गणेशभक्तांची कोणतीही गैरसोय होणार नाही, याची सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावी ! – जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी

गणेशोत्सवाच्या कालावधीत करायच्या उपाययोजना, बंदोबस्त आणि कामकाज यांसाठी आढावा बैठक

जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी

सिंधुदुर्गनगरी, १० ऑगस्ट (जि.मा.का.) – गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने गणेशभक्त जिल्ह्यातील त्यांच्या गावी येत असतात. या गणेशभक्तांची कोणतीही गैरसोय होणार नाही, याची विशेष दक्षता सर्व यंत्रणांनी घ्यावी. या कालावधीत वाहतूक सुरळीत राहील, याची विशेष काळजी घ्यावी. नगर परिषद, नगर पंचायत, ग्रामपंचायत यांनी विविध स्पर्धांच्या माध्यमातून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा होण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केली.

गणेशोत्सवाच्या कालावधीत करावयाच्या उपाययोजना, बंदोबस्त आणि कामकाज यांचा आढावा घेण्यासाठी १० ऑगस्टला बैठक घेण्यात आली. बैठकीला पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकुमार काळे, प्रांताधिकारी वैशाली राजमाने, वंदना खरमाळे, प्रशांत पानवेकर आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी म्हणाल्या, ‘‘सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना ध्वनीप्रदूषणाची व्यवस्थित माहिती देण्यात यावी. (वर्षातून एकदा येणार्‍या गणेशोत्सवाच्या वेळी गणेशोत्सव मंडळांना ध्वनीप्रदूषणाची माहिती करून देण्यात येते, तशी ३६५ दिवस मशिदींतून पहाटे ५ वाजल्यापासून ५ वेळा होणार्‍या अजानच्या वेळी होणार्‍या ध्वनीप्रदूषणाची माहिती संबंधितांना प्रशासनाने द्यावी, ही अपेक्षा ! – संपादक) कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने फिरत्या पोलीस पथकांचे नियोजन करावे. रहदारीच्या ठिकाणी वाहनांची कोंडी होणार नाही, असे पहावे. महामार्गावर वाहतुकीस अडथळा होणारी घटना घडल्यास ‘क्रेन’ (जड वस्तू उचलण्याचे यंत्र) आणि ‘जेसीबी’ (माती उचलण्याचे यंत्र) यांची सोय करावी. महामार्गानजीकचे ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे खासगी रुग्णवाहिकांचे संपर्क क्रमांक असावेत. गणेशभक्तांसाठी विशेष रेल्वे येणार आहेत. त्यासाठी परिवहन महामंडळाने तेथून गावी जाण्यासाठी बसगाड्यांची व्यवस्था करावी. महावितरणने वीजव्यवस्था सुरळीत रहावी, यासाठी साधनसामग्री आणि मनुष्यबळ यांची व्यवस्था करावी. श्री गणेशमूर्तींच्या आगमनाचा मार्ग, तसेच विसर्जनाचा मार्ग यांवरील रस्त्यांची डागडुजी करून घ्यावी. सर्वच यंत्रणांनी समन्वयाने गणेशोत्सव उत्साहात आणि चांगल्या पद्धतीने पार पडेल, यासाठी प्रयत्न करावेत.’’

पोलीस अधीक्षक दाभाडे म्हणाले, ‘‘गणेशोत्सवाच्या आधी २ दिवस पोलिसांनी वाहतुकीची कोंडी होणार नाही, याचे नियोजन करावे. रात्रीच्या वेळी वळणांवर घाटमार्गावर ‘रिफ्लेक्टर’ (रस्त्याच्या कडेला बसवलेल्या काळोखात चकाकणार्‍या धातूच्या पट्ट्या) बसवावेत.’’

निवासी उपजिल्हाधिकारी भडकवाड म्हणाले, ‘‘सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग, महामार्ग प्राधिकरण यांनी विशेषतः घाट मार्गांविषयी दक्ष राहून तात्काळ दुरुस्तीची कामे चालू करावीत. रस्त्यावरील खड्डे बुजवावेत. काही कारणास्तव गणेशभक्तांना घेऊन येणार्‍या रेल्वे थांबल्यास प्रवाशांच्या खाण्याची आणि पाण्याची सोय रेल्वे विभागाने करावी. महामार्गानजीकचे ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्र यांठिकाणी आपत्कालीन सुविधा ठेवावी.’’