Karnataka Minister Priyank Kharge : (म्हणे) ‘जगभरातील तंत्रज्ञान क्षेत्र वेगाने पुढे जात असतांना सरकार ‘आयआयटी’ संस्थांना ज्योतिष, पुनर्जन्म आदींचे संशोधन करण्यास जुंपत आहे !’

कर्नाटकाचे गृहमंत्री प्रियांक खर्गे यांची केंद्रशासनावर टीका

कर्नाटकाचे गृहमंत्री प्रियांक खर्गे

बेंगळुरू (कर्नाटक) – जगभरातील तंत्रज्ञान क्षेत्र ‘क्वांटम कॉम्प्युटिंग’, कृत्रिम बुद्धिमत्ता, अत्याधुनिक ‘सेमीकंडक्टर’ आणि ‘डीप-टेक’, या दिशेने वेगाने पुढे जात आहे. तथापि भारताच्या अभिमानास्पद प्रमुख आयआयटी शैक्षणिक संस्थानांना पुनर्जन्म, ज्योतिषशास्त्र आणि गो-विज्ञान यांसारख्या विषयांवर संशोधन करण्यास सरकार जुंपत आहे, अशी टीका कर्नाटकाचे गृहमंत्री प्रियांक खर्गे यांनी केली.

ते पुढे म्हणाले की,

मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने ‘काऊ-पॅथी’ (गो आधारित उत्पादनांचे विज्ञान) संशोधनासाठी ९८ कोटी रुपये देण्याचे निश्चित केले आहेत. देशातील प्रतिष्ठित आयआयटी संस्थानांमध्ये विज्ञानाच्या नावाखाली पुराण शिकवले जात आहे. हे चिंताजनक आहे. आपला इतिहास, परंपरा किंवा प्राचीन ज्ञान प्रणालींचा अभ्यास करण्यात काहीच चुकीचे नाही; परंतु अशा छद्म विज्ञानाला किंवा अंधश्रद्धेला अधिकृतपणे संस्थात्मक केले जाणे, ही खरी समस्या आहे. (भारतातील प्राचीन ज्ञान प्रणालींना निराधारपणे अंधश्रद्धा संबोधणे, ही अंधश्रद्धा नव्हे का ? या ज्ञानप्रणाली छद्म विज्ञान असल्याचे म्हणणे, याला कोणता वैज्ञानिक आधार आहे ? – संपादक) प्रतिष्ठित आयआयटीच्या आत गुपचूप शिरत असलेल्या अशा प्रवृत्ती देशाची वैज्ञानिक प्रगती रोखणार्‍या आहेत.

संपादकीय भूमिका

हिंदु धर्मातील प्राचीन ज्ञानाचे वैज्ञानिक स्तरावर अध्ययन होत असेल, तर ते स्वागतार्ह आहे. भारतातील हीच आयआयटी संस्थाने सेमीकंडक्टर सारख्या अनेक क्षेत्रांत प्रगत संशोधनही करत आहेत; परंतु हिंदुद्वेषाची काविळ झालेले खर्गे आणि त्यांचा काँग्रेस पक्ष यांना हिंदु शास्त्रे बुरसटलेलीच वाटणार, यात काय नवल ?