हमीरपूर (उत्तरप्रदेश) येथे यमुना नदीमध्ये सापडले अनेक मृतदेह !

कोरोनामुळे मृत झालेल्यांचे मृतदेह नदीत प्रवाहित करण्यात आल्याची शंका

प्रशासनाने जनतेमध्ये कोरोना मृतदेहांविषयी जागृती न केल्याचा हा परिणाम आहे ! अशामुळे नदी प्रदूषित होऊन कोरोनाच्या संसर्गात अधिक वाढ होऊ शकते. यामुळे आता शासनाने हे रोखण्यासाठी कठोर पाऊल उचलणे आवश्यक !

हमीरपूर (उत्तरप्रदेश) – हमीरपूर जिल्ह्यातून वहाणार्‍या यमुना नदीमध्ये अनेक मृतदेह सापडले आहेत. येथील कानपूर-सागर मार्गावरील पुलावरून जाणार्‍या लोकांना हे मृतदेह नदीत दिसल्यावर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. यातील एक मृतदेह अर्धवट जळलेल्या स्थितीत होता. पोलिसांनी केलेल्या चौकशीनंतर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचे हे मृतदेह असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याऐवजी त्यांना नदीत सोडण्यात आले. कानपूर आणि हमीरपूर येथे हे मृतदेह नदीत सोडण्यात आले आहेत.

यमुना नदीला कानपूर आणि हमीरपूर जिल्ह्यांतील नागरिक ‘मोक्षदायिनी कालिंदी’ हिच्या रूपात मानतात. त्यामुळे येथे मृत्यू झाल्यावर अग्नीसंस्कार करण्याऐवजी मृतदेह नदीमध्ये प्रवाहित केले जातात. ही जुनी परंपरा आहे. येथे नेहमीच नदीत शव दिसून येत असतात; मात्र कोरोनाच्या काळात मोठ्या प्रमाणात शव दिसल्याने ते कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचे असल्याचे म्हटले जात आहे.