विविध त्रासांवर नामजपादी उपाय अचूक शोधून ते केल्याने त्रास दूर होणे आणि यावरून लक्षात येणारे उपायांचे महत्त्व

‘नामजपादी उपाय केल्याने साधकांचे त्रास कसे दूर होतात’, याविषयीची नवीन लेखमाला

sadguru_mukul_gadgil_
सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ

‘मनुष्याच्या जीवनात येणार्‍या ८० टक्के समस्या या आध्यात्मिक कारणांमुळे आलेल्या असतात. त्यामुळे अशा समस्या सुटण्यासाठी साधना करण्याची आवश्यकता असते. साधनेच्याच जोडीला समस्यांच्या त्या त्या प्रसंगांच्या वेळी त्या त्या समस्येवर नामजपादी आध्यात्मिक उपाय शोधून ते करण्याचीही आवश्यकता असते. सध्या धर्माचरणाचा र्‍हास झाल्याने आलेल्या आपत्काळामध्ये वाईट शक्तींचा प्रकोप झाला आहे. त्यामुळे त्यांनी सत्कार्यामध्ये विघ्ने आणून त्रास देण्याचे प्रमाण पुष्कळ वाढले आहे. ईश्वरी राज्याच्या स्थापनेसाठी समाजाभिमुख सत्कार्य करणार्‍या, म्हणजे समष्टी साधना करणार्‍या सनातनच्या साधकांना सध्या अशा त्रासांची प्रचीती वारंवार येत आहे. त्यामुळे कोणतेही सत्कार्य निर्विघ्नपणे होण्यासाठी आधीच नामजपादी उपाय शोधून ते करावे लागत आहेत. तसेच आध्यात्मिक उन्नतीसाठी प्रतिदिन करत असलेल्या व्यष्टी साधनेमध्येही साधकांना वाईट शक्ती वारंवार त्रास देत आहेत. त्यासाठीही साधकांना नामजपादी उपाय शोधून ते करावे लागत आहेत.

एखादा आध्यात्मिक त्रास दूर होण्यासाठी विशिष्ट देवतेचा नामजप शोधणे, मुद्रा शोधणे आणि त्या मुद्रेने न्यास करण्याचे शरिरावरील स्थान शोधणे म्हणजे नामजपाच्या संदर्भातील उपाय शोधणे होय. हा सूक्ष्मातील भाग असल्याने तो आपली पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील आहे. सूक्ष्मातील जाणण्यासाठी सूक्ष्मातील पंचज्ञानेंद्रिये कार्यरत असण्याची आवश्यकता असते. ती साधनेने कार्यरत होतात. वाईट शक्ती सूक्ष्मातील असल्याने त्या करीत असलेले आक्रमण ओळखणे, त्यांच्या आक्रमणाची पद्धत ओळखणे आणि आक्रमणाचा परिणाम ओळखणे, हे सूक्ष्मातून जाणून आपण नामजपादी उपाय शोधू शकतो. नामजपादी उपायांद्वारे आपण वाईट शक्तींच्या आक्रमणांवर मात करू शकतो आणि आपल्याला होणारे त्रास दूर करू शकतो. तसेच सूक्ष्मातील जाणून भविष्यात होऊ शकणारी वाईट शक्तींची आक्रमणेही टाळू शकतो.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे लाभलेले मार्गदर्शन आणि कृपा यांमुळे मी साधकांना होत असलेल्या आणि त्यांच्या सेवेत येत असलेल्या आध्यात्मिक त्रासांवर नामजपादी उपाय शोधण्याची अन् ते काही प्रसंगी करण्याची सेवा गेली काही वर्षे करत आहे. तसेच साधकांच्या वस्तू, रहाण्याच्या वास्तू, देवतांची चित्रे इत्यादींवर होत असलेल्या वाईट शक्तींच्या आक्रमणांवरही नामजपादी उपाय करू शकत आहे. वाईट शक्तींच्या त्रासांवर उपाय करणे म्हणजे त्यांच्याशी एक प्रकारे लढणेच असते. पाचव्या, सहाव्या पाताळांतील वाईट शक्तींची शक्ती पुष्कळ असल्याने त्यांच्याशी लढणे, म्हणजे आपल्या जिवावर बेतण्याएवढे धोकादायक असते, तरीही गुरूंचे संरक्षककवच आणि देवाची कृपा यांमुळेच मी ही सेवा करू शकत आहे. या सेवेतील माझे विविध अनुभव, मला शिकायला मिळालेली सूत्रे, मी उपाय केलेल्या साधकांच्या अनुभूती इत्यादी लिखाण या लेखमालेत देत आहे. ‘हे लिखाण वाचून साधना, नामजपादी उपाय आणि गुरुकृपा यांचे जीवनातील महत्त्व सर्वांच्या मनावर बिंबो’, ही श्री गुरुचरणी प्रार्थना करतो.’

– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, पीएच्.डी., महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (३१.८.२०२१)

ऑनलाईन नवम अखिल भारतीय हिंदु-राष्ट्र अधिवेशनाच्या कालावधीत सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले आणि अडचणी दूर होण्यासाठी विविध संतांनी केलेले उपाय अन् त्यामुळे झालेला परिणाम

श्री. अरुण कुलकर्णी

‘हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ३०.७.२०२० ते २.८.२०२० आणि ६ ते १०.८.२०२० या कालावधीत ‘नवम अखिल भारतीय हिंदु-राष्ट्र अधिवेशना’चे ऑनलाईन आयोजन करण्यात आले होते. आयोजनाच्या सेवेत विविध स्तरांवर अडथळे येत असल्याचे लक्षात आले. अडथळ्यांमध्ये प्रक्षेपणातील तांत्रिक समस्या, वक्त्यांना जोडण्यात अडचणी येणे, अधिवेशनासाठी आवश्यक असणारी ध्वनीचित्रचकती ‘अपलोड’ न होणे, उपस्थिती अल्प असणे आदींचा समावेश होता. या मागे आध्यात्मिक कारण असल्यास त्याच्या निवारणार्थ सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना नामजपादी उपाय विचारले. त्यांनी सांगितलेले नामजपादी उपाय परिणामकारक असल्याने अधिवेशनात येणार्‍या विविध अडथळ्यांवर मात करता आली. हे नामजपादी उपाय पू. उमेश शेणै, पू. शिवाजी वटकर, पू. गुरुनाथ दाभोेलकर आणि पू. सदाशिव सामंत या सनातनच्या संतांनी केले. ३०.७.२०२० पासून अधिवेशन चालू झाले. त्या दिवशी कोणतेही अडथळे येऊ नयेत; म्हणून २९.७.२०२० या दिवशी नामजपादी उपाय करण्यात आले. त्या संदर्भातील वृत्तांत येथे दिला आहे.

१. २९.७.२०२०

१ अ. त्रास : ‘अधिवेशनाच्या आयोजनात सहभागी असणार्‍या साधकांच्या कपाळ ते हनुवटी या भागात १ इंचाची आवरणाची उभी पट्टी आहे’, असे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितले.

१ आ. उपाय

१ आ १. जप : निर्गुण (हा जप चालू करण्यापूर्वी दोन्ही हातांचे मधले बोट एकमेकांना जोडून बाकीची चारही बोटे सरळ उभी ठेवून डोळे मिटून हात डोक्यापासून पोटापर्यंत ७ – ८ वेळा फिरवत आवरण काढावे. (१ ते ३ क्रमांकाची छायाचित्रे पहावीत.) त्या वेळी ‘निर्गुण’ हा जप करावा.)

‘निर्गुण’ हा जप चालू करण्यापूर्वी शरिरावरील आवरण काढतांना हाताची करावयाची मुद्रा

 

‘निर्गुण’ हा जप चालू करण्यापूर्वी डोक्यापासून आवरण काढण्यास आरंभ करतांनाची स्थिती

 

डोक्यापासून पोटापर्यंतचे आवरण काढतांना होणारी हाताची मुद्रा आणि हातांची दिशा

१ आ २. मुद्रा : आवरण काढून झाल्यावर नामजपादी उपाय करणार्‍या साधकाने त्याचा एक तळहात आज्ञाचक्रासमोर १ – २ सें.मी. अंतरावर आणि दुसरा तळहात तोंडासमोर १ – २ सें.मी. अंतरावर धरावा आणि त्या वेळी ‘निर्गुण’ हा जप करावा. (छायाचित्र क्रमांक ४ पहावे.)

एक तळहात आज्ञाचक्रासमोर आणि दुसरा तळहात तोंडासमोर धरून केलेली मुद्रा

१ आ ३. कालावधी : २ घंटे

– श्री. अरुण कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.८.२०२०)

आताच्या कोरोना महामारी काळात हिंदु जनजागृती समिती अथवा सनातन संस्था यांच्या वतीने प्रत्यक्ष कार्यक्रम घेता येत नसल्याने सर्व कार्यक्रम ‘ऑनलाईन’ माध्यमातून घेतले जातात. या कार्यक्रमात काही वेळा तांत्रिक, संगणक बंद पडणे, इंटरनेटची गती अल्प होणे, अशा अनेक प्रकारच्या अडचणी येत असतात. या अडचणी सोडवण्याचा अनेकविध प्रकारे प्रयत्न केला, तरी त्या अडचण सुटत नाहीत. अशा वेळी या अडचणींच्या मागे आध्यात्मिक कारणेही असू शकतात का ? यासाठी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना नामजपादी उपाय विचारले जातात.

या उपायांच्या अंतर्गत नामजप करतांना वेगवेगळ्या मुद्रा आणि न्यास केले जातात. नामजपादी उपाय केल्याने कोणत्याही प्रकारच्या अडचणी दूर होतात, असे लक्षात आले आहे. यावरून साधनेत येणार्‍या अडचणींवर नामजपादी उपायांचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे लक्षात येते. परात्पर गुरुदेवांच्या कृपेने आम्हा साधकांना नामजपादी उपायांचे महत्त्व शिकायला मिळत आहे, यासाठी कितीही कृतज्ञता व्यक्त केली तरी कमीच आहे.

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.

या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/527151.html