राजकारणविरहित काम केल्यासच देश वाचेल, अन्यथा देशामध्ये फक्त मुडद्यांचे राज्य राहील ! – संजय राऊत, खासदार, शिवसेना

मुंबई – कोरोनामुळे आज अनेक राज्यांची परिस्थिती हातबाहेर गेली आहे. महाराष्ट्र लढत आहे, झगडत आहे आणि संघर्ष करत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अनेक योजना आखल्या जात आहेत. महाराष्ट्राला हव्या तितक्या प्रमाणात लसींचा पुरवठा होत नाही. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे निवेदन ऐका, मग वेदना कळेल. कोरोना ही राष्ट्रीय आपत्ती असल्याने सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय स्तरावर एक समिती नियुक्त केली पाहिजे. केंद्राकडून याचे नियंत्रण होणे आवश्यक आहे. राजकारणविरहित काम केल्यासच देश वाचेल, अन्यथा देशामध्ये फक्त मुडद्यांचे राज्य राहील, अशी चेतावणी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिली. ते १ मे या दिवशी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.

ते पुढे म्हणाले, ‘‘महाराष्ट्राची जनता दोन वर्षांपासून संकटात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लढाई चालू आहे. यातून आपण नक्की आपण बाहेर पडू. पुढील महाराष्ट्र दिन आपण नेहमीच्या उत्साहात साजरा करू, अशा शुभेच्छा देतो.’’