील दिव्यता, उदात्तता आणि परस्परांशी असणारी प्रीती लक्षात येते. जेव्हा कै. (सौ.) मराठेकाकू यांचा शिवात्मा स्वर्गलोकात पोचला, तेव्हा त्यांच्यावर देवतांनी पुष्पवृष्टी केली आणि जेव्हा तो महर्लाेकात पोचला, तेव्हा तेथील महर्षींनी त्यांच्यावर मंत्र म्हणून मंत्रपुष्पांजली केली. जेव्हा त्यांचा लिंगदेह वैकुंठात पोचला, तेव्हा विष्णुदूतांनी हा लिंगदेह श्रीविष्णूच्या चरणी अर्पण केला. तेव्हा ज्योतिर्मय स्वरूपातील सौ. मराठेकाकूंचा शिवात्मा श्रीविष्णूच्या चरणी विसावला आणि त्याचे दोन भाग झाले. पहिल्या भागातून दिव्य कमळाची निर्मिती होऊन हे कमळ श्रीविष्णूच्या चरणी समर्पित झाले आणि दुसर्‍या भागातून पिवळसर गोळ्याची निर्मिती होऊन त्याची वाटचाल जनलोकाकडे झाले. अशा प्रकारे कै. (सौ.) शालिनी मराठेकाकू यांच्या शिवात्म्याला वैकुंठात श्रीविष्णूच्या चरणांजवळ पुष्परूपाने रहाण्याची संधी मिळून ‘समीपमुक्ती’ मिळाली. त्यानंतर त्यांचा चैतन्यदायी पिवळ्या गोळ्याच्या रूपातील सूक्ष्म अस्तित्व जनलोकात जाऊन ऋषींच्या समवेत स्थिरावला आणि त्याची मोक्षप्राप्तीसाठी पुढील समष्टी साधना चालू झाली.

६. वरील विषयाची तात्त्विक माहिती

आत्म्याच्या जीव, जीवात्मा, शिवात्मा आणि शिव अशा चार अवस्था असतात.

७.  कै. (सौ.) शालिनी मराठेकाकू यांच्या शिवात्म्याला विष्णुदूतांनी प्रथम वैकुंठात आणि नंतर जनलोकात नेण्यामागील आध्यात्मिक कार्यकारणभाव

कै. (सौ.) शालिनी मराठेकाकूंचा आत्मा ‘शिवात्मा’ अवस्थेत गेला. ही अवस्था आध्यात्मिक असल्यामुळे तिचा विशिष्ट देवतेशी काहीही संबंध नसतो. त्यामुळे आत्मा ‘शिवात्मा’ झाल्यावर त्याला शिवलोकात जायला हवे असे नाही. असा आत्मा जनलोक, तपोलोक किंवा सत्यलोक येथे जातो. कै. (सौ.) शालिनी मराठेकाकूंनी आयुष्यभर विष्णूची उपासना केल्यामुळे त्यांच्या सगुण भक्तीचे फळ त्यांना देण्यासाठी त्यांना घेण्यासाठी विष्णुदूत आले आणि त्यांनी त्यांच्या शिवात्म्याला वैकुंठात नेले. त्यानंतर त्यांच्या निर्गुण भक्तीत वृद्धी होण्यासाठी त्यांच्याकडून मृत्यूत्तर समष्टी साधना करवून घेण्यासाठी विष्णुदूतांनी त्यांच्या शिवात्म्याला जनलोकात नेले.

८. कृतज्ञता

‘अशा प्रकारे एका सात्त्विक जिवाचा महर्लाेक ते प्रथम वैकुंठ आणि नंतर जनलोक असा प्रवास पूर्ण करून कै. (सौ.) शालिनी मराठेकाकूंच्या रूपातील सात्त्विक जिवाला संतपद बहाल करून त्याचा आत्मोद्धार करणार्‍या विष्णुस्वरूप परात्पर गुरुदेवांच्या चरणी कोटीश: कृतज्ञता ! सूक्ष्म परीक्षणाच्या सेवेच्या माध्यमातून कै. (सौ.) शालिनी मराठेकाकूंच्या दिव्य मृत्यूत्तर प्रवासातील आध्यात्मिक पैलू आणि त्यामागील गूढ अध्यात्मशास्त्र उलगडून दाखवणार्‍या श्रीगुरूंच्या चरणी कोटी कोटी नमन अन् कृतज्ञता !’

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.७.२०२२)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • सूक्ष्म परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म परीक्षण’ म्हणतात.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक