श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी साधकांना केलेल्या मार्गदर्शनातील वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

१. नवीत घरात गेल्यावर वास्तूशांती किंवा यज्ञ-याग करण्याचे महत्त्व

‘कोणी रहात असलेल्या वास्तूमध्ये नवीन कोणी रहावयास गेल्यावर त्या वास्तूमध्ये पूर्वी रहात असलेल्या लोकांचे पूर्वज सूक्ष्मातून तेथेच असतात. आसक्तीमुळे पूर्वज ती वास्तू सोडत नाहीत. यासाठी तेथे वास्तूशांती किंवा यज्ञ-याग केल्याने वास्तूतील त्रास दूर होण्यास साहाय्य होते.

२. स्वतःचा आणि अन्य साधकाचाही साधनेचा वेळ वाचण्यासाठी साधकाला त्याची चूक लगेच सांगावी !

देव पारदर्शक आहे. तसे आपल्यालाही व्हायचे आहे. आपल्याला एखाद्या साधकाची चूक लक्षात आली, तर त्याच क्षणी सांगून त्याला साहाय्य करावे. सत्संग होण्यासाठी वाट पाहून वेळ वाया घालवू नये. त्यामुळे स्वतःसमवेत दुसर्‍या साधकाचाही साधनेचा वेळ वाया जातो.

३. ईश्वरी संकल्पाने हिंदु राष्ट्र येणारच आहे. साधकांसाठी मुख्य ध्येय हे हिंदु राष्ट्राच्या सेवेमध्ये साधनेच्या माध्यमातून स्वतःचे योगदान देऊन ईश्वरप्राप्ती करून घेणे हे आहे.

४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दिलेली शिकवण आणि त्यांनी सांगितलेली साधना यांमुळे साधकांच्या जीवनाचे खरे सार्थक होत आहे अन् ते जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्तही होत आहेत !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘आपल्याला काय शिकायचे ?’, हेही शिकवले आहे. आज बाहेर असे अनेक संप्रदाय आहेत, जिथे दिशाहीन साधना चालू आहे. आपण त्याला साधनाही म्हणू शकत नाही. त्यामुळे अशा संप्रदायांत अडकलेल्या अनेकांच्या जीवनातील महत्त्वाचा वेळ वाया जात आहे. सनातनच्या साधकांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारखे गुरु लाभल्यामुळे त्यांच्याकडून साधक जी साधना शिकत आहेत, त्यामुळे साधकांच्या जीवनाचे खरे सार्थक होत आहे आणि ते जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्तही होत आहेत.

५. संपूर्ण पृथ्वी हाच आपला आश्रम !

आपल्यासाठी रामनाथी येथील सनातन संस्थेच्या आश्रमाची वास्तू म्हणजे ‘आपला आश्रम’, असे न राहता ‘संपूर्ण पृथ्वी हाच आपला आश्रम’, असे झाले आहे.

६. परात्पर गुरु डॉ. आठवले हे महर्षींनी सांगितल्याप्रमाणे अवतारी महापुरुष असले, तरी ते स्वतः क्रियमाण कर्माचा पूर्ण वापर करतात.

७. प्राणशक्ती अतिशय अल्प असतांनाही परात्पर गुरु डॉ. आठवले शिकण्याच्या स्थितीत असणे

वर्ष २००७ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांची प्राणशक्ती अतिशय अल्प झाली होती. त्या बिकट अवस्थेतही ते स्वतःचे प्रत्येक काम स्वत: करत होते आणि आजही करतात. याविषयी त्यांना विचारले असता ते म्हणाले, ‘‘या अवस्थेतही मी कशी आणि कितपत शारीरिक क्रिया अन् हालचाल करू शकतो, याचा मी अभ्यास करत आहे.’’

८. निर्गुण सेवेपेक्षा सगुण सेवेतून अहंलय जलद गतीने होणे

निर्गुण सेवेपेक्षा सगुण सेवा अधिक कठीण आहे. निर्गुण सेवेमध्ये सगळे सूक्ष्म असते. सूक्ष्मामध्ये एखादी चूक झाली, तर कोणी ओरडणारे नसते; परंतु सगुण सेवेमध्ये प्रत्यक्ष कृती करावी लागते. त्या वेळी सर्व तुम्हाला पहात असतात. ‘कसे वागायचे आणि कसे बोलायचे ?’, हे सर्व पहावे लागते अन् प्रसंगी कठोर शब्दांत जाणीव करून दिली, तर ते स्वीकारण्याची सिद्धता असावी लागते. अहंलय करण्यासाठी प्रयत्न करतांना स्थुलातील कृतींना अधिक महत्त्व आहे. एखाद्या चुकीसाठी आपण मानस क्षमायाचना लगेच करू शकतो; परंतु तेच समष्टीमध्ये कान पकडून सर्वांसमोर सांगितले, तर अहंलय जलद गतीने होण्यास साहाय्य होते.

९. अध्यात्म म्हणजे मन स्थिर करण्याचा अभ्यास !

प्रसंग आणि परिस्थिती कशीही असली, तरी ‘वर्तमानकाळात आपले मन स्थिर आहे ना ?’, याची देव परीक्षा घेतो. अध्यात्म म्हणजे मन स्थिर करण्याचा अभ्यास !

१०. अहंच्या अडथळ्यांमुळे साधकांतील नकारात्मकता अल्प न होणे

काही साधकांची नकारात्मकता जात नाही; कारण त्यांना अहंचा अडथळा असतो. आश्रमात एखादी निर्जीव वस्तू आणली, तरी त्या वस्तूमध्येही चांगले पालट जलद गतीने होतात; कारण निर्जीव वस्तूंना अहं नसतो.

११. मनुष्यजन्माचे सार्थक करण्याकरता मृत्यूची सिद्धता करणे आवश्यक

मनुष्यजन्मापेक्षा मृत्यूनंतरचे जीवन फार कठीण आहे. मृत्यूपूर्वी पृथ्वीवर कोणी मार्गदर्शन करणारे तरी असते; पण ‘मृत्यूनंतर कोणी असेल कि नाही ? आपण कुठे असू ?’ इत्यादी काहीच माहीत नसते. त्या जिवाची साधना चांगली असेल, तर मृत्यूनंतर लिंगदेहाला लगेच गती मिळून तो उच्च लोकात जातो; परंतु साधना नसेल, तर तो येथेच भूलोकात घुटमळत रहातो आणि त्यावर अनिष्ट शक्तींचेही आक्रमण होऊ शकते. अनिष्ट शक्ती लिंगदेहाला त्यांच्या कह्यात घेऊ शकतात. त्यासाठी आपल्या मृत्यूची सिद्धता आपल्याला करायला हवी. साधना करून या जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त होणे, हा एकच पर्याय आहे. सध्याची परिस्थिती पहाता ‘आपल्या मृत्यूनंतर आपले कोणी श्राद्ध करील कि नाही ?’, याचीही शाश्वती नसते. श्राद्धामुळे किमान त्या लिंगदेहाला पुढची गती मिळण्यास थोडेफार साहाय्य होते. पुढे आपले श्राद्ध कोणी करो अथवा ना करो, आपण आताच साधना वाढवून आपल्या मृत्यूची अन् मृत्यूनंतरच्या गतीची सिद्धता केलेली बरी !

१२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संकल्पशक्तीनेच कार्य होत असणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांकडून गेल्या अनेक वर्षांत एवढी साधना करवून घेतली आहे की, आता त्यांनी सांगितलेल्या साधनेच्या संकल्पशक्तीने जे चैतन्य निर्माण झाले आहे, ते चैतन्यच आता कार्य करत आहे, आपण केवळ निमित्तमात्र आहोत.’

– श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ, चेन्नई, तमिळनाडू. (३०.१०.२०१९)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सेवेतील चुका सांगून, त्या दुरुस्त करून घेऊन सेवा करणार्‍या साधकांचे कित्येक जन्मांचे प्रारब्ध दूर करणे

एकदा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासाठी सदरा शिवण्याची सेवा होती. त्या वेळी जे साधक ही सेवा करत होते, त्यांना परात्पर गुरु डॉ. आठवले ‘सात्त्विक सदरा कसा शिवायचा ?’, हे सांगत होते. त्या कालावधीत एकच सदरा अनेक वेळा उसवून ते पुन्हा शिवायला सांगत. त्यांनी त्यांचा पहिला सदरा जवळजवळ २५ ते ३० वेळा दुरुस्त करवून घेतला. त्या वेळी ‘सात्त्विक सदरा कसा असायला हवा अन् तो कसा शिवायचा ?’, हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी शिकवलेच; परंतु ‘अशा अनेक वेळा दुरुस्त्या करायला सांगून ती सेवा करणार्‍या साधकांचे किती जन्मांचे प्रारब्ध त्यांनी दूर केले असेल’, हे देवालाच माहीत. यातून ‘गुरु आपला मनोलय अन् अहंलय कसा करून घेतात’, हे शिकायला मिळते.

– श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ, चेन्नई, तमिळनाडू. (३०.१०.२०१९)

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची अमृतवचने !

१. कार्यपद्धतीला प्रेमाची जोड दिली, तरच कार्य साधनेच्या स्तरावर होऊन सर्वांशी जवळीक साधता येते.

२. मन आणि बुद्धी देवाच्या चरणी समर्पित व्हायला हवेत, तरच साधनेत जलद प्रगती होते.

३. शिकण्याची वृत्ती वाढवली, तर अहं न्यून होऊन सत्-चित्-आनंदाकडे लवकर जाता येते.

४. आता आपण जेवढी सेवा करू, तेवढे सेवेतून चैतन्य प्राप्त होते. चैतन्य प्राप्त होणे म्हणजे एक प्रकारे आपल्यावर चैतन्यमय उपाय झाल्यासारखेच आहे; परंतु जेव्हा आपण सेवा करू शकत नाही, तेव्हा मात्र एका जागी स्थिर बसून नामजपादी उपाय करण्यासच प्राधान्य द्यावे.

५. आपल्याला चैतन्याच्या बळावर नेहमी पुढे जाता आले पाहिजे. आपण जसे पुढे जाऊ, तसा भूतकाळ नष्ट होईल आणि भविष्याचीही चिंता रहाणार नाही. चैतन्याच्या अनुसंधानामुळे वर्तमानकाळात राहून प्रत्येक क्षणाचा खरा आनंद घेता येतो.

६. सकारात्मक विचार म्हणजे गुरु आणि नकारात्मक विचार म्हणजे वाईट शक्ती !’

७. भ्रमणभाषचे दुष्परिणाम !
‘आता सर्वांना भ्रमणभाषच्या अनुसंधानाची सवय झाल्याने सर्वांचे देवाशी अनुसंधान सुटले आहे !’

८. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी करायची प्रार्थना !
‘परमपूज्य गुरुमाऊली, आपल्या या धर्मयज्ञामध्ये तुम्ही आम्हा साधकांचा उपयोग समिधेसमान करून घ्या !’

– श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ, चेन्नई, तमिळनाडू. (२०.१२.२०१९)