फुकाचे बोल !

भाजपच्या माजी प्रवक्त्या नूपुर शर्मा आणि मौलाना तौकीर रझा

उत्तरप्रदेशच्या बरेली येथील मौलाना तौकीर रझा यांनी भाजपच्या माजी प्रवक्त्या नूपुर शर्मा यांच्या विधानाचा निषेध करण्यासाठी २० जून या दिवशी एक सभा घेतली. केवळ दीड सहस्रांची अनुमती असतांना सहस्रावधी मुसलमान या सभेला आले. त्यामुळेच कि काय उत्तेजित होऊन मौलानांनी या सभेत इतकी गरळओळ चालू केली की, विचारता सोय नाही. या वेळी त्यांनी काही आक्षेपार्ह विधाने केली. त्यांपैकी एक आक्षेपार्ह विधान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी केले. या सभेत त्यांनी पंतप्रधानांना मुसलमान होण्याचे आवाहन केले. हिंदूबहुल देशाच्या हिंदुत्वनिष्ठ पक्षाच्या पंतप्रधानांना अशा प्रकारे आवाहन करून त्यांनी कोट्यवधी हिंदूंना वाकुल्या दाखवल्या आहेत. ‘नरेंद्र मोदी आणि अमित शहा मुसलमान झाल्यास आम्ही त्यांना डोक्यावर बसवू ?’, अशा प्रकारे उर्मट विधान करण्याचे धारिष्ट्य मौलानांना होणे, हे काँग्रेसने गेल्या ५५ वर्षांत मुसलमानांच्या केलेल्या लांगूलचालनाचे फलित आहे. हिंदुत्वनिष्ठ पक्षांचे नेते आणि संघटना यांच्यावर ते ‘देशाला दोन तुकड्यांत विभागायला निघाले आहेत’, असा आरोप काँग्रेसवाले अन् साम्यवादी सतत करत असतात. आता पंतप्रधानांना अशा प्रकारचे जाहीर आवाहन करणाऱ्या मौलानांच्या संदर्भात त्यांना काय म्हणायचे आहे ?

मुसलमानांचे देशविरोधी नेते !

मौलानांच्या या सभेत कोविडचे आणि ध्वनीप्रदूषणाचे नियम पाळले गेले नाहीत. भारतात कोरोना पसरवण्यास उत्तरदायी ठरलेले आणि देहली दंगलीच्या संदर्भात आरोप असणारे तबलिगी जमातीचे प्रमुख मौलाना साद हे फरार झाल्यावर गुन्हे शाखेचे पोलीस त्यांच्या पाठीमागे लागले होते. देशातील मुसलमान समाजाला देशाच्या मुख्य प्रवाहात येण्यापासून रोखणारे मुसलमानांचे या मौलानांसारखे नेतेच आहेत, असे म्हटले तर चूक ठरू नये. मुसलमानांना एकत्र करून त्यांना हिंदूंच्या विरोधात सतत भडकावत ठेवले की, यांचा कुटील हेतू साध्य होतो. त्यामुळे विविध फतवे काढणे, शुक्रवारच्या नमाजानंतर भाषणे करून त्यांना दंगली करण्यास उद्युक्त करणे, अशा गोष्टी करून देशातील वातावरण सतत धगधगते ठेवण्याचा प्रयत्न मुसलमानांचे धार्मिक नेते करत असतात. ‘अग्नीपथ’ योजनेला विरोध म्हणून जी दंगलसदृश आंदोलने देशभर चालू झाली आहेत, त्यात धर्मांध सहभागी असल्याचे पुढे येत आहे. योजनेला विरोध करणाऱ्या आंदोलनात एका धर्मांधाला रेल्वेच्या डब्याला आग लावतांना एका पोलिसाने रंगेहात पकडल्यावर लक्षात आले की, तो केवळ ३ री शिकलेला असून अन्य एका धर्मांधाने त्याला १ सहस्र रुपये आणि भगवा ‘टी शर्ट’ देऊन रेल्वे पेटवण्यास सांगितले. हे सर्व धर्मांधांना करण्यास कुणी उद्युक्त केले ? वरील सभेत मौलाना तौकीर रझा यांनी ‘अग्नीपथ’ योजनेवरही टीका केली. ‘सरकारने तरुणांचे जीवन उद्ध्वस्त करण्याचा ठेका घेतला आहे’, असे ते म्हणाले. आता वरील उदाहरणावरून तरुणांचे जीवन कोण उद्ध्वस्त करत आहे ? ते कुणीही सांगेल. देशाच्या विरोधात मुसलमानांना भडकावण्याचे, दहशत निर्माण करण्याचे, सार्वजनिक मालमत्तेची हानी करण्याचे काम हे मुसलमानांचे धार्मिक नेते करतात, असे काही घटनांतून पुढे येते. अग्नीपथ योजनेला मौलानांकडून एवढ्या मोठ्या प्रमाणात विरोध होणे, हेच ही योजना देशात दंगली माजवणाऱ्या धर्मांधांच्या बंदोबस्तासाठी किती आवश्यक आहे, हेही अप्रत्यक्षपणे सिद्ध करते.

हिंदूंच्या देशाचे नेते – मोदी !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या कार्यकाळात त्यांच्या कर्तृत्वाने आणि नेतृत्वाने एवढी लोकप्रियता मिळवली आहे की, केवळ देशातील हिंदूंनीच नव्हे, तर विदेशातील हिंदू अन् आंतरराष्ट्रीय नेते यांनीही त्यांना डोक्यावर घेतले आहे, असे म्हटले, तर चूक नव्हे. गोध्रा प्रकरणानंतर मोदी यांच्या गुजरातमधील कार्यकाळात एकही दंगल झाली नाही. मोदी यांनी राममंदिराची उभारणी कायद्याच्या कसोटीवर पूर्ण करून ते कार्य पूर्णत्वास नेत आणले आहे. त्यांनी जम्मू-काश्मीरमधील ‘कलम ३७०’ हटवण्याचा धाडसी निर्णय घेतला, तो हिंदूंच्या हितासाठीच घेतला आहे. येणाऱ्या हिंदूंच्या पिढीला हिंदूंचा खरा इतिहास कळावा, यासाठी हिंदुद्रोही पाठ्यक्रम पालटून हिंदूंच्या पराक्रमाचा सत्य इतिहास त्यांच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न मोदी यांच्या कार्यकाळात चालू झाला आहे. ‘काशी-विश्वेश्वर कॉरिडोर’ प्रकल्पाची निर्मिती करून हिंदूंच्या श्रद्धास्थानांची पुनर्उभारणी करण्याचा पायंडा पाडला आहे. नुकतेच गुजरातमध्ये ५०० वर्षांपूर्वी धर्मांधांनी कह्यात घेतलेल्या महाकाली मंदिरावर हिंदु धर्मध्वजाची पताका मोदी यांच्या हस्ते फडकावण्यात आली. विशेष म्हणजे या मंदिरावर निर्माण झालेल्या दर्ग्याच्या लोकांनी त्याचे हस्तांतर केले. अशाच प्रकारे देशात मंदिरांवर अधिकार निर्माण केलेल्या मशिदींच्या प्रमुखांनी केले, तर हिंदूंना त्यांची मंदिरे परत मिळू शकतील; पण हा पायंडा पाडण्याचे श्रेय मोदी यांच्याकडे जाते. पंतप्रधान ज्या राज्यात किंवा ज्या देशात जातात, तेथील हिंदूंच्या मंदिरात आवर्जून जाऊन ते पूजा करतात. पंतप्रधान मोदी हे धार्मिक हिंदु आहेत, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. असे असतांना मौलानांसारख्या व्यक्तीने सहस्रो धर्मांधांसमोर त्यांचे नाव घेऊन अशा प्रकारे हिंदूंचा अवमान केल्याने ‘ते कठोर कारवाई करण्याच्या पात्रतेचे आहेत’, असेच हिंदूंना वाटते. काँग्रेसने केलेल्या मुसलमानांच्या लांगूलचालनानंतर हिंदुहिताचे काम करणारा नेता देशाचा पंतप्रधान होणे, ही हिंदूंसाठी दिलासादायक गोष्ट आहे. असे असतांना अशा प्रकारे विधाने करून हिंदूंना डिवचण्याचे काम मौलाना रझा यांनी केले आहे. भारतासह विदेशातही ‘मोदी मोदी’ नावाचा गजर होत असतांना ‘असा नेता मुसलमानांनाही मिळावा’, असे कदाचित् रझा यांना वाटत असेल, तर त्यांनीच सभेला आलेल्या सर्व मुसलमानांना घेऊन हिंदु व्हावे !

देशाच्या पंतप्रधानांना धर्मांतराचे आवाहन करणाऱ्यांना कडक शासन हवे, असे हिंदूंना वाटते !