बाबा वंगा यांची भविष्यवाणी : सायबेरियात जीवघेण्या विषाणूचा शोध लागेल !

मुंबई – युरोपीय देश बल्गेरियातील अंध असलेल्या मागील शतकातील प्रसिद्ध भविष्यवेत्त्या वांगेलिया पांडेवा गुश्तेरोवा उपाख्य बाबा वंगा यांनी आतापर्यंत वर्तवलेली अनेक भाकिते सत्य ठरली आहेत. त्यांनी वर्ष २०२२ मध्ये होणार्‍या अनेक घडामोडींविषयी केलेल्या भाकितांपैकी ‘सायबेरियामध्ये संशोधकांना एक प्राणघातक विषाणू सापडेल, जो आतापर्यंत गोठलेला होता. जागतिक तापमानवाढीमुळे हा विषाणू मोठ्या प्रमाणात पसरेल’, हे भाकित महत्त्वपूर्ण मानले जात आहे.

त्यांनी अनेक वेळा मनुष्य आणि पृथ्वी यांचा र्‍हास होणार असल्याची भाकिते वर्तवली आहेत.

वर्ष २०२२ साठीची खरी ठरलेली २ भाकिते !

बाबा वंगा म्हणाल्या होत्या की, अनेक आशियाई देश आणि ऑस्ट्रेलिया येथे भीषण पूर येईल. तसेच जगातील अनेक शहरांमध्ये दुष्काळाची शक्यता आहे. सध्या भारत, ऑस्ट्रेलिया अशा अनेक देशांत पूर आला आहे. तसेच युरोपातील अनेक भागात भीषण दुष्काळ आहे. इटली तर वर्ष १९५० नंतरच्या सर्वांत भीषण दुष्काळातून जात आहे.

परग्रहवासियांकडून पृथ्वीवर होणार आक्रमण !

अन्य एका भाकितात त्या म्हणाल्या होत्या की, वर्ष २०२२ मध्ये ‘ओमुआमुआ’ नावाचा एक लघुग्रह परग्रहवासियांकडून (‘एलियन्स’कडून) पृथ्वी ग्रहावरील जीवनाचा शोध घेण्यासाठी पाठवला जाईल. त्यानंतर हे ‘एलियन्स’ पृथ्वीवरील लोकांवर आक्रमण करू शकतात.

अन्य एका भविष्यवाणीत त्यांनी सांगितले होते की, लोकांचा इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरण्याचे प्रमाण वाढेल. त्यामुळे लोकांची मानसिक स्थिती बिघडेल.

भारतातील तापमान ५० अंशांच्या जवळ पोचून टोळांचे आक्रमण होईल !

बाबा वंगा यांनी वर्ष २०२२ साठी भारतासंदर्भातही महत्त्वपूर्ण भाकीत वर्तवले आहे. त्या म्हणाल्या होत्या  की, वर्ष २०२२ मध्ये भारतातील तापमान वाढ होईल. देशात कमाल तापमान ५० अंश सेल्सिअसच्या जवळ पोचेल. यामुळे टोळांचे प्रमाण वाढेल. हे टोळ शेतातील पिकांवर आक्रमण करतील. यामुळे मोठी हानी होऊ शकते.