आधुनिक रझाकार !

बोधन (तेलंगाणा) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा स्थापन करण्यास एम्.आय.एम्. आणि तेलंगाणा राष्ट्र समिती यांनी हिंसक विरोध केला. एम्.आय.एम्. हा पक्ष राष्ट्रघातकी आहे आणि धर्मांधांच्या हितांच्या रक्षणासाठी कार्यरत आहे. त्यामुळे या पक्षाने विरोध केल्यास आश्चर्य वाटत नाही; मात्र तेलंगाणा राष्ट्र समितीने विरोध करणे, हे संताप आणणारे आहे. हा पक्ष राज्यात सत्तेत आहे. त्यामुळे या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या स्थापनेला विरोध करणे हे एका अर्थी राज्य सरकारने छत्रपतींच्या पुतळ्याला विरोध करण्यासारखे आहे. त्या दृष्टीने या घटनेकडे गांभीर्याने पहाणे आवश्यक आहे.

छत्रपती शिवाजी महाराज ५ पातशाहांच्या विरोधात लढले. केवळ लढले नाहीत, तर त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आजच्या काळात हिंदूंना जिहादी आणि धर्मांध यांच्या विरोधात संघटित होऊन वैध मार्गाने लढण्याची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांकडून मिळते. तेलंगाणाने पूर्वी निजामाची अत्याचारी राजवट अनुभवली आहे. निजामाच्या रझाकारांनी हिंदूंवर केलेले अत्याचार आजही ताजे आहेत. तेलंगाणामध्ये आजही रझाकारांचे वंशज कार्यरत आहेत. त्यामुळे तेथील एका शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची स्थापना करण्यास होणारा विरोध ही हिंदूंसाठी धोक्याची घंटा आहे. ‘हिंदूंनी छत्रपतींकडून प्रेरणा घेतली, तर हिंदुविरोधी कारवायांना आळा बसेल’, असे धर्मांधांना वाटते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला एम्.आय.एम्.सारख्या पक्षाकडून होणार्‍या विरोधाला हे महत्त्वाचे कारण आहे. तेलंगाणा राष्ट्र समिती ही मुसलमानांच्या एकगठ्ठा मतांसाठी सातत्याने हिंदुविरोधी निर्णय घेत असते. छत्रपतींच्या पुतळ्याला या पक्षाकडून झालेल्या विरोधामागील कारणही हेच आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा स्थापन करण्यास तेलंगाणा राष्ट्र समिती आणि एम्.आय.एम्. यांचा हिंसक विरोध !

‘मुसलमानांच्या मतांवर सदासर्वकाळ सत्तेची फळे चाखू शकतो’, या भ्रमात रहाणार्‍या तेलंगाणा राष्ट्र समितीने उत्तरप्रदेशचे उदाहरण डोळ्यांसमोर ठेवावे. उत्तरप्रदेशमध्ये साधारण २० टक्के अल्पसंख्यांक आहेत. योगी आदित्यनाथ यांनी विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करण्यासाठी या २० टक्क्यांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी ८० टक्के हिंदूंना स्वतःकडे वळवले. हिंदूंनीही योगी आदित्यनाथ यांचे काम पाहून त्यांना भरभरून मते दिली. तेलंगाणामधील हिंदूंनीही संघटितपणा दाखवून तेलंगाणा राष्ट्र समितीला अद्दल घडवण्याचा निश्चय केल्यास या पक्षाचे अधःपतन निश्चित आहे. तेलंगाणातील हिंदूंना स्वाभिमानाने जगायचे असल्यास त्यांना आधुनिक रझाकारांच्या विरोधात वैध मार्गाने लढा देण्यासाठी उभे रहावेच लागेल. यासाठी तेथील हिंदू सिद्ध आहेत का ? बोधन प्रकरणातून तेलंगाणामधील सत्ताधारी पक्ष, प्रशासन आणि पोलीस हिंदूंच्या साहाय्यासाठी धावून येणार नाहीत, हे सिद्ध झाले आहे. हे लक्षात घेऊन परिणामकारक संघटन, हाच हिंदूंच्या प्रत्येक समस्येवरील उपाय आहे, हे जाणा !