३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेच्या चौकशीसाठी विधीमंडळ समिती घोषित

वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखालील समिती स्थापन

४ मासांत अहवाल देणार!

मुंबई – राज्यात ३३ कोटी वृक्ष लागवडीच्या विशेष मोहिमेची चौकशी करण्यासाठी १६ आमदारांच्या विधीमंडळ समितीची घोषणा वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी १० मार्च या दिवशी विधानसभेत केली. सदर समिती येत्या ४ मासांच्या आत वृक्ष लागवड मोहिमेची चौकशी करून सभागृहाला अहवाल सादर करेल, असेही भरणे यांनी स्पष्ट केले.

वर्ष २०१४ ते २०१९ या कालावधीत तत्कालीन फडणवीस सरकारने ३३ कोटी वृक्ष लागवडीची मोहीम राबवली होती. त्यावर किती व्यय झाला आणि यातील किती झाडांचे संगोपन झाले ? यासंदर्भात शिवसेनेचे भांडूपचे आमदार रमेश कोरगावकर यांनी मागील आठवड्यात विधानसभेत तारांकित प्रश्‍न उपस्थित केला होता. या मोहिमेच्या अंतर्गत वन विभागाने २८ कोटी वृक्षांची लागवड केली. त्यातील सध्या ७५ टक्के रोपे जिवंत असून २५ टक्के रोपे नष्ट झाल्याचे सरकारने विधीमंडळात मान्य केले होते. राज्यातील अनेक भागांतील वृक्ष नष्ट झाले असून जी झाडे आहेत, त्याची व्यवस्थित देखभाल आणि संगोपन होत नसल्याचे सूत्र उपस्थित करण्यात आले.

वृक्ष लागवड मोहिमेवर २ सहस्र ५०० कोटी रुपये व्यय करूनही झाडे जळत असतील, तर त्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी विधानसभेत आमदारांनी केली होती. त्यावर मंत्री भरणे यांनी विधीमंडळाच्या समितीच्या वतीने वृक्ष लागवड मोहिमेची चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा केली होती. ४ किंवा ६ मासांत याचा अहवाल सभागृहाला सादर केला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहाला दिली होती. त्यानुसार आता केवळ ८ दिवसांत मंत्री भरणे यांनी विधीमंडळ सदस्यांची समिती स्थापन करून वरील घोषणा केली.