अलवर (राजस्थान) येथील एका सरकारी शाळेत ९ शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्याकडून ४ विद्यार्थिनींवर वर्षभर बलात्कार !

भाऊ मंत्री असल्याचे सांगत मुख्याध्यापकाकडून तक्रार करणार्‍यास ठार मारण्याची धमकी

  • काँग्रेसच्या राज्यात सरकारी शाळेतील मुलीही असुरक्षित ! याविषयी सोनिया गांधी आणि प्रियांका वाड्रा का बोलत नाहीत ? – संपादक
  • भारत नैतिकतेत किती रसातळाला गेला आहे, हे या घटनेतून स्पष्ट होते ! याला जनतेला साधना न शिकवणारे आतापर्यंतचे सर्वपक्षीय शासनकर्तेच उत्तरदायी आहेत ! – संपादक
  • शिक्षकाच्या नावाला कलंक असलेल्या या सर्व आरोपींना जन्माची अद्दल घडेल, अशी शिक्षा सरकारने दिली पाहिजे, असेच सामान्य जनतेला वाटते ! – संपादक

अलवर (राजस्थान) – येथील एका सरकारी शाळेत ९ शिक्षक आणि मुख्याध्यापक यांनी मिळून ४ विद्यार्थिनींवर वर्षभर बलात्कार केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. इयत्ता १० वीत शिकणार्‍या पीडितेने याविषयी प्रथम तक्रार केल्यावर सर्व आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. या पीडितांनी २ महिला शिक्षकांवर या कृत्याचा व्हिडिओ काढल्याचा आरोपही केला आहे. या प्रकरणी ३ वेगवेगळे गुन्हे नोंद करण्यात आले असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. पोलीस अन्वेषणाच्या वेळी तिसरी, चौथी आणि सहावी या इयत्तांमध्ये शिकणार्‍या आणखी ३ पीडित मुली पुढे आल्या आणि त्यांनी मुख्याध्यापक अन् शिक्षक यांनी सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप केला. या घटनेविषयी कुणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकीही आरोपींनी दिल्याचे पीडितांनी सांगितले.

एका पीडितेच्या वडिलांनी सांगितले की, जेव्हा ते या घटनेची तक्रार शिक्षिकेकडे करण्यासाठी शाळेत गेले, तेव्हा मुख्याध्यापकांनी ‘माझा भाऊ मंत्री आहे. मी तक्रार केली, तर तो तुला मारून टाकील’, अशा शब्दांत धमकी दिली.