ठाणे येथील सौ. शुभांगी धैर्यशील लावंड यांना आलेल्या अनुभूती

१. योगासनाच्या वर्गात येणार्‍या २ ख्रिस्ती महिलांनी ‘ॐ’काराचा उच्चार न करणे; परंतु त्यांना ‘ॐ’चे महत्त्व पटवून दिल्यावर त्यांनी तो करणे आणि ‘ॐ’काराच्या उच्चारणाने त्यांचा उच्च रक्तदाबाचा त्रास अल्प होणे

‘मी योगासनाचे वर्ग चालवते. माझ्या योगासनाच्या वर्गात २ ख्रिस्ती महिला येतात. पूर्वी त्यांना अनेकदा सांगूनही त्या ‘ॐ’काराचे उच्चारण आणि प्रार्थना कधीच करायच्या नाहीत. एकदा मी त्यांना ‘ॐ’च्या उच्चारणाचे महत्त्व सांगितले. तेव्हापासून त्या ‘ॐ’काराचा उच्चार करू लागल्या. त्यामुळे आता त्यांना पुष्कळ चांगले वाटते. त्या दोघींनाही उच्च रक्तदाबाचा त्रास होता आणि तो ‘ॐ’काराच्या उच्चारणाने न्यून झाला आहे’, असे त्यांच्या लक्षात आले आहे.

२. नाम, प्रार्थना आणि उपाय यांच्या बळाने स्वतःत पालट केल्यावर मुलातही चांगला पालट जाणवणे

माझा मोठा मुलगा शुभम् याला पुष्कळ त्रास होतो. मी त्याच्यासाठी उपाय करू लागले की, तो पुष्कळ रागवायचा किंवा आरडाओरडा करायचा. त्यामुळे माझीही चिडचिड व्हायची. तेव्हा मी माझ्यातच पालट करायला आरंभ केला. तेव्हापासून ‘तो पुष्कळ शांत होत आहे’, असे मला जाणवू लागले. त्या वेळी ‘नाम, प्रार्थना आणि उपाय यांचे बळ वाढले की, त्याचा चांगला परिणाम होतो’, हे मला शिकायला मिळाले.

हे सर्व गुरुकृपेमुळेच होऊ शकते. त्यासाठी मी कृतज्ञता व्यक्त करते.’ – सौ. शुभांगी धैर्यशील लावंड, कोलशेत, ठाणे  (३१.१.२०२०)

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक