श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची अमृतवचने !

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

१. साधना करतांना सारखे भावावस्थेत राहिलो, तर गुरु आपल्याला आयुष्यात काहीही अल्प पडू देत नाही.

२. आपल्या मनातील देवाच्या संदर्भातील विचार हेच आपले खरे सौंदर्य आहे.

३. साधनेत समष्टीमध्ये ईश्वरी कार्य करत समष्टीसाठी पुढे-पुढे जाणे, हाच खरा मोक्ष आहे.

४. सहवासापेक्षा श्रद्धाच कार्य करते. सहवास हा तात्कालिक आहे आणि श्रद्धा ही भाव-भक्ती वाढवणारी चिरंतन क्रिया आहे.

५. ‘गुरु प्रत्येक क्षणाला आपल्या समवेतच आहेत’, हे जो अनुभवतो, तो पुढे जातो आणि जो अनुभवू शकत नाही, तो मागे राहतो.

६. व्यवहारात लोकांना कार्य करण्यासाठी पदाची किंवा कोणाच्या तरी ओळखीची आवश्यकता लागते, तर साधकांना साधनेत पुढे जाण्यासाठी देवाच्या कृपेची आवश्यकता असते.

७. केवळ दिगंबर अवस्थेत राहून वैराग्य येत नाही, तर मनालाही तसे आतून घडवावे लागते.

८. कंटाळा येणे म्हणजे स्वतःतील देवत्व तेवढ्या काळापुरते संपुष्टात येणे. मन भावनेत गुंतले की, ‘कंटाळा येणे’ चालू होते. भावनेत मनुष्यस्वभाव गुंतलेला असतो, तर भावात देव असल्याने सर्व कार्य ईश्वरेच्छेने होते, यालाच ‘साधना’ म्हणतात.

९. देवाच्या दर्शनापेक्षा त्याच्या आर्त स्मरणामधे जास्त चांगले वाटते ! : याचे कारण दृश्यापेक्षा विचार जास्त सूक्ष्म असतात आणि दर्शन हे क्षणिक आहे.

१०. प्रार्थनेचे महत्त्व : प्रार्थनेची स्थिती म्हणजे चैतन्य ग्रहण करण्याची अवस्था. चैतन्याविना देह प्रकाशमय होऊ शकत नाही. त्यासाठी प्रार्थना हवी.

११. प्रत्येक कृतीला देवाशी जोडणे म्हणजे ‘अध्यात्म जगणे’ होय ! : प्रत्येक कर्माला अध्यात्माची जोड देणे म्हणजे ‘साधना’, उदा. कपड्यांचा खण आवरतांना ‘तो खण म्हणजे एक निर्गुण पोकळी आहे. त्यामुळे ही सगुणातील वस्त्रे तेथील निर्गुण चैतन्याने भारित होत आहेत’, असा भाव ठेवावा. आपल्यासाठी आणलेली नवीन वस्त्रे प्रथम देवाला दाखवावीत आणि मग तो देवाचा प्रसाद म्हणून परिधान करावीत. असे प्रत्येक कृतीला देवाशी जोडणे म्हणजे ‘अध्यात्म जगणे’ होय.

– श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ (२२.१०.२०१९)