कायदेशीर प्रक्रियेच्या नावाखाली फसवणूक होत असल्याच्या भावनेतूनच बाबरी ढाचा पाडण्यात आला ! – रा.स्व. संघाचे महासचिव अरुण कुमार

डावीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संयुक्त महासचिव अरुण कुमार

नवी देहली – ‘श्रीरामजन्मभूमीवर पुन्हा श्रीराममंदिर बांधण्याच्या संदर्भात कायदेशीर प्रक्रियेच्या नावाखाली हिंदूंची फसवणूक केली जात आहे’, अशी भावना हिंदूंच्या मनात निर्माण झाल्यानेच तेथे असलेला बाबरीचा ढाचा पाडण्यात आला, असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संयुक्त महासचिव अरुण कुमार यांनी येथे केले. ‘सब के राम’ या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

अरुण कुमार पुढे म्हणाले की, श्रीराममंदिराच्या आंदोलनाद्वारे हिंदूंना जागृत करण्यात आले. यातून ‘हिंदू भेकड आहेत आणि जात, भाषा, समाज आदी वादांमुळे ते कधीही संघटित होऊ शकत नाहीत’, हा समज मोडण्यात आला. या आंदोलनामुळे ‘हिंदूंच्या पिढीमध्ये पाश्‍चात्त्यांचे शिक्षण आणि मूल्ये यांमुळे हिंदु धर्माविषयी श्रद्धा अल्प आहे’, हा अपसमजही दूर झाला.