ईश्वराकडून थेट मार्गदर्शन ग्रहण करण्याची क्षमता असल्याने ईश्वरी राज्य पुढे चालवू शकणारी सनातन संस्थेतील दैवी बालके !

‘सनातनच्या दैवी बालकांची अलौकिक गुणवैशिष्ट्ये’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संकल्पानुसार काही वर्षांतच ईश्वरी राज्याची स्थापना होणार आहे. अनेकांच्या मनात ‘हे राष्ट्र चालवणार कोण ?’, असा प्रश्न येतो. त्यासाठी ईश्वराने उच्च लोकांतून दैवी बालकांना पृथ्वीवर जन्म देऊन पाठवले आहे. या दैवी बालकांतील शिकण्याची वृत्ती, वैचारिक प्रगल्भता, त्यांच्यात उत्तम शिष्याचे अनेक गुण असणे, श्री गुरूंचे आज्ञापालन त्वरित करणे, त्यांना येणार्‍या अनुभूती आणि त्यांची सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता अशी अलौकिक वैशिष्ट्ये या सदरांतर्गत प्रसिद्ध करत आहोत.

आई-वडिलांनो, दैवी बालकांना साधनेत विरोध करू नका, तर त्यांच्या साधनेकडे लक्ष द्या !

‘काही दैवी बालकांचा आध्यात्मिक स्तर इतका चांगला असतो की, ती वयाच्या २० – २५ व्या वर्षीही संत होऊ शकतात. काही आई-वडील अशा बालकांना पूर्णवेळ साधना करण्यास विरोध करतात आणि त्यांना मायेतील शिक्षण घ्यायला लावून त्यांचे आयुष्य फुकट घालवतात. साधकाला साधनेत विरोध करण्याइतके महापाप दुसरे नाही. हे लक्षात घेऊन अशा आई-वडिलांनी मुलांची साधना चांगली होण्याकडे लक्ष दिले, तर आई-वडिलांचीही साधना होऊन तेही जीवन-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त होतील !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१८.५.२०१८)

दगडाला सकारात्मक दृष्टीकोन देऊन त्याच्यातील भाव अनुभवणारी आणि ६७ टक्के आध्यात्मिक पातळी असणारी कु. प्रार्थना महेश पाठक (वय १० वर्षे) !

‘२०.३.२०२१ या दिवशी मी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील यज्ञकुंड परिसरात दगड उचलायची सेवा करत होते. तेव्हा गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) दगड आणि माझ्यात घडवून आणलेला भावसंवाद येथे दिला आहे.

कु. प्रार्थना महेश पाठक

दगड : मी सर्वांच्या पायांना टोचतो, याचे मला वाईट वाटते.

मी : अरे दगडा, तू कशाला वाईट वाटून घेतोस ? तू तर विष्णुस्वरूप गुरुमाऊलीच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) छत्रछायेखाली आला आहेस. तू वाईट वाटून घेऊ नकोस.

दगड : माझा उपयोग तरी काय ?

मी : हे बघ, दगडांपासूनच माती होते. मातीतच पीक उगवते आणि सर्वांना अन्नधान्ये मिळते. त्यापासून आम्ही स्वयंपाक बनवतो आणि खातो. त्यामुळेच आम्ही जगतो. हो कि नाही ?

दगड : हो. बरोबर आहे. माझे मोठे महत्त्व आहे; पण ते गुरुदेवांच्या कृपेनेच !

मी : तुझा भाव किती छान आहे ? मला शिकायला मिळाले.’

– गुरुदेवांचे आनंदी फूल,

कु. प्रार्थना महेश पाठक (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय १० वर्षे), पुणे (१२.६.२०२१)

गुरुदेवा, सत्वर घ्या या प्रार्थनेला तुमच्या चरणा ।

मला परम पूज्य गुरुदेवांची (परात्पर गुरु डॉ. आठवले यांची) पुष्कळ आठवण येत होती. तेव्हा माझे मन त्यांच्या दर्शनासाठी व्याकुळ झाले होते. तेव्हा त्यांनीच मला ही कविता सुचवली.

गुरुदेवा, मन कुठे धावते मला कळेना ।
तुमच्याविण आता मला काही स्मरेना ।। १ ।।

कधी होईन मी मुक्ता (टीप १), कधी होईन मी जना (टीप २) ।
सत्वर घ्या या प्रार्थनेला तुमच्या चरणा ।। २ ।।

रोमारोमात या नाम तुमचेच वसू दे ।
लोचन उघडता मला तुम्हीच दिसू दे ।। ३ ।।

साजिरे, सुंदर रूप तुमचे ।
माझ्या मनरूपी शिंपल्यात साठवून घेऊ दे ।। ४ ।।

जसा तळमळतो मासा पाण्याविन ।
तशी हो माझी स्थिती तुमच्या दर्शनावीण ।। ५ ।।

तुमच्याविण आता मला नको काही ।
तुम्हीच माझे कृष्ण, तुम्हीच माझी विठाई ।। ६ ।।

टीप १ – संत मुक्ताबाई
टीप २ – संत जनाबाई

– गुरुदेवांचे आनंदी फूल,

कु. प्रार्थना महेश पाठक (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय १० वर्षे), पुणे (१२.६.२०२१)