भारत सरकारने बांगलादेशला समज द्यावी ! – रा.स्व. संघाच्या बैठकीत ठराव

बांगलादेशच्या सरकारने हिंदूंवरील आक्रमण करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी !

हे सरकारला का सांगावे लागते ? सरकारने स्वतःहून आतापर्यंत प्रयत्न करायला हवे होते, असेच हिंदूंना वाटते !

बांगलादेशमध्ये नवरात्रीमधील श्री दुर्जापूजेच्या वेळी हिंदूंवर झालेली आक्रमणे सुनियोजित असून केंद्र सरकारने या शेजारी देशाला समज द्यावी, असा ठराव राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कर्नाटकातील धारवाड येथील ‘अखिल भारतीय कार्यकारी मंडळा’च्या ३ दिवसीय बैठकीत संमत करण्यात आला.

नवी देहली – बांगलादेशमध्ये नवरात्रीमधील श्री दुर्जापूजेच्या वेळी हिंदूंवर झालेली आक्रमणे सुनियोजित असून केंद्र सरकारने या शेजारी देशाला समज द्यावी, असा ठराव राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कर्नाटकातील धारवाड येथील ‘अखिल भारतीय कार्यकारी मंडळा’च्या ३ दिवसीय बैठकीत संमत करण्यात आला. ‘बांगलादेशात अल्पसंख्य समाजावर अत्याचार होत असतांना संयुक्त राष्ट्रांसारखी आंतरराष्ट्रीय संस्था, तसेच मानवी हक्क संघटना कशा गप्प बसू शकतात ?’ असा प्रश्‍नही या वेळी उपस्थित करण्यात आला. या बैठकीला सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे, सर्व सहकार्यवाह, तसेच प्रांतसंघचालक, कार्यवाह प्रचारक, अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य, संघपरिवारातील संघटनांचे सचिव असे एकूण साडेतीनशे कार्यकर्ते उपस्थित आहेत.

१. संघाने या बैठकीविषयी एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्यात म्हटले आहे की, हिंदूंवरील आक्रमणकर्त्यांच्या विरोधात बांगलादेशी सरकारने कठोर कारवाई करावी आणि ही आक्रमणे थांबवावीत. बांगलादेशातील अल्पसंख्याक समाजाला नष्ट करण्याचा हा डाव आहे. त्यासाठी बनावट वृत्तांच्या आधारे धार्मिक तेढ वाढवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे. हा चिंतेचा विषय असून केंद्र सरकारने याविषयी द्विपक्षीय चर्चेच्या सर्व मार्गाचा अवलंब करावा.

२. बैठकीत संमत झालेल्या ठरावाविषयी प्रसारमाध्यमांना माहिती देताना संघाचे संयुक्त सरचिटणीस अरुण कुमार म्हणाले की, या आक्रमणाचा उद्देश बनावट बातम्यांद्वारे धार्मिक संघर्ष निर्माण करणे, हा होता. बांगलादेश सरकारशी संवाद साधण्यासाठी केंद्राने आपले सर्व राजनैतिक मार्ग उघडावेत आणि तेथील सरकारला हिंदू आणि बौद्ध यांच्यावर होणारी आक्रमणे थांबवण्यास सांगावे.