हिंदु राष्ट्राचा प्रारंभ स्वतःच्या घरापासून करावा ! – श्री श्री १०८ महंत श्री योगेश्वर दास महाराज

इंदूर (मध्यप्रदेश) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हिंदु राष्ट्र अधिवेशन’ पार पडले !

डावीकडून वालिपूर आश्रमाचे श्री. रविंद्र शर्मा, श्री. आनंद जाखोटिया, दीपप्रज्वलन करताना श्री श्री १०८ महंत श्री योगेश्वर दास महाराज आणि श्री. अभय वर्तक

इंदूर (मध्यप्रदेश) – हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा प्रारंभ स्वतःच्या घरापासून केला पाहिजे. प्रत्येक हिंदूंने आपल्या आचारविचारांतून हिंदु राष्ट्र प्रकट केले पाहिजे. गुरुजनांचा सन्मान, धर्मशास्त्राचा अभ्यास, शास्त्रीय पद्धतीने सण-उत्सव साजरा करणे या गोष्टींचा प्रारंभ आपल्या घरापासून केला पाहिजे. येणार्‍या काळात हिंदु समाजाला जागृत करून धर्माधिष्ठित करणे, हे आपल्या समोरील मोठे आव्हान आहे, असे प्रतिपादन श्री श्री १०८ महंत श्री योगेश्वर दास महाराज यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील हॉटेल प्रशांतच्या सभागृहात ‘हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या उद्घाटन सत्राला ते मार्गदर्शन करत होते. या अधिवेशनाला समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे ‘ऑनलाईन’ माध्यमातून उपस्थित होते. या अधिवेशनाला अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. याप्रसंगी विविध मान्यवरांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा निर्धार केला.

या अधिवेशनाला सर्वश्री हिंदरक्षक सेनेचे एकलव्य गौड, राष्ट्रीय स्वाभिमान आंदोलनचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सुनील शिंदे, अखिल भारतीय हिंदू महासभेचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र ठाकूर; आर्य समाज, इंदूरचे प्रचार प्रभारी अखिलेशचंद्र शर्मा, राष्ट्रीय स्वाभिमान आंदोलनाचे सुनील शिंदे, मित्रमेला संघटनेचे सचिव अधिवक्ता कुणाल भंवर, धर्मजागरण मंचचे विनोद मिश्रा, हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान समन्वयक आनंद जाखोटिया अन् सनातन संस्थेचे धर्मप्रचारक अभय वर्तक यांनीही संबोधित केले.

आदर्श राष्ट्र्र स्थापनेसाठी संघटित व्हा ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

आद्यशंकराचार्य आणि स्वामी दयानंद सरस्वती यांनी ‘वैदिक भारत’, स्वामी विवेकानंदांनी ‘जागृत भारत’, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि रा.स्व. संघाचे डॉ. हेडगेवार यांनी ‘हिंदु राष्ट्र’, पंडित श्रीराम शर्मा यांनी ‘युग निर्माण’, परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘ईश्वरी राज्य’ यांचे ध्येय आपल्या समोर ठेवले आहे. हे शब्द भिन्न असले, तरी त्यातील भाव एकच आहे. तो आहे ‘आदर्श राष्ट्र संस्थापना’ ! या आदर्श राष्ट्र संस्थापनेसाठी आपण संघटित झाले पाहिजे.

सामान्य व्यक्तीपर्यंत धर्म पोचवण्यासाठी हिंदु जनजागृती समितीचे प्रयत्न कौतुकास्पद ! – एकलव्य गौड, संयोजक, हिंदरक्षक सेना

आम्हाला हिंदु जनजागृती समितीकडून प्रेरणा मिळते. समिती सरळ सोप्या भाषेत सामान्य लोकांपर्यंत धर्म पोचवण्याचा प्रयत्न करत आहे. मी समितीला अनेक वर्षांपासून ओळखतो आणि तिच्या कार्याचा जवळून अभ्यास केला आहे. समिती हिंदुत्वाचे कार्य अभ्यासपूर्ण करत आहे. समितीचे सर्व संघटनांना जोडण्याचे कार्य कौतुकास्पद आहे.

अधिवेशनाला उपस्थित अन्य मान्यवर :

शिवसेनेचे पंडित धर्मेंद्र जोशी, वालिपूर आश्रमाचे श्री. रविंद्र शर्मा, ‘चैतन्य भारत’ संघटनेचे रोहितसिंह बेस, रा.स्व. संघाचे अधिवक्ता महेशकुमार गर्ग, भारत विकास परिषदेचे नरेंद्र गोयल यांच्यासह अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे अनेक प्रतिनिधी, हिंदु जनजागृती समितीच्या संकेतस्थळाचे आणि ‘सनातन प्रभात’ नियतकालिकाचे वाचकही उपस्थित होते.

इंदूर येथील रंगपंचमी आदर्श करण्यात यश मिळाले ! – एकलव्य गौड, संयोजक, हिंदरक्षक सेना

इंदूरची रंगपंचमी भारतभरात प्रसिध्द आहे. येथे एकेकाळी होळी आणि रंगपंचमी यांनी बिभत्स स्वरूप धारण केले होते. माझ्या पूजनीय वडिलांनी हे अपप्रकार थांबवण्यासाठी पुढाकार घेतला, तसेच हिंदु धर्माला अपेक्षित उत्सव साजरे करण्यासाठी प्रयत्न चालू केले. आज एक आदर्श उत्सव सर्वांसमोर ठेवण्यास आम्ही यशस्वी ठरलो आहोत.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी भारतातील शेतकर्‍यांना स्वयंपूर्ण बनवणे आवश्यक ! – सुनील शिंदे, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य, राष्ट्रीय स्वाभिमान आंदोलन

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी भारतातील शेतकर्‍यांना स्वयंपूर्ण बनवणे आवश्यक आहे. आज भारतात २० लाख कोटी रुपयांचे युरीया खत आणि ९ लाख कोटी रुपयांचे कीटकनाशके विकली जातात. जागतिक आरोग्य संघटनेने वर्ष २०३० पर्यंत ५० टक्के लोक कर्करोगाने ग्रस्त होतील, असे म्हटले आहे. या सर्व गोष्टींचा विचार करता याची व्यापक जनजागृती होणे आवश्यक आहे.

हलाल सर्टीफिकेशनवरील बंदीसाठी व्यापक जनजागृती आवश्यक ! – आनंद जाखोटिया, मध्यप्रदेश आणि राजस्थान समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

श्री. आनंद जाखोटिया

आज हलाल अर्थव्यवस्थेने भारतीय बाजारपेठेला विळखा घातलेला आहे. यातून मिळालेला पैसा मुसलमान आतंकवाद्यांना कायदेशीर साहाय्य देण्यासाठी वापरला जात आहे. त्यामुळे हलाल बंद होण्यासाठी व्यापक जनजागृतीची आवश्यकता आहे.

सर्वसामान्य हिंदूंना हिंदु राष्ट्राची आवश्यकता पटवून देणे महत्त्वाचे !– अभय वर्तक, धर्मप्रचारक, सनातन संस्था

श्री. अभय वर्तक

आज बहुतांश देशांमध्ये विज्ञान आणि लोकशाही असूनही मानवाला सुसंस्कृत बनवण्यात अपयशी ठरले आहेत. मानवाचे जीवन हिंदु राष्ट्रातच सदाचरणी होऊ शकते. आज जग तिसर्‍या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहे. त्यामुळे जगाला केवळ सनातन धर्माची शिकवणच दिशादर्शन करू शकेल.