देशात आत्महत्या करणार्‍यांच्या संख्येत १० टक्क्यांची वाढ !

जनतेला धर्मशिक्षण देऊन त्यांना जीवन जगण्याचा उद्देश सांगितला न गेल्याने आणि समाजाला आनंदी जीवन जगण्यासाठी पूरक परिस्थिती निर्माण न केल्यामुळे होणार्‍या या आत्महत्यांना आतापर्यंतचे सर्वपक्षीय शासनकर्तेच उत्तरदायी आहेत, हे लक्षात घ्या ! – संपादक

प्रतिकात्मक छायाचित्र

नवी देहली – राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या ताज्या आकडेवारीनुसार वर्ष २०१९ च्या तुलनेत गेल्या वर्षी आत्महत्यांमध्ये १० टक्के वाढ झाली आहे. वर्ष २०२० मध्ये देशात एकूण १ लाख ५३ सहस्र ५२ जणांनी आत्महत्या केल्या. कौटुंबिक समस्या आणि आजार हे लोकांना टोकाचे पाऊल उचलण्यास भाग पाडणारे प्रमुख घटक ठरले आहेत.

देशातील ५३ शहरांपैकी देहलीमध्ये सर्वाधिक ३ सहस्र २५ जणांनी आत्महत्या केल्या. चेन्नईमध्ये २ सहस्र ४३०, बेंगळुरू येथे २ सहस्र १९६ आणि मुंबईमध्ये १ सहस्र २८२ जणांनी आत्महत्या केल्या. ५३ शहरांमधील एकूण प्रकरणांपैकी ३७.४ टक्के प्रकरणे या ४ शहरांमध्ये आढळून आली. वर्ष २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये चेन्नई शहरात आत्महत्याच्या प्रमाणामध्ये किंचित् घट दिसून आली, तर देहलीत आत्महत्यांच्या प्रमाणामध्ये २४.८ टक्के, बेंगळुरू ५.५ टक्के आणि मुंबईत ४.३ टक्के वाढ झाली.