रत्नागिरीत पुन्हा सापडले गोमांस : पोलिसांनी धाड टाकून केली एकाला अटक

गोमांस, डिपफ्रिजर आणि दुचाकीसह सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

गोमांसासह लियाकत शौकत दावत या आरोपीला अटक

रत्नागिरी – तालुक्यातील फणसवळे येथे गोवंशियांचे अवशेष सापडल्यानंतर हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी धार्मिक भावना दुखावल्या म्हणून पोलीस ठाण्यात धडक देत जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांना संबंधितांच्या विरोधात कारवाई करण्याविषयी निवेदन दिले होते. याच वेळी जिल्हा पोलीस अधीक्षक बगाटे यांनी गोवंशियांची तस्करी रोखण्याचे आश्वासन दिले. याचाच एक भाग म्हणून रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लांजेकरनगर, उद्यमनगर येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने धाड टाकून ५१ किलोपेक्षा अधिक गोमांसासह लियाकत शौकत दावत या आरोपीला अटक केली आहे. या कारवाईत एका दुचाकीसह अनुमाने १ लाख ६ सहस्र ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

२६ जून २०२६ या दिवशी दुपारी ४:५५ वाजण्याच्या सुमारास लांजेकरनगर येथे आरोपी लियाकत दावत हा विनापरवाना गोवंश प्राण्यांच्या मांसाची वाहतूक करत असल्याची आणि स्वतःच्या लाभासाठी ते विक्रीकरता बाळगून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हवालदार गणेश राजेंद्र सावंत यांनी या प्रकरणी फिर्याद दिली.

पोलिसांनी केलेल्या कारवाईत ५१ किलो ५०० ग्रॅम गोमांस (किंमत १६,४८०)

आणि दुचाकी वाहन (होन्डाची ग्रे रंगाची ॲक्टिव्हा दुचाकी (किंमत ७० सहस्र रुपये.)

आणि मांस साठवण्यासाठी वापरण्यात आलेला डिपफ्रिजर (किंमत २०,००० रुपये.)

आरोपीविरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता (BNS) २०२३ चे कलम ३२५, तसेच महाराष्ट्र पशुसंरक्षण (सुधारणा) अधिनियम २०१५ चे कलम ५ (ब), ५ (क), ९ (अ) आणि मोटार वाहन कायदा कलम ६६(१), १९२ (अ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका

  • पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे रत्नागिरी जिल्ह्यात गोवंशियांची हत्या करणारे एक मोठे जाळेच सक्रीय आहे, यावर शिक्कामोर्तब होते. अशा घटना वारंवार उघड होत असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
  • पोलिसांनी आता केवळ वरवरची चौकशी न करता या अवैध कृत्यांमागील मुख्य सूत्रधारांची पाळेमुळेच नष्ट करण्यासाठी कडक पावले उचलणे अपेक्षित आहे !