हिंदूंनी यंदाची दिवाळी ‘हलालमुक्त दिवाळी’ म्हणून साजरी करावी ! 

हिंदु जनजागृती समितीचे नाशिक येथे पत्रकार परिषदेत आवाहन !

डावीकडून हिंदु जनजागृती समितीचे श्री. गौरव जमदाडे, बोलतांना श्री. सुनील घनवट आणि श्री. दीपक बैरागी

नाशिक – निधर्मी भारतात ‘धर्माधारित समांतर अर्थव्यवस्था’ निर्माण केली जाणे, हे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय गंभीर असून शासनाने ‘हलाल प्रमाणीकरण’ पद्धत तात्काळ बंद करावी, या मागणीसह हिंदूंनी यंदा दिवाळीच्या काळात ‘हलालमुक्त दिवाळी’ या अभियानात सहभागी होऊन ‘हलाल प्रमाणित’ उत्पादनांवर बहिष्कार घालावा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी केले आहे. ते येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.

या वेळी अखिल भारतीय वैष्णव बैरागी परिषदेचे महाराष्ट्र राज्य सचिव श्री. दीपक बैरागी आणि हिंदु जनजागृती समितीचे नाशिक जिल्हा समन्वयक श्री. गौरव जमदाडे हेही उपस्थित होते. श्री. घनवट पुढे म्हणाले की, ‘हलाल इंडिया’, ‘जमियत उलेमा-ए-हिंद’ सारख्या इस्लामी संस्थांना शुल्क देऊन त्यांच्याकडून ‘हलाल प्रमाणपत्र’ घेणे बंधनकारक केले गेले आहे. निधर्मी भारतात सरकारच्या ‘अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण’ (एफ्.एस्.ए.आय.)कडून प्रमाणपत्र घेतल्यावर हे खासगी इस्लामी प्रमाणपत्र घेण्याची सक्ती का ? ‘हलाल प्रमाणिकरणा’द्वारे मिळणारे कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न शासनाला न मिळता काही इस्लामी संघटनांना मिळत आहे. ‘भारतीय रेल्वे’, ‘पर्यटन महामंडळ’ यांसारख्या सरकारी आस्थापनांतही ‘हलाल प्रमाणित’ पदार्थच दिले जात आहेत. हे असेच चालू राहिले, तर ही भारताची ‘इस्लामीकरणा’कडे वाटचाल होणार आहे. हिंदु जनजागृती समिती आंदोलने, निवेदन देणे, सामाजिक माध्यमे आदी माध्यमांतून जनजागृती करत आहे.

क्षणचित्र : पत्रकार परिषद झाल्यावर काही वार्ताहरांनी श्री. सुनील घनवट यांना भेटून ‘हलाल प्रमाणपत्रा’विषयी अधिक जाणून घेतले.