धोक्याची घंटा !

आसाम आणि मुसलमान’ हे समीकरण आता काही नवीन राहिलेले नाही. अनेक दशकांपासून त्याची पुनरावृत्ती होतच आहे. कोणे एकेकाळी हिंदूबहुल असणारे आसाम राज्य आता मुसलमानबहुल होण्याच्या मार्गावर आहे. या दृष्टीने तेथील भाजपचे आमदार आणि प्रदेश उपाध्यक्ष जयंत मल्ला बरुआ यांनी नुकतेच केलेले विधान चिंताजनकच आहे. ते म्हणाले, ‘‘मुसलमानांच्या लोकसंख्यावाढीचा सध्याचा दर असाच कायम राहिला, तर वर्ष २०३८ पर्यंत आसाममध्ये हिंदू अल्पसंख्यांक होतील, तर मुसलमान बहुसंख्यांक होतील.’’ ही देशासाठी धोक्याची घंटा आहे. भाजपच्या आमदारांच्या विधानानंतर तरी ‘सरकार जागे होऊन यावर काही करेल’, अशी आशा बाळगता येईल. आता जे आसाममध्ये घडत आहे, त्याविषयी दूरदृष्टी असणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी आधीच हिंदूंना सतर्क केले होते. काही दशकांपूर्वी त्यांनी एका पत्रकाद्वारे आसाममधील हिंदूंना उद्देशून म्हटले, ‘‘तुम्ही मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्यापासून सावध रहा. आसामी हिंदूंवरील भावी संकट म्हणजे आसामला मुसलमान करण्याचा डाव ! भारतातील हिंदु समाजाचे लक्ष मी या भयानक अरिष्टाकडे वेधू इच्छितो. आसामला मुसलमान बहुसंख्यांक प्रांत करून तेथील हिंदूंचे जिणे अशक्य करून सोडण्याच्या कारवाया सध्या चालू आहेत. अनेक वर्षांपासून बंगाल आणि अन्य प्रांत येथील मुसलमानांना आसाममध्ये आणून त्यांची वस्ती करून मुसलमानांची संख्या वाढवण्याचा पद्धतशीर प्रयत्न चालू आहे.’’ सावरकर यांनी निक्षून सांगितलेल्या विधानांना आज अनेक वर्षे उलटली. सद्यःस्थिती पहाता त्यांची ही विधाने सत्यात उतरत आहेत. सावरकर यांच्यातील देशभक्ती आणि राष्ट्रप्रेम यांमुळे त्यांना तेव्हाच या धोक्याच्या संकटाची जाणीव झाली होती; परंतु तत्कालीन सरकारने सावरकर यांच्या विधानांवर कृती करणे तर दूरच, उलट त्याचा विचारही केला नाही, तसेच त्यांच्यासारख्या थोर राष्ट्रभक्ताला जातीयवादी ठरवून विरोधच केला. त्यांचे विधान कसे चुकीचे आहे, असेही ठरवण्यात आले. केवळ आसाममध्येच नाही, तर भारतात सर्वत्रच मुसलमानांचा अनुनय करण्यात आला. त्यामुळे मुसलमानांच्या हाती आयते कोलीत मिळाल्यासारखेच झाले. याचा परिणाम काही दशकांनंतर दिसू लागला. वर्ष १९७१ मध्ये आसाममध्ये दोनच जिल्हे मुसलमानबहुल होते; मात्र वर्ष २०११ मध्ये त्यांची संख्या ११ इतकी झाली होती. वर्ष १९९१-२००१ या काळात तेथील हिंदूंची लोकसंख्या १४.९ टक्क्यांनी, तर मुसलमानांची संख्या २९.३ टक्क्यांनी वाढली. ‘अशा प्रकारे दुपटीने वाढणारी मुसलमानांची संख्या पहाता आसाम राज्य भारतापासून वेगळे तर होणार नाही ना ?’, अशी भीती तेथील उरल्यासुरल्या हिंदूंना आता वाटत आहे. तशीच काहीशी स्थिती आज निर्माण झाली आहे. ‘आसाम आज मुसलमानबहुल होण्याच्या उंबरठ्यावरच आहे’, असे म्हणता येईल.

(प्रतिकात्मक छायाचित्र)

निधर्मीवादाचा परिणाम !

आसाममधील सद्यःस्थिती म्हणजे निधर्मीवादाद्वारे हिंदु धर्म संपवण्याचे रचलेले षड्यंत्रच आहे. वर्ष २०१६ मध्ये स्वातंत्र्यदिनी आसामची राजधानी असणार्‍या गुवाहाटीमध्ये यमन अली नावाचा एक तरुण दुचाकीवरून पाकिस्तानचा ध्वज मिरवत जात होता. त्याला अटक केल्यावर त्याने त्याच्या वडिलांनीही पाकिस्तानचा झेंडा मिरवल्याचे सांगितले. स्वातंत्र्यदिन भारताचा आणि ध्वज फडकावला जातो पाकचा, हे चिंताजनक आहे. वर्ष २०१६ पासून २०२१ पर्यंतच्या स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी तेथे काय काय घडले असेल, याचा विचारही आपण करू शकणार नाही, इतकी तेथील स्थिती बिघडलेली आहे. यातूनच हिंदूंची सुरक्षितता आणि स्वातंत्र्य यांसाठी धोका निर्माण होत आहे. आतापर्यंतच्या मुसलमानधार्जिण्या आणि ढोंगी राज्यकर्त्यांच्या धोरणांचाच हा परिणाम आहे. हे असेच चालू राहिले, तर आसाममध्ये ‘इस्लामी राष्ट्र’ स्थापन होऊ शकते. हिंदूंसाठी ‘हिंदु राष्ट्र’च हवे ! सरकारकडून धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली मुसलमानांना दिल्या जाणार्‍या कोट्यवधी रुपयांच्या योजना, अनुदान, तसेच विविध सुविधा पहाता देशाची वाटचाल हिंदु राष्ट्राकडे न होता निधर्मीवादाकडे होतांना दिसते. त्याचा परिणाम म्हणून हिंदूंविषयी द्वेष निर्माण करून त्यांना जातीयवादी ठरवले जात आहे. मुसलमान, ख्रिस्ती आणि साम्यवादी एकत्र येत आहेत. आसाममध्ये आतंकवादी संघटनांचे जाळेही मोठ्या प्रमाणात निर्माण झाले आहे. तेथील मतदार अधिकतर मुसलमानच आहेत. ‘आसाम हातातून घालवायचाच नाही’, असा ठाम निश्‍चय आताच्या सरकारने करायला हवा. स्वतःच्याच पक्षाच्या आमदाराच्या जे लक्षात आले आहे, त्याविषयी विचारविनिमय करून आणि कठोर उपाययोजना राबवून आसाम पुन्हा हिंदूबहुल होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यासाठी तेथे होणारी वाढती घुसखोरी प्रथम रोखायला हवी. मुसलमान आज भारतातील आसाम हे एक राज्य कह्यात घेऊ पहात आहेत. अशा घुसखोरांना तेथील भूमी अजिबात दिली जाऊ नये, यासाठी कठोर कायदेही करायला हवेत. त्यांचे आतापर्यंत अती लाड केल्याचाच परिणाम संपूर्ण भारताला भोगावा लागत आहे. इतकी वर्षे जोपासलेल्या निधर्मीवादाचीच ही कडवट फळे आहेत. आसामसाठी डोकेदुखी ठरणारी ही समस्या म्हणजे एकप्रकारे राष्ट्रासाठीची मोठी लढाईच आहे. त्यासाठी कठोर राजकीय इच्छाशक्ती असणे आवश्यक आहे. घुसखोर किंवा मुसलमान यांच्याविषयी नरमाईचे धोरण राबवले जाऊ नये. त्यांना हाकलल्यासच भारतीय सुरक्षा बळकट राहू शकते, याचे गांभीर्य सरकारने लक्षात घेऊन कृतीशील व्हावे. आज आसाम जात्यात आहे; पण भारतातील अनेक राज्ये किंवा जिल्हे सुपात आहेत, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सद्यःस्थितीत आसामचे मुसलमानबहुल होणे, हे संकट पुष्कळ मोठे आहे. हिंदूंनी त्याच्याशी प्रखर हिंदुत्वाच्या साहाय्यानेच टक्कर द्यायला हवी. तसे झाल्यासच हिंदूंचा, पर्यायाने राष्ट्राचा विजय होऊ शकतो आणि आसामही मुसलमानबहुल होण्यापासून वाचू शकतो.