कोरोना : जनतेच्या ससेहोलपटीला कारणीभूत कोण ?

कोरोनाबाधित यजमानांना रुग्णालयात भरती केल्यावर आलेले कटू अनुभव

‘अशा आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी भगवंताचे भक्त बना आणि साधना वाढवा. अन्य कुणीही नाही, तर भगवंतच वाचवील !’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

माझे यजमान भिकाजी जाधव यांचा २३.३.२०२१ या दिवशी कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. आम्ही सकाळी १० वाजता एका रुग्णालयात गेलो होतो; मात्र त्यांना सायंकाळी ५ वाजेपर्यंत बेड मिळाला नव्हता. ५ नंतर त्यांना रुग्णालयात भरती करून घेण्यात आले. तोपर्यंत दिवसभर बाहेर ऑक्सिजन लावून बसवले होते. प्रतिदिन सकाळी ८ वाजता रुग्णालयातून आम्हाला यजमानांच्या प्रकृतीविषयी कळवण्यात येत असे. २ दिवसांनी त्यांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा होत असल्याचेही कळवण्यात आले. ८ दिवसांनी त्यांनी आम्हाला ३ लाख १४ सहस्र रुपये देयक भरण्यास सांगितले; पण आमच्याकडे इतके पैसे नसल्याने आम्ही त्याविषयी त्यांना सांगितले. आम्ही आमच्या ओळखीच्या एका गृहस्थांना याविषयी सांगितल्यावर त्यांनी प्रयत्न करून आम्हाला पैसे कमी करून दिले. आम्ही एकूण ३५ सहस्र रुपये भरले; पण ६ एप्रिल या दिवशी सकाळी ७.३० वाजता यजमानांचे निधन झाले. तरीही रुग्णालयाने आम्हाला १ लाख रुपये जमा करण्याविषयी सांगितले. पैसे द्यायचे राहिले असल्याने संध्याकाळपर्यंत यजमानांचा मृतदेह आमच्याकडे दिलाच नाही. २५ सहस्र रुपये जमा केल्यावर त्यांनी मृतदेह आम्हाला सोपवला.

– श्रीमती सुनिता जाधव, जागमाता, ठाणे

‘या लेखात छापण्यात आलेले अनुभव वैयक्तिक आहेत. असे अनुभव प्रत्येकाचे असतीलच, असे नाही. तसेच यामध्ये अफवा पसरवण्याचा हेतू नाही. जनतेसमोर हे अनुभव ठेवण्यामागे ते प्रशासनापर्यंत पोचून त्यावर कार्यवाही व्हावी, हा उद्देश आहे. याचसमवेत लेखात उल्लेख केलेली रुग्णालये आणि आधुनिक वैद्य यांची नावे छापण्यामागे कुणाची मानहानी करण्याचा उद्देश नाही, तर आरोग्य व्यवस्थेत सुधारणा व्हावी अन् जनतेला दिलासा मिळावा, हा उद्देश आहे.’ – संपादक