भाग्यनगर (तेलंगाणा) येथील कु. दीपाली गोवेकर (वय ४४ वर्षे) यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी जाणवलेली सूत्रे, आलेल्या अनुभूती आणि त्या वेळी धर्मप्रेमींनी केलेले साहाय्य

२.७.२०२१ या दिवशी सकाळी ९.२० वाजता कु. दीपाली गोवेकर (वय ४४ वर्षे) यांचे भाग्यनगर (तेलंगाणा) येथे निधन झाले. त्या मूळच्या गोवा येथील असून त्या भाग्यनगर (तेलंगाणा) येथे त्यांची आई श्रीमती शैलजा गोवेकर आणि बहीण कु. शिल्पा गोवेकर यांच्या समवेत रहात होत्या. आज १४.७.२०२१ या दिवशी कु. दीपाली यांच्या निधनानंतरचा तेरावा दिवस आहे. त्यानिमित्त ‘त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी जाणवलेली सूत्रे, आलेल्या अनुभूती आणि त्या वेळी धर्मप्रेमींनी केलेले साहाय्य’ पुढे दिले आहे.

कु. दीपाली गोवेकर

१. कु. दीपालीताईंचे आजारपण आणि मृत्यू

१ अ. कु. दीपालीताईंच्या यकृताला सूज येणे, ताप येणे आणि ७ – ८ दिवसांनंतर त्यांचा अकस्मात् मृत्यू होणे : ‘गेल्या ७ – ८ दिवसांपासून कु. दीपालीताईंच्या यकृताला (‘लिव्हर’ला) सूज आली होती, तसेच त्यांना ताप आला होता आणि अशक्तपणाही जाणवत होता. २.७.२०२१ या दिवशी त्यांना रुग्णालयात भरती करण्यात येणार होते; परंतु त्याआधीच घरी असतांना आधुनिक वैद्यांनी ‘कु. दीपाली यांचे निधन झाले आहे’, असे आम्हाला सांगितले.

२. दीपालीताईंच्या मृत्यूनंतर जाणवलेली सूत्रे

२ अ. दीपालीताईंच्या निधनानंतर त्यांच्या घरात दाब न जाणवता पुष्कळ चैतन्य आणि गुरुदेवांचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) अस्तित्व जाणवणे : दीपालीताई आणि त्यांचे कुटुंबीय यांना तीव्र आध्यात्मिक त्रास असल्यामुळे त्यांच्या घरात नेहमी दाब जाणवत असे; परंतु दीपालीताईंच्या निधनानंतर त्यांच्या घरात पुष्कळ चैतन्य जाणवत होते. ‘तिथे कुणाचा मृत्यू झाला आहे’, असे वाटतच नव्हते. त्यांच्या घरी गुरुदेवांचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) अस्तित्व जाणवत होते. तिथे पुष्कळ सकारात्मक वाटत होते.

२ आ. दीपालीताईंच्या तोंडवळ्याकडे पाहिल्यावर ‘त्या शांतपणे झोपल्या आहेत’, असे वाटत होते.

३. अनुभूती

दीपालीताईंवर अंत्यसंस्कार करण्यासाठी घरात कुणी पुरुष नसणे आणि गुरुकृपेने भाग्यनगर येथे असलेल्या ताईंच्या चुलत भावाने अंत्यसंस्कार करण्याची सिद्धता दर्शवून तो करणे : ताईंवर अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांच्या परिवारातील कुणीही पुरुष सदस्य तिथे नव्हते. ते सर्व जण गोव्याला रहातात. आम्ही त्यांच्या परिवारातील सदस्यांना भाग्यनगर येथे येण्याविषयी सांगण्याचा प्रयत्न केला; परंतु कोरोना महामारीमुळे त्यांना भाग्यनगरला येणे शक्य नव्हते. गुरुदेवांच्या कृपेने त्याच वेळी भाग्यनगरमध्ये रहाणारे ताईंचे चुलत भाऊ श्री. अजय गोवेकर तिथे आले. त्यांना अंत्यसंस्कार करण्याविषयी विचारले असता त्यांनी सहजतेने होकार दिला आणि सर्व विधी केले. हे केवळ गुरुदेवांच्या कृपेनेच साध्य झाले.

४. अंत्यसंस्काराच्या वेळी धर्मप्रेमींनी केलेले साहाय्य

४ अ. आम्ही ताईंच्या अंत्यसंस्कारासाठी धर्मप्रेमी आणि साधक यांना बोलावले. गुरुकृपेने धर्मप्रेमी आणि साधक त्वरित आले. दोन धर्मप्रेमींनी आम्हाला ताईंच्या अंत्यविधीसाठी सर्वतोपरी साहाय्य केले.

४ आ. कोरोना महामारीमुळे अंत्यविधीसाठी पुरोहित मिळत नव्हते. हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात असलेल्या पुरोहितांनी अंत्यसंस्कार विधी करणार्‍या पुरोहितांना पाठवून आम्हाला साहाय्य केले.

४ इ. स्मशानभूमीचे मालक असलेल्या धर्मप्रेमींनी अग्निसंस्कार विधीची संपूर्ण व्यवस्था करून साहाय्य करणे : ‘दीपालीताईंचे पार्थिव स्मशानभूमीत नेणे आणि तेथे करायचे अंत्यसंस्कार’ यांसंदर्भात आम्हाला काहीच ठाऊक नव्हते. हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात असलेल्या एका धर्मप्रेमींच्या मालकीच्या भूमीवर स्मशान आहे. त्या धर्मप्रेमींना संपर्क केल्यानंतर गुरुदेवांच्या कृपेने त्यांनी अग्निसंस्कार विधीची सर्व व्यवस्था करून आम्हाला संपूर्ण साहाय्य केले.

५. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दीपालीताईंच्या सेवेच्या तळमळीचे कौतुक करणे

दीपालीताईंना तीव्र आध्यात्मिक त्रास असूनही त्या पुष्कळ तळमळीने सेवा करत असत आणि साधनेचे प्रयत्न करत असत. त्यांच्यामध्ये समष्टी भाव होता. त्यांची समष्टी साधनेची तळमळ एवढी होती की, त्या देवाला प्रार्थना करायच्या, ‘आज माझ्या दुकानात (त्यांचे शिवणकाम करण्यासाठी लागणार्‍या साहित्याचे दुकान होते.) कुणी ग्राहक येऊ नयेत, म्हणजे मी सेवेला लवकर जाऊ शकेन.’ त्या करत असलेली ही प्रार्थना ऐकून गुरुदेव दीपालीताईंचे नेहमी कौतुक करायचे.

६. कृतज्ञता

‘दीपालीताईंच्या सेवेच्या तळमळीमुळेच गुरुतत्त्व त्यांच्यासाठी कार्यरत झाले’, असे आम्हाला वाटले. यातून ‘साधकांवर गुरुदेवांची प्रीती कशी असते !’, हे आम्हाला अनुभवता आले. त्यासाठी गुरुदेवांच्या श्री चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– श्री. चेतन गाडी आणि श्री. आकाश गोयल, आंध्रप्रदेश (३.७.२०२१)

शारीरिक आणि आध्यात्मिक त्रास असूनही झोकून देऊन गुरुसेवा करणार्‍या कै. दीपाली गोवेकर !

१. प्रेमभाव

अ. ‘कु. दीपालीताई साधकांच्या जन्मतिथी लक्षात ठेवून त्यांना प्रेमाने वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असत.

आ. त्यांच्या घरी काही वेगळा पदार्थ बनवला, तर त्या तो पदार्थ सेवाकेंद्रातील साधकांसाठी घेऊन येत असत आणि साधकांना प्रेमाने खाऊ घालत असत.

२. समाजातील लोकांशी जवळीक करणे

ताईंची त्यांच्या संपर्कात येणार्‍या लोकांशी जवळीक होती. त्यामुळे त्यांच्या संपर्कात असणार्‍या व्यक्ती त्यांची आठवण काढून त्यांची विचारपूस करत असत.

३. गुरुसेवेची तळमळ

अ. दीपालीताईंची शारीरिक स्थितीही चांगली नव्हती आणि त्यांना तीव्र आध्यात्मिक त्रास होता. त्यांच्या घरातील स्थितीही साधनेसाठी प्रतिकूल होती, तरीही गुरुसेवेच्या तीव्र तळमळीमुळे त्या ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभेचा प्रसार करणे, तेलगु पंचांग आणि विशेषांक यांच्यासाठी विज्ञापने आणणे, ग्रंथ अन् सात्त्विक उत्पादने यांचा वितरणकक्ष लावणे, अर्पण गोळा करणे, ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे वर्गणीदार करणे’ इत्यादी सेवा तळमळीने करत असत.

आ. ताई सेवेसाठी घरातून बाहेर पडल्यावर तहान-भूक विसरून सेवा करायच्या.

इ. कोरोनामुळे बाहेर जाऊन प्रसार करण्याची सेवा बंद झाल्यावर सामाजिक माध्यमांवर ‘ऑनलाईन’ सत्संग चालू झाले. दीपालीताई तळमळीने ‘ऑनलाईन’ सत्संगांचा प्रसार करण्याची सेवा करायच्या. त्या गजर लावून ‘फेसबूक’मध्ये ‘वॉच पार्टी’ करणे, धर्मप्रेमींना नियमित ‘पोस्ट’ पाठवणे’, अशा सेवा करत असत.

४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रतीचा भाव

प्रसाराची सेवा करतांना अर्पण मिळाल्यावर ‘गुरुदेवांच्या कृपेनेच अर्पण मिळते’, असा त्यांचा भाव असायचा. त्यांच्या वागण्या-बोलण्यात कधी कर्तेपणा जाणवत नसे.

५. कृतज्ञता आणि प्रार्थना

‘दीपालीताईंच्या समवेत सेवा करण्याची संधी देऊन परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मला त्यांच्यातील गुण शिकण्याची संधी दिली’, यासाठी गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता ! ‘दीपालीताईंच्या गुणांमधून जे शिकायला मिळाले, ते मला कृतीत आणता येऊ दे’, अशी मी गुरुचरणी प्रार्थना करतो.’

– श्री. आकाश गोयल, आंध्रप्रदेश (३.७.२०२१)

  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक