रामनवमीला देशात झालेल्या दंगली कुणी केल्या, याचे सुजात आंबेडकर यांनी उत्तर द्यावे ! – आनंद दवे, ब्राह्मण महासंघ

सुजात आंबेडकर यांनी ‘दंगली ब्राह्मण घडवतात’, असे म्हटल्याचे प्रकरण !

ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे आणि सुजात आंबेडकर

पुणे – दंगली ब्राह्मण घडवतात, हे म्हणण्यापूर्वी काल परवा रामनवमीला देशात अनेक ठिकाणी दंगली झाल्या आहेत. त्या कुणी केल्या ?, याचे उत्तर सुजात आंबेडकर किंवा प्रकाश आंबेडकर यांनी द्यावे. सुजातकडून शहाणपणाच्या वक्तव्याची आमची अपेक्षा यापूर्वीही कधीच नव्हती आणि आताही नाही. त्यामुळे सुजात आंबेडकर यांच्या वक्तव्याच्या आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो, असे ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करतांना म्हटले आहे.

 (सौजन्य : Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स)

‘दंगल पेटवणारे सहसा उच्चवर्णीय किंवा ब्राह्मण असतात’, असे विधान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर यांनी केले होते. सुजात आंबेडकर यांच्या याच विधानावरून आता ब्राह्मण महासंघाने आक्षेप घेत निषेध नोंदवला आहे.


दवे पुढे म्हणाले की, अफगाणिस्तानमधील भगवान बुद्धाच्या प्रतिमांची तोडफोड कुणी केली ?, याचे उत्तर सुजातने प्रकाशजींना विचारावे आणि सांगावे. तिथे उच्चवर्णीय हिंदू होते कि आणखी कुणी होते ?, याचा अभ्यास सुजात यांनी करावा. हिंदु धर्म रक्षण करण्यासाठी आजसुद्धा आमचा दलित बंधू काम करत आहे. याच कारणामुळे आज आम्ही केवळ सुजातचा निषेध व्यक्त करून थांबत आहोत.