VIDEO : सर्व संत आणि महात्मे यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्य करणे आवश्यक ! – पू. परमात्माजी महाराज, धारवाड, कर्नाटक

रामनाथी, १६ जून (वार्ता.) – जेव्हा धर्मावर अधर्म वरचढ झाला, तेव्हा भगवान परशुरामाने परशू धारण केला. अशा परशुरामाला आपण आदर्श मानले पाहिजे. ही तपस्या करण्याची नव्हे, तर युद्ध करण्याची वेळ आहे. प्रत्येक संत आणि संन्यासी यांनी रस्त्यावर येऊन हिंदु राष्ट्राची मागणी करायला हवी. ही चर्चेची नव्हे, तर युद्ध करण्याची वेळ आहे. सर्व संत आणि महात्मे यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्य करणे आवश्यक आहे, असे आवाहन कर्नाटकातील धारवाड येथील पू. परमात्माजी महाराज यांनी केले. दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदूंचे संघटन’ या उद्बोधन सत्रात ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आध्यात्मिक संस्थाच्या एकतेसाठी केलेले प्रयत्न’ या विषयावर ते बोलत होते.

पू. परमात्माजी महाराज

या वेळी व्यासपिठावर स्वामी आत्मस्वरूपानंद महाराज, गोवा येथील ‘भारत माताकी जय संघा’चे राज्य संघचालक प्रा. सुभाष वेलिंगकर, सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस हे उपस्थित होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे पूर्व उत्तर प्रदेश आणि बिहार राज्य समन्वयक श्री. विश्‍वनाथ कुलकर्णी यांनी स्वामी आत्मस्वरूपानंद यांचा तर, श्री. काशीनाथ प्रभु यांनी पू. परमात्माजी महाराज यांचा पुष्पहार अर्पण करून सन्मान केला.

या वेळी पू. परामात्माजी म्हणाले,

१. संतांकडे पहाण्याचा दृष्टीकोन आपण पालटायला हवा. जे संत अधिक बोलतात, प्रवास करता त्यांना अज्ञानी मानले जाते; परंतु जे मौन बाळतात, मठात रहातात त्यांनाच संत मानले जाते. बोलणार्‍या संतांची प्रसारमाध्यमांद्वारे अपकीर्ती केली जाते.

२. हिंदु राष्ट्र स्थापन करण्याचे कार्य योगी आदित्यनाथ यांच्यासारखे राज्यकर्ते करतील.  ‘मोठा आश्रम, लाखो भक्तगण असायला हवेत’, असे काही संतांना वाटते. त्यांनाही ‘धर्मासाठी काहीतरी करावे’, असे वाटते; परंतु ‘समाजात मिसळल्यास स्वत:चे मूल्य न्यून होईल’, असे त्यांना वाटते.

३. जे हिंदु राष्ट्रासाठी संघर्ष करतील, त्यांनाच महत्त्व द्यायला हवे. सर्व संत आणि आध्यात्मिक संस्था यांनी एकत्रित येऊन हिंदु राष्ट्राची घोषणा केल्यास हिंदु राष्ट्राची स्थापना उद्याच होईल.

… तर हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे कार्य सुलभ होईल !

भारत आध्यात्मिक भूमी आहे. इतिहास पाहिल्यास भारतामध्ये जेव्हा कोणताही पालट झाला, तो आध्यात्मिक संस्थांनीच केला आहे. आपल्या देशात आध्यात्मिक संस्था आणि संत यांची संख्या मोठी आहे. हे सर्व हिंदु राष्ट्राच्या मागणीसाठी एकत्र आले, तर हिंदु राष्ट्र स्थापन करण्याचे कार्य सुलभ होईल.

संतांकडील धन धर्मकार्यासाठी उपयोगात आणायला हवे !

प्रत्येक मुसलमान स्वत:च्या कमाईमधील १० टक्के पैसा इस्लामसाठी मौलानाला देतात. हिंदु संत त्यांच्याकडील धन शैक्षणिक संस्था, वैद्यकीय सोयी यांसाठी व्यय करतात. आपल्या संतांकडील धनही धर्मकार्यासाठी उपयोगात आणायला हवे.

संतांनी आद्य शंकाराचार्य यांच्याप्रमाणे कार्य करायला हवे !

आद्य शंकराचार्य यांनी सनातन धर्माच्या प्रचारासाठी प्रवास केला. अन्य संतांसमवेत धर्मासाठी वार्तालाप केला. धर्मप्रचारासाठी ते कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत गेले. काश्मीरमध्ये जेव्हा क्रूर ‘हूण’ लोक हिंदु धर्माला नष्ट करण्यासाठी आले, तेव्हा शंकराचार्यांनी रुद्राक्ष धारण करणार्‍या ११ सहस्र संतांच्या हातात त्रिशूळ देऊन हुणांचा सर्वनाश केला. ज्या वेळी शास्त्रालाप आवश्यक होता, तेव्हा शंकराचार्यांनी शास्त्रालाप केला; परंतु जेव्हा शस्त्राची आवश्यकता होती, तेव्हा हातात शस्त्र घेतले. कोणत्या वेळी कोणते कार्य करावे, याला महत्त्व आहे. ज्या वेळी शास्त्राने काम होत नाही, तेव्हा शस्त्र हाती घ्यावे लागते.

हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना पू. परमात्माजी महाराज यांचे आशीर्वाद !

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यामागे परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अद्भुत शक्ती आहे. त्यांचे मी स्मरण करतो. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाचे आयोजन करणार्‍या हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना मी आशीर्वाद देतो. भगवंताने जे दिले आहे, ते सर्व हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी समर्पित करावे. आपणाला भगवंताचे आशीर्वाद आहेत.

 हिंदु राष्ट्राची स्थापनेच्या उद्देशाने हिंदु संघटन

 गोवा येथे इंक्विजीशनद्वारे केलेल्या क्रूर अत्याचारांची माहिती गोवा येथील नवीन पिढीला देणे आवश्यक ! – प्रा. सुभाष वेलिंगकर, राज्य संघचालक, भारतमाता की जय संघ, गोवा

‘गोवा फाइल्स’ गोमंतकीयांसमोर ठेवणार !

प्रा. सुभाष वेलिंगकर

रामनाथी (फोंडा), १६ जून (वार्ता.) – भगवान परशुरामच गोव्याचे रक्षणकर्ते आहेत. त्यामुळे येथील कथित संत फ्रान्सिस झेवियरला ‘गोंयचो सायब’ (गोव्याचा साहेब) म्हणणे चुकीचे आहे. गोव्यामध्ये इंक्विझीशन ही क्रूर यंत्रणा आणण्यास फ्रान्सिस झेवियर हाच पूर्णपणे उत्तरदायी होता. त्यामुळे गोवा येथे होली इंक्विझीशनने २५० हून अधिक वर्षे केलेल्या क्रूर अत्याचारांची माहिती आताच्या गोवा येथील नव्या पिढीला देणे आवश्यक आहे. यासाठीच ‘गोवा फाइल्स’ गोमंतकियांसमोर ठेवणार आहे, असे प्रतिपादन गोवा येथील भारतमाता की जय संघाचे राज्य संघचालक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी केले. ‘हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या एकतेचा यशस्वी प्रयोग : हिंदु रक्षा महाआघाडी’, या विषयावर ते बोलत होते.

श्री. सुभाष वेलिंगकर पुढे म्हणाले की,

१. गोवा राज्यात गेल्या ४५० वर्षांत क्रूर सैतानी पोर्तुगीज यांनी हिंदूंचा छळ केला. हिंदु मंदिरांचा विध्वंस, हिंदूंची हत्या, देवतांच्या मूर्तींचे भंजन, धर्म वाचवण्यासाठी हिंदूंचे स्थलांतर, अशा सर्व गोष्टींचा सामना गोवा येथील हिंदूंना एकाच वेळी करावा लागला होता.

२. गोवा येथील राजकीय पक्ष अल्पसंख्यांकांचे तृष्टीकरण करण्यात धन्यता मानत आहेत. त्यांचे हिंदु समाजाकडे लक्ष नाही. विदेशींची गुलामी राजवट संपली, तरी नवीन राजकीय गुलामी हिंदु समाजाला जखडली आहे. हे हिंदु समाजासमोरील आव्हान आहे.

३. गोवा येथील प्रत्येक घरात मुसलमान आणि ख्रिस्ती यांची लोकसंख्या वाढत आहे. गोवा येथे रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमानांची घुसखोरी वाढली आहे.

४. राजकीय पक्षांच्या पाठिंब्यामुळे गोवा राज्यात ३१ ठिकाणे ‘छोटी पाकिस्ताने’ झाली आहेत. मुसलमानांनी प्रशासनावर दबाव टाकायला प्रारंभ केला आहे. गोवा येथील प्रत्येक गावात मुसलमान घुसलेला आहे. येथे ‘पॉप्युलर फ्रंट इंडिया’ ही आतंकवादी संघटना सक्रीय झाली आहे.

५. गोवा येथील धर्मांध हे मुख्यमंत्र्यांना चेतावणी देऊन ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देतात. या सर्व गोष्टींचा सामना करण्यासाठी हिंदु समाजाचे संघटन करणे आवश्यक आहे.

६. गोवा येथील लहान मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या ३५० प्रतिनिधींना घेऊन आम्ही हिंदु रक्षा महाआघाडीची स्थापना केली आहे. धर्मांतराचा विरोध, जिहाद विरोध, मंदिर सुरक्षा, धर्मशिक्षण, हिंदु संस्कार समर्पण अशी पंचसूत्री सिद्ध करून त्यानुसार कार्य करण्यात येत आहे. गोवा राज्यातील सर्व संस्था स्वतःचे कार्य करत असतांना या पंचसूत्रींचा त्यांच्या कार्यप्रणालीत अंतर्भाव करण्यात आला आहे. तसेच हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व वाढवण्यासाठी गोवा राज्यातील १२ तालुक्यांची समिती गठीत केली आहे.

अधिवेशनात पोर्तुगिजांनी हिंदूंवर केलेल्या अत्याचारांच्या प्रदर्शनाचे आयोजन !

अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन चालू असलेल्या विद्याधिराज सभागृहात ‘गोवा फाइल्स’ म्हणजे पोर्तुगिजांनी हिंदूंच्यावर केलेले अत्याचारांच्या संर्दभातील प्रदर्शन लावण्यात आले होते. हे प्रदर्शन पाहून हिंदूंवर झालेल्या अत्याचारांची दाहकता उपस्थित हिंदुत्वनिष्ठ, धर्मप्रेमी, हितचिंतक यांच्या लक्षात आली.

९ राज्यांतील ३६ जिल्ह्यांत आयोजित ‘हिंदु राष्ट्र अधिवेशनां’ना २ सहस्रांहून अधिक स्थानिक हिंदुत्वनिष्ठांचा सहभाग ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था  

चेतन राजहंस

भारतात प्रवास करतांना आम्ही जिल्हा पातळीवर ‘हिंदु राष्ट्र अधिवेशने’ आयोजित केली. यावर्षी कोरोनानंतर देशातील ९ राज्यांतील ३६ जिल्ह्यांत ‘हिंदु राष्ट्र अधिवेशने’ आयोजित करण्यात आली. यात २ सहस्र १०० एवढ्या स्थानिक हिंदुत्वनिष्ठांनी सहभाग नोंदवला आहे. सर्वच राज्यांतील आध्यात्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, स्वदेशी अशा विविध क्षेत्रांतील संस्थांना हिंदु राष्ट्र-स्थापनेचा विचार सांगितल्यानंतर त्यांनी त्यांच्या क्षमतेनुसार त्यांच्या समुदायासमोर अथवा प्रसार करून आमच्या उपस्थितीत हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी व्याख्याने आयोजित केली. हिंदुत्वाविषयी मोठ्या प्रमाणात जागृती होत आहे. सामाजिक माध्यमांनंतर राष्ट्रीय प्रसारमाध्यमेही उघडपणे हिंदुत्वाच्या सूत्रावर बोलू लागली आहेत. उत्तर भारतातील काही राज्यांत हिंदुत्वाच्या शासनकर्त्यांनी उघडपणे हिंदुत्वाचा पुरस्कार आरंभल्याने आणि हिंदुहिताचे कायदे केल्याने ‘हिंदु राष्ट्र’ लवकर येईल, असा समज होऊ लागला आहे.

मानव, पशू, पक्षी, वृक्ष, वेली यांसह सूक्ष्मादीसूक्ष्म जिवांचे हित साधणारे हिंदु राष्ट्र असेल ! – पू. नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक संत, हिंदु जनजागृती समिती

पू. नीलेश सिंगबाळ

भौतिक विकासासाठीही धर्म महत्त्वाचा आहे. दुर्दैवाने भौतिक विकासालाच खरा विकास मानला जात आहे. मनुष्यावर जेव्हा कठीण प्रसंग ओढवतो, तेव्हा मानसिक संतुलन नष्ट होते. षड्रिपूंच्या निर्मूलनाचे महत्त्व भौतिक विकासात कुुठेही नाही. सीतेचे अपहरण करणार्‍या रावणाची लंकाही ‘स्मार्ट सीटी’ होती; परंतु तेथे रहाणारे राक्षस होते. आपणाला रामराज्य हवे आहे. लोकांना नीतीमान बनवणारा विकास आपणाला हवा आहे. धर्म हाच राष्ट्राचा प्राण आहे. प्राण नसेल, तर शरीर मृत होते. त्याप्रमाणे धर्माविना राष्ट्र मृत होय. यासाठी  धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची आवश्यकता आहे. लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी भूमी आणि संस्कृती यांवर आधारित हिंदु राष्ट्राची व्याख्या सांगितली. विश्‍व हिंदु परिषदेने समूहवाचक हिंदु राष्ट्राची व्याख्या सांगितली आहे. ‘मेरूतंत्र’ या ग्रंथामध्ये सांगितलेली हिंदु धर्माची व्याख्या ही आध्यात्मिक स्तरावरील आहे. हीन अशा कनिष्ठ विचारांचा नाश करून स्वत:त गुणांची वृद्धी करणारा हिंदू होय. ‘हिंदु राष्ट्राची स्थापना संसदीय मार्गाने होईल’, असे काहींना वाटते; परंतु सत्तेचा मोह असलेले राष्ट्ररचनेचे कार्य करू शकत नाहीत. राजकारण आणि राष्ट्ररचना ही दोन्ही कार्ये वेगवेगळी आहेत. सत्त्वगुण स्वत:चा नव्हे, तर विश्‍वकल्याणाचा विचार करतो. आपल्या ऋषीमुनींनी अशा प्रकारे विश्‍वकल्याणाचा विचार केला आहे. विश्‍वकल्याणाचा विचार करणारे असे धर्म धुरंधर सत्त्वगुणी लोकच हिंदु राष्ट्राची स्थापन करू शकतात, असे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे प्रखर विचार हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक पू. नीलेश सिंगबाळ यांनी सांगितले. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे हिंदु राष्ट्राविषयीचे विचार’ या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले.