चीन सैन्याकडून तिबेटमध्ये नवीन कमांडरची गुपचूप नियुक्ती

भारताच्या विरोधात पुन्हा आक्रमक कृती करण्याची शक्यता !

चीन विश्वासघातकी असल्याने त्याच्या प्रत्येक कृतीवर लक्ष ठेवून भारताने सतर्क रहाणेच योग्य आहे ! चीनने कुरापत केली, तर त्याला जशास तसे उत्तर देण्याची सिद्धता भारताने केली पाहिजे !

बीजिंग (चीन) – भारत कोरोनाच्या वाढत्या संकटाचा सामना करत असतांना चीनने तिबेटमध्ये गुपचूप नवीन कमांडर नियुक्त केला आहे. चीनच्या पश्चिम थिएटर कमांडच्या अंतर्गत येणार्या तिबेटमधील या कमांडरचे नाव लेफ्टनंट जनरल वांग काई आहे. काई हे पूर्वी चीनच्या सैन्यातील क्रूर समजल्या जाणाऱ्या ‘एलीट १३’व्या ग्रूप आर्मीचे कमांडर होते. या एलीट ग्रूपला ‘टायगर्स इन द माउंटेंस’ नावाने ओळखले जाते. हा ग्रूप पर्वतांवरील युद्धामध्ये पारंगत आहे. यामुळे ‘काई यांच्या या नव्या नियुक्तीमागे चीन पुन्हा एकदा भारताचा विश्वासघात करण्याच्या विचारात आहे का ?’ असा प्रश्न उपस्थित होत आहे.

१. चीन अद्यापही लडाखमधील सीमेवरील तणाव न्यून करण्याच्या विचारात नाही, असे चित्र आहे. चीनसमवेत सैन्यस्तरावर भारताच्या अनेक चर्चांच्या फेऱ्या होऊनही चीन सीमेवर तैनात सैनिकांना माघारी बोलवण्यास सिद्ध नाही. त्यात ‘कमांडर वांग काई यांच्या नियुक्तीमुळे यामागे काही षड्यंत्र आहे का ?’ असा प्रश्न उपस्थित होत आहे.

२. चीनच्या सैन्याचे माजी प्रशिक्षक सॉन्ग झोंगपिंग यांनी सांगितले की, तिबेटचा विषय अजूनही चिंतेचा आहे. यामुळेच वांग काई यांना असणाऱ्या अनुभवामुळे त्यांना येथे तैनात करण्यात आले आहे.