(म्हणे) ‘भाजप नेत्यांकडून देवस्थानांच्या जागा हडप केल्या जात आहेत !’ – नवाब मलिक, अल्पसंख्यांकमंत्री

‘ईडी’कडे तक्रार प्रविष्ट

राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक हे हिंदूंच्या देवस्थांनाच्या भूमीची काळजी करण्याऐवजी वक्फ बोर्डाकडून होणारे घोटाळे, तसेच मदरसे आणि मशिदी यांत चालू असलेल्या अनाचारांविषयी आवाज का उठवत नाहीत ? ‘स्वतःचे ठेवावे झाकून आणि इतरांचे पहावे वाकून’ या म्हणीनुसार राजकारणापायी देवस्थान भूमींचा प्रश्‍न उपस्थित करणार्‍या मलिक यांचे हिंदुद्वेषी स्वरूप हिंदू जाणून आहेत ! – संपादक

अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक

मुंबई – भाजप नेत्यांकडून देवस्थानांच्या जागा हडप केल्या जात आहेत. धार्मिक स्थळांच्या जागा हडपण्याचे काम या महाराष्ट्रात चालू आहे, असे विधान राज्याचे अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला.

ते म्हणाले, ‘‘जो भाजप पक्ष रामाच्या नावाने राजकारण करतो, त्या भाजपचे नेते प्रभु श्रीरामाच्या देवस्थानाच्या जागा हडप करत आहे. हिंदु देवस्थानांच्या ३०० एकर जागा बळकावण्याचे काम भाजपकडून केले जात आहे. अधिकार्‍यांच्या माध्यमांतून त्यांनी मालकी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी येथे मंदिराच्या जागा खालसा (खासगी म्हणजे मंदिराच्या मालकी हक्कात वर्गीकरण झालेली जागा) करण्याचे काम चालू आहे. या माध्यमातून सहस्रो कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. आम्ही यासंदर्भात ईडीकडे (अंमलबजावणी संचालनालयाकडे) तक्रार केली आहे. ईडी योग्य ती कारवाई करील.’’

मलिक यांनी सांगितले, ‘‘महाराष्ट्रामध्ये वक्फ बोर्डाच्या माध्यमातून आतापर्यंत आम्ही ११ गुन्हे नोंदवले आहेत. काही लोकांनी मशिदीच्या संदर्भातही गुन्हे नोंदवले आहेत.’’