भारत देश कधीही हिरवा होणार नाही, तो भगवाच राहिला पाहिजे ! – विक्रम गोखले, ज्येष्ठ अभिनेते

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले

मुंबई – देशाचा इतिहास बाबरापासून चालू होत असल्याचे छापले जाते, हे दुर्दैव आहे. बाबराच्या पूर्वी कुणी नव्हते का ? किती वर्षे हे कारस्थान चालू आहे ? हा देश कधीही हिरवा होणार नाही. हा देश भगवाच राहिला पाहिजे, असे वक्तव्य ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी केले. विक्रम गोखले यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ‘ब्राह्मण महासंघा’कडून त्यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

अभिनेत्री कंगना राणावत यांच्या ‘देश वर्ष २०१४ मध्ये स्वतंत्र झाला’, या विधानाविषयी विक्रम गोखले म्हणाले, ‘‘मी कंगना हिच्या वक्तव्याचे समर्थन करतो. देशाला कुणाच्याही साहाय्याने स्वातंत्र्य मिळालेले नाही, ते भिकेनेच मिळालेले आहे. आपले स्वातंत्र्यवीर जेव्हा फाशी जात होते, तेव्हा अनेक जण बघत राहिले, त्यांना कुणीही वाचवले नाही. सध्या राजकीय परिस्थिती गंभीर झाली आहे. ब्राह्मण समाजावर टीकेची झोड उठवणे, मराठा आणि ब्राह्मण यांच्यामध्ये मतभेद निर्माण करणे, हे काय चालले आहे ? देशासाठी झटणार्‍या मुसलमानांमध्ये मी भेदाभेद करत नाही. जे ७० वर्षांत झाले नाही, ते मोदी यांनी केले. पक्षाचे काम सर्व जण करतात; पण मोदी देशासाठी चांगले काम करत आहेत. मी कोणत्याही राजकीय पक्षाशी बांधील नाही, नव्हतो आणि नसेन; पण भाजप अन् शिवसेना  पुन्हा एकत्र आल्यास चांगले होईल.’’