जालना येथील अनधिकृत मशिदीविषयी २ आठवड्यांत निर्णय घ्या !  

मुंबई उच्च न्यायालयाकडून राज्य सरकारच्या जिल्हा समितीला निर्देश  

मुंबई उच्च न्यायालय

मुंबई – मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठाने जालना शहरातील सार्वजनिक ठिकाणी मशिदीचे अनधिकृत बांधकाम केल्याचा आरोप असणार्‍या जनहित याचिकेवर नुकतीच सुनावणी केली. या वेळी न्यायालयाने ‘या अनधिकृत मशिदीविषयी २ आठवड्यांत योग्य तो निर्णय घ्या’, असे निर्देश राज्य सरकारच्या जिल्हा समितीला दिले. जालना येथील आर्य समाजाने गेल्या आठवड्यात प्रविष्ट केलेल्या या जनहित याचिकेत अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी प्रशासनाला निर्देश देण्याची मागणी करण्यात आली आहे. या याचिकेत म्हटले आहे, ‘‘मंदिर, चर्च, मशीद आणि गुरुद्वारा आदींच्या नावे कोणतेही अनधिकृत बांधकाम करू नये’, असा निर्णय वर्ष २००९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशानंतरही अनधिकृतपणे मशीद बांधण्यात आली असून ती हटवण्यात स्थानिक प्रशासन हलगर्जीपणा करत आहे.’’

मशिदीच्या बांधकामाला उत्तरदायी असलेल्यांनाही पुढील सुनावणीला उपस्थित रहाण्याचा आदेश !

खंडपिठाने म्हटले आहे की, निर्देशावर २ आठवड्यांत जिल्हा समितीने योग्य निर्णय घ्यावा आणि २६ जुलै या दिवशी होणार्‍या पुढील सुनावणीपूर्वी सरकारी अधिवक्त्यांनी न्यायालयासमोर त्याविषयीची माहिती द्यावी. यासह न्यायालयाने ‘मशिदीच्या बांधकामाला उत्तरदायी असलेल्यांनाही पुढील सुनावणीला उपस्थित रहावे, अन्यथा त्यांच्या विरोधात कारवाई केली जाईल’, अशी चेतावणी दिली आहे.

मशीद बांधणार्‍यांना अनुमती दिलेली नाही ! – जालना नगर परिषद

याचिकाकर्त्यांचे अधिवक्ता आशिष जाधवर यांनी ‘जिल्हा वक्फ बोर्ड अधिकार्‍यांच्या सांगण्यावरून जालना नगर परिषदेच्या क्षेत्रात मशीद उभी आहे’, असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. जालना नगर परिषदेने दिलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, मशीद बांधणार्‍यांना कोणत्याही प्रकारची अनुमती दिलेली नाही. या बांधकामामुळे प्रस्तावित रस्त्याच्या कामावर परिणाम झाला आहे.

(सौजन्य : द इंडियन एक्स्प्रेस)

संपादकीय भूमिका

  • न्यायालयाला असे निर्देश का द्यावे लागतात ? प्रशासनाच्या हे का लक्षात येत नाही ?
  • अनधिकृत मशीद बांधेपर्यंत प्रशासन झोपले होते का ? यास उत्तरदायी असलेल्यांना सरकारने कारागृहात टाकले पाहिजे !