९५ ते ९७ टक्के लोकांना रुग्णालयात जाण्याची वेळ आली नाही, यामागे केवळ आयुर्वेद आणि योग ! – योगऋषी रामदेवबाबा

नवी देहली – ‘ज्या लोकांच्या शरिरातील ऑक्सिजन पातळी ७० टक्क्यांवर गेली होती, ते लोकही योग आणि घरगुती उपचार यांनी बरे झाले आहेत. ९० टक्के लोकांना रुग्णालयात जाण्याची आवश्यकता भासली नाही’, असे एम्स रुग्णालयाचे संचालक डॉ. गुलेरिया म्हणाले. मी म्हणतो की, ‘९५ ते ९८ टक्के लोकांवर रुग्णालयात जाण्याची वेळ आली नाही. हे सगळे केवळ आयुर्वेद आणि योग यांमुळे घडले’, असा दावा योगऋषी रामदेवबाबा यांनी दैनिक ‘भास्कर’ला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.

केंद्र सरकारच्या औषधांमध्ये कोरोनीलचा समावेश का नाही ? हा सरकारच्या धोरणांचा दोष !

यावरून योगऋषी रामदेवबाबा यांना विचारण्यात आले, ‘‘केंद्र सरकारने कोरोना औषधांच्या किटमध्ये ‘कोरोनील’चा समावेश का केला नाही?’’ त्यावर रामदेवबाबा म्हणाले, ‘‘हा आमचा दोष नाही, तो सरकारच्या धोरणांचा दोष आहे. तुम्ही हे आमच्यावर का लादता ? तुम्ही देशातील कोणत्याही शहरात जाऊन बघा. १०० पैकी ९० रुग्ण योग, प्राणायाम आणि आयुर्वेदाचे उपचार पद्धतीने बरे झाले आहेत. मग असे कसे म्हणता की, अ‍ॅलोपॅथी उपचारपद्धती आणि डॉक्टरांनीच लोकांचे जीव वाचवले ? अनेक डॉक्टरांनी स्वतःचे प्राण गमावून रुग्णांचे जीव वाचवले. त्यांचे आभारच ! अशा संकटाच्या काळात त्यांना साहाय्य करायलाच हवे ना, नाहीतर वैद्यकीय विज्ञानाला काय अर्थ राहील ?’

रामदेवबाबा पुढे म्हणाले की, मी हे मान्य करतो की, माझ्या बोलण्यावर डॉक्टरांचा आक्षेप का आहे ? कारण त्यांचा व्यवसाय याच्याशी संबंधित आहे; मात्र ते त्यांच्या शक्तीच्या बळावर आयुर्वेद अण्णि योग यांचे सत्य लपवू शकत नाहीत. अत्यावश्यक प्रसंगी उपचार करण्यासंदर्भात अ‍ॅलोपॅथीने वैद्यकीय क्षेत्रात प्रचंड काम केले आहे; मात्र रहाणीमानामुळे निर्माण होत असलेल्या आजारांवर त्यांच्याकडे कोणताही उपाय नाही.