नगर येथे ३० एप्रिलपर्यंत दशक्रिया विधी न करण्याचा पुरोहित संघटनेचा निर्णय !

नगर, १२ एप्रिल – अंत्यविधी आणि दशक्रियाविधी यांना होणार्‍या गर्दीमुळे अमरधाम येथे दशक्रिया विधी करणारे अनेक पुरोहित कोरोनाबाधित झाले आहेत. प्रतिदिन कोरोनाचा वाढत असलेला संसर्ग, होणारे मृत्यू आणि पुरोहितांची सुरक्षितता यांचा विचार करून नगरमध्ये होणारे सर्व दशक्रिया विधी ३० एप्रिलपर्यंत न करण्याचा निर्णय पुरोहित संघटनेने घेतला आहे, अशी माहिती जिल्हा पुरोहित मंडळाचे अध्यक्ष किशोर जोशी यांनी दिली. नागरिक मृत झालेला व्यक्ती कोरोनाबाधित असल्याची माहिती पुरोहितांना देत नाहीत. तसेच त्यांचे नातेवाईक, मुले, विधी करणारे यजमान हे कोरोनाबाधित असल्याची माहिती लपवत आहेत. गर्दीतच विधी करण्यासाठी पुरोहितांवर दबाव आणला जातो. त्यामुळे पुरोहितांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.