विसर्ग आणि विसर्गसंधीचे प्रकार !

सनातनचे संस्कृतवर आधारलेले नाविन्यपूर्ण मराठी व्याकरण !

‘कोणतीही भाषा शुद्ध स्वरूपात कशी बोलावी, लिहावी आणि वाचावी ?’, याचे सुस्पष्ट दिशादर्शन करणारे नियम म्हणजे व्याकरण.’ प्राचीन काळी संस्कृत ही आर्यावर्तातील ज्ञानभाषा आणि दैनंदिन व्यवहाराची भाषा होती. पुढे संस्कृतपासून मराठी, हिंदी, गुजराती आदी भाषांची निर्मिती झाली. या भाषांचे व्याकरणही स्वतंत्रपणे लिहिले गेले; मात्र त्याचा पाया भाषाजननी संस्कृतचे व्याकरण हाच होता. परिणामी संस्कृतोद्भव भाषांचे व्याकरण शिकण्यासाठी संस्कृतचे व्याकरण ठाऊक असणे अनिवार्य बनले. आधुनिक काळात इंग्रजीच्या आक्रमणामुळे नव्या पिढीला संस्कृतवर आधारित स्वभाषेचे व्याकरण शिकणे अवघड बनले. या पार्श्वभूमीवर या लेखमालेमध्ये मराठीची स्वायत्तता आणि तिचे संस्कृतशी असलेले आध्यात्मिक नाते जपत व्याकरणाचे नियम मांडण्यात आले आहेत. सनातनचे निरनिराळी शैक्षणिक पार्श्वभूमी असलेले साधक, वार्ताहर, संकलक आदींना दृष्टीसमोर ठेवून ही मांडणी करण्यात आली आहे.

मागील लेखात आपण ‘विसर्ग म्हणजे काय ?’ आणि ‘विसर्गसंधी’चे दोन प्रकार पाहिले. या लेखात पुढील प्रकार जाणून घेऊ.

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी या लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/552317.html

(लेखांक ७ – भाग ७)

शब्दांना सांधून (जोडून) त्यांचा जोडशब्द बनवणारा ‘संधी’ !

४. संधीचे प्रकार

सुश्री (कु.) सुप्रिया नवरंगे

४ इ २. ‘विसर्गसंधी’चे प्रकार

(टीप : ‘विसर्गसंधी’च्या ‘४ इ २ अ’ आणि ‘४ इ २ आ’ या दोन प्रकारांची माहिती दैनिक ‘सनातन प्रभात’च्या रविवार, १३.२.२०२२ या दिवशीच्या अंकात प्रसिद्ध करण्यात आली आहे.)

४ इ २ इ. जोडशब्दातील पहिल्या शब्दाच्या शेवटी ‘स्’ असणे आणि दुसर्‍या शब्दाचे पहिले अक्षर एखादे व्यंजन असणे : आपण जाणतोच की, ‘मराठीतील ‘क’पासून ‘ळ’पर्यंतच्या अक्षरांना ‘व्यंजने’ असे म्हणतात.’ दोन शब्दांचा संधी होऊन सिद्ध झालेल्या जोडशब्दातील पहिल्या शब्दाच्या शेवटी ‘स्’ असेल आणि दुसर्‍या शब्दाचे पहिले अक्षर एखादे व्यंजन असेल, तर पहिल्या शब्दातील ‘स्’ लोप पावतो अन् त्याच्या जागी विसर्ग (ः) येतो. याचे उदाहरण पुढीलप्रमाणे आहे.

‘अधस् + पतन = अधःपतन’ या उदाहरणात ‘अधस्’ या शब्दाच्या शेवटी ‘स्’ आहे आणि ‘पतन’ या शब्दातील पहिले अक्षर ‘प’ हे व्यंजन आहे. त्यामुळे संधी होतांना ‘अधस्’मधील ‘स्’ लोप पावला आणि त्याच्या जागी विसर्ग (ः) येऊन ‘अधःपतन’ हा जोडशब्द सिद्ध झाला. याची आणखी काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

४ इ २ ई. जोडशब्दातील पहिल्या शब्दाच्या शेवटी ‘र्’ असणे आणि दुसर्‍या शब्दाचे पहिले अक्षर कठोर व्यंजन असणे : मराठीत ‘क्’, ‘ख्’, ‘च्’, ‘छ्’, ‘ट्’, ‘ठ्’, ‘त्’, ‘थ्’, ‘प्’, ‘फ्’, ‘श्’, ‘ष्’ आणि ‘स्’ ही तेरा कठोर व्यंजने आहेत. दोन शब्दांचा संधी होतांना पहिल्या शब्दाच्या शेवटी ‘र्’ असेल आणि दुसर्‍या शब्दातील पहिले अक्षर तेरा कठोर व्यंजनांपैकी एक असेल, तर पहिल्या शब्दातील शेवटचा ‘र्’ लोप पावतो अन् त्याच्या जागी विसर्ग (ः) येतो. याचे उदाहरण पुढे दिले आहे.

‘अंतर् + करण = अंतःकरण’ या उदाहरणात पहिल्या ‘अंतर्’ या शब्दाच्या शेवटी ‘र्’ आहे आणि दुसर्‍या ‘करण’ या शब्दातील पहिले अक्षर ‘क’ हे कठोर व्यंजन आहे. त्यामुळे या शब्दांचा संधी होतांना पहिल्या शब्दातील शेवटचा ‘र्’ लोप पावला आणि त्याच्या जागी विसर्ग (ः) येऊन ‘अंतःकरण’ हा शब्द सिद्ध झाला. याची आणखी काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत.

४ इ २ उ. जोडशब्दातील पहिल्या शब्दाच्या शेवटी असलेल्या ‘र्’च्या आधीचे अक्षर ‘अ’युक्त असणे आणि दुसर्‍या शब्दाच्या प्रथम स्थानी मृदू अक्षर असणे : ‘पुनर् + जन्म’ या दोन शब्दांपैकी ‘पुनर्’ या पहिल्या शब्दातील शेवटच्या ‘र्’च्या आधी ‘न’ हे अक्षर आले आहे. हे अक्षर ‘अ’युक्त आहे, म्हणजे त्याच्यामध्ये ‘अ’ हा स्वर मिसळलेला आहे. दुसर्‍या ‘जन्म’ या शब्दातील पहिले अक्षर ‘ज’ हे मृदू अक्षर आहे. (मृदू अक्षरांविषयीची सविस्तर माहिती दैनिक ‘सनातन प्रभात’च्या रविवार, १३.२.२०२२ या दिवशीच्या अंकात प्रसिद्ध करण्यात आली आहे.) या दोन शब्दांचा संधी होतांना ‘र्’ हे अक्षर ‘ज’ या मृदू अक्षरात मिसळून जाते आणि हा संधी ‘पुनर् + जन्म = पुनर्जन्म’ याप्रमाणे होतो. याची आणखी काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा: https://sanatanprabhat.org/marathi/556747.html

– सुश्री (कुमारी) सुप्रिया शरद नवरंगे, एम्.ए. (मराठी), बी.एड्., सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.२.२०२२) ॐ