भीषण आपत्काळामध्ये आरोग्यरक्षणासाठी औषधी वनस्पतींची लागवड करा !

आपत्काळातील संजीवनी : औषधी वनस्पती !

संत-महात्मे यांच्या सांगण्यानुसार भीषण आपत्काळ चालू आहे.या काळात डॉक्टर, वैद्य, पेठेतील (बाजारातील) औषधे इत्यादी उपलब्ध होणार नाहीत. आपत्काळात स्वतःसह कुटुंबियांच्याही आरोग्याचे रक्षण करणे, हे मोठे आव्हानच असते. अशा वेळी आपण लागवड केलेल्या औषधी वनस्पतीच उपयोगी पडतील; म्हणून आतापासूनच आपण त्यांच्या लागवडीकडे लक्ष द्यायला हवे. या लेखामध्ये औषधी वनस्पतींच्या लागवडीची आवश्यकता, त्यांच्या लागवडीमुळे होणारे लाभ, तसेच अत्यल्प श्रमात लावता येण्याजोग्या आणि चालू शेतीत आंतरपीक म्हणून लावता येण्याजोग्या औषधी वनस्पती, यांविषयीची माहिती या लेखमालेद्वारे देत आहोत.

ग्रंथाचे मुखपृष्ठ

औषधी वनस्पतींची लागवड करा !

परात्पर गुरु डॉ. आठवले

अ. ‘आपल्या पूर्वपुण्याईने आपण भारतात रहातो. विदेशातील साधकांना शक्य नसले, तरी आपल्याला दैवी औषधी वृक्षांची लागवड करणे सहज शक्य आहे.

आ. पुढे येणार्‍या आपत्काळात आपल्याला औषधे मिळणे अशक्य होईल. तेव्हा आपल्याला या दैवी वृक्षांचाच आधार असेल.

इ. दैवी वनस्पतींना ‘झाडपाला’ म्हणून हिणवणार्‍यांना पुढे दैवी वनस्पतींनाच शरण जावे लागेल.

ई. एखाद्या देवतेची आपण उपासना करतो, त्या भावाने दैवी वृक्षांची उपासना, म्हणजे जोपासना करा ! तुमच्यातील भावाने वृक्षांतील दैवी तत्त्वाचे प्रमाण वाढायला साहाय्य होईल.

उ. वृक्ष वाढायला वेळ लागतो, हे लक्षात घेऊन साधकांनी आताच अधिक प्रमाणात लागवड करावी, म्हणजे आपण शहरांतील अन् ज्यांच्याकडे लागवडीसाठी जागा नाही, अशा साधकांना पुढे साहाय्य करू शकू.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

(सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचे औषधी वनस्पतींच्या लागवडीच्या आवश्यकतेविषयीचे वर्ष २००६ मधील वरील लेखन त्यांचे द्रष्टेपण सिद्ध करते. – संकलक)  

१.  औषधी वनस्पतींच्या लागवडीची आवश्यकता

१ अ. औषधी वनस्पतींचे संवर्धन ही साधनाच असणे : आयुर्वेद हा ‘पाचवा वेद’ आहे; परंतु भारतातच या शास्त्राच्या झालेल्या उपेक्षेमुळे आज यातील एक महत्त्वाचा घटक असलेल्या औषधी वनस्पती दुर्मिळ होत चालल्या आहेत. त्यांच्या संवर्धनासाठी त्यांची लागवड करणे, ही साधनाच आहे.

१ आ. भीषण आपत्काळात औैषधी वनस्पती सहज उपलब्ध होण्यासाठी आतापासूनच त्यांची लागवड करणे आवश्यक असणे : भीषण आपत्काळामध्ये आरोग्यरक्षणासाठी आपल्याला अ‍ॅलोपॅथीतील औषधांचा नव्हे, तर आयुर्वेदीय औषधी वनस्पतींचा आधार असणार आहे. ‘तहान लागल्यावर विहीर खोदायची नसते !’, अशा आशयाची एक म्हण आहे. भीषण आपत्काळात अल्पमोली अन् बहुगुणी असलेल्या विविध आयुर्वेदीय औैषधी वनस्पती सहज उपलब्ध होण्यासाठी आतापासूनच त्यांची लागवड घराभोवती, परिसरात किंवा शेतात करणे आवश्यक आहे.

१ इ. औषधी वनस्पतींना नामशेष होण्यापासून वाचवणे निकडीचे असणे : जगभरात औषधी वनस्पतींना असलेली वाढती मागणी, त्यांची होणारी तस्करी, तसेच आधुनिकीकरणाच्या नावाखाली होणारी अनिर्बंध वृक्षतोड यांमुळे अनेक औषधी वनस्पती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. अशा वनस्पतींचे संवर्धन करण्यासाठी त्यांची लागवड करणे निकडीचे बनले आहे.

१ ई. ‘औषधी वनस्पतींची लागवड’ हा आयुर्वेदाला मुख्य उपचारपद्धत बनवण्यासाठीचा एक प्रयत्न असणे : भावी हिंदु राष्ट्रात आयुर्वेद हीच मुख्य उपचारपद्धत असणार आहे. आयुर्वेदाला मुख्य उपचारपद्धत बनवण्यासाठी प्रत्येकानेच प्रयत्न करणे आवश्यक आहे. औषधी वनस्पतींची लागवड हा त्याचाच एक टप्पा आहे.

२.  औषधी वनस्पतींच्या लागवडीचे आनुषंगिक लाभ

अ. ‘वनौषधींच्या लागवडीमुळे वृक्षसंख्या किंवा वृक्षसमूह वाढतो. या झाडांच्या पाल्यापाचोळ्यापासून भूमीतील सेंद्रिय घटकांचे प्रमाणे वाढते. त्यामुळे भूमीची सुपीकता वाढून निकृष्ट भूमीही सुधारते.

आ. वृक्षांमुळे वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण वाढून वातावरणात थंडावा निर्माण होतो. यामुळे पावसाचे प्रमाण वाढते आणि भूमीतील ओलावा टिकून रहाण्यास साहाय्य होते.

इ. औषधी वनस्पतींच्या लागवडीमुळे भूमीची होणारी धूप थांबून पावसाचे पाणी भूमीत मुरते. यामुळे भूगर्भातील पाण्याचा साठा वाढण्यास साहाय्य होते.

ई. शेताजवळ केलेल्या मोठ्या औषधी वृक्षांच्या लागवडीमुळे वार्‍याची गती न्यून होऊन घोंघावणार्‍या वार्‍यापासून इतर शेतीपिकांचे संरक्षण होते.

उ. वृक्षांचे प्रमाण वाढल्याने वायू, तसेच ध्वनी प्रदूषण न्यून होते.

ऊ. औषधी वृक्षांच्या लागवडीमुळे निसर्गाचे संतुलन सुधारते.

ए. पशुविकास कार्यक्रमात सकस चारा मिळण्यासाठी, तसेच दुग्ध व्यवसायाच्या भरभराटीसाठी वृक्षांच्या पानांचा उपयोग करून चार्‍याची मागणी पूर्ण करता येते.

ऐ. औषधी वृक्षांच्या लागवडीमुळे भरपूर प्रमाणात लाकूड आणि कोळशाच्या स्वरूपात इंधन उपलब्ध होऊन ग्रामीण भागातील सरपणाची समस्या सुटू शकते.

ओ. अवर्षण काळात पावसाअभावी अथवा इतर प्रतिकूल परिस्थितीमुळे नेहमीची पिके जरी येऊ शकली नाहीत, तरी अशा वेळी बहुपयोगी औषधी वृक्षांपासून निश्‍चित स्वरूपाचे उत्पन्न मिळू शकते.

औ. गावातील मोकळ्या-पडीक भूमी, शेताचे बांध आदी औषधी वृक्षांनी भरल्यानंतर गाव समृद्ध आणि संपन्न वाटते. त्यासह तेथील अन्नसाखळ्या सुदृढ होतात. मधमाश्या, पक्षी, फुलपाखरे, सूक्ष्म जीव आदी वाढल्याने गावातील पिकांचे उत्पादनही वाढते.’

(साभार : सनातनचा ग्रंथ ‘जागेच्या उपलब्धतेनुसार औषधी वनस्पतींची लागवड’ )

आपत्काळाच्या दृष्टीने वनौषधींच्या लागवडीचे महत्त्व दर्शवणारी ही लेखमाला साधक आणि वाचक यांनी संग्रही ठेवावी.

सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी SanatanShop.com

संपर्क : ९३२२३ १५३१७