परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या वर्षांनुसार साधकांचे त्रास न्यून न होण्याची आध्यात्मिक कारणे आणि त्यांचा परिणाम

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या वर्षांनुसार तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांचा त्रास न्यून न होण्याची कु. मधुरा भोसले यांना ज्ञानातून मिळालेली आध्यात्मिक स्तराची कारणे आणि त्यांचा परिणाम

अनेक आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांच्या मनात दीर्घ काळापासून आपल्याविषयी पुढील शंका आहे, आपण वर्ष २००४ पासून साधकांना सांगत आहात की, वर्ष २०१२ नंतर साधकांना होत असलेला आध्यात्मिक त्रास न्यून होईल. प्रत्यक्षात आध्यात्मिक त्रासात वाढ झाली. वर्ष २०१२ मध्ये तुम्ही साधकांना सांगितले की, वर्ष २०१४ नंतर आध्यात्मिक त्रास न्यून होईल. प्रत्यक्षात तसे झाले नाही. असे वर्ष २०१६ च्या संदर्भातही घडले. आता वर्ष २०१८ नंतर त्रास न्यून होणार असल्याचे आपण सांगत आहात. या पालटत्या उत्तरांमुळे आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांच्या मनाचा संभ्रम होतो. – श्री. राम होनप

परात्पर गुरु डॉ. आठवले

१. साधकांना होणारे वाईट शक्तींचे त्रास, त्यांचे व्यष्टी आणि समष्टी स्तरांवरील प्रारब्धाचे भोग अन् ईश्‍वरी राज्याची स्थापना लवकरात लवकर करणे, या तिन्ही घटकांचा समतोल राखण्यासाठी देवाने परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या कालावधीत त्रास न संपवता उशिरा संपवणे

साधकांना वाईट शक्तींचा त्रास भोगून संपवण्यासह शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक स्तरांवरील प्रारब्धही भोगून संपवायचे असते. देवाने केवळ साधकांचे त्रास भोगण्याला प्राधान्य दिले असते, तर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या कालावधीत साधकांना होणारे वाईट शक्तींचे त्रास भोगून संपले असते; परंतु त्यांचे व्यष्टी आणि समष्टी स्तरांवरील प्रारब्धाचे भोग भोगून संपवणे शेष राहिले असते. त्यामुळे ईश्‍वरी राज्याची स्थापना पुष्कळ उशीरा, म्हणजे किमान ५० वर्षांनंतर झाली असती. साधकांना होणारे वाईट शक्तींचे त्रास, त्यांचे व्यष्टी आणि समष्टी स्तरांवरील प्रारब्धाचे भोग अन् ईश्‍वरी राज्याची स्थापना लवकरात लवकर व्हावी, या तिन्ही घटकांचा समतोल राखण्यासाठी ईश्‍वर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या कालावधीत त्रास न संपवता थोडा उशीरा संपवणार आहे. त्यामुळे ईश्‍वरी राज्याची स्थापना ५० वर्षांनी न होता लवकर होणार आहे.

कु. मधुरा भोसले

१ अ. भगवंताने साधकांच्या त्रासांची विभागणी करून त्यांचे वेळापत्रक बनवून त्यांचे त्रास सुसह्य करणे : साधकांना एकाच वेळी शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक त्रास सोसणे शक्य नव्हते. त्यामुळे देवाने प्रथम आध्यात्मिक त्रास आणि नंतर शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक त्रास भोगण्याचे वेळापत्रक बनवून त्रासाची विभागणी करून साधकांचे त्रास सुसह्य केले. देवाच्या कृपेने साधकांना अल्प कालावधीत तीव्र त्रास भोगावे न लागता त्यांच्या कुवतीप्रमाणे त्रास भोगता आले. त्यामुळे त्रास भोगण्याचा कालावधी वाढत गेला.

१ आ. साधकांची मर्यादित क्षमता लक्षात घेता देवाने साधकांना प्रथम व्यष्टी प्रारब्ध आणि नंतर समष्टी प्रारब्ध भोगण्यास देणे : प्रारंभी साधकांचे व्यष्टी प्रारब्ध अधिक असल्यामुळे त्रासांची तीव्रता अधिक होती. वर्ष २०१२ नंतर कालांतराने व्यष्टी प्रारब्ध संपून समष्टी प्रारब्ध भोगण्यास आरंभ झाल्यामुळे साधकांच्या व्यष्टी त्रासात घट झाली; परंतु समष्टी प्रारब्धाची तीव्रता अधिक असल्यामुळे त्यांना वाईट शक्तींचा त्रास न्यून झाला नाही, असा भास निर्माण झाला. साधकांच्या देहाला मर्यादा असल्यामुळे ते एकाच वेळी व्यष्टी आणि समष्टी स्तरांवरील प्रारब्धाचे भोग भोगून संपवू शकत नव्हते. त्यामुळे देवाने साधकांना प्रथम व्यष्टी प्रारब्ध आणि नंतर समष्टी प्रारब्ध भोगण्यास दिले. त्यामुळे एकूण प्रारब्ध भोगण्याचा कालावधी वाढत गेला.

१ इ. त्रास भोगत असतांना साधनेचे प्रयत्न चालू रहावेत, यासाठी भगवंताने त्रासांची तीव्रता अल्प करण्यासाठी त्रास भोगण्याचा कालावधी वाढवणे : वाईट शक्तींच्या तीव्र त्रासामुळे साधकांच्या साधनेत खंड पडला असता. साधकांनी तीव्र त्रास भोगण्यासह साधनेचे प्रयत्न करावेत, यासाठी भगवंताने त्रासाची प्रत्यक्ष तीव्रता अल्प न करता त्रास भोगण्याचा कालावधी वाढवला. त्यामुळे त्रासाची तीव्रता अप्रत्यक्षरित्या अल्प झाली. त्यामुळे तीव्र त्रास भोगत असतांनाही साधकांकडून साधनेचे प्रयत्न झाले. ते भगवंताच्या अनुसंधानात राहिले आणि त्यांना आंतरिक आनंद अनुभवण्यास मिळाला.

३. कृतज्ञता

साधकांना होणारे वाईट शक्तींचे त्रास लक्षात घेता त्यांची तीव्रता इतकी होती की, कुणीही साधक जिवंत राहू शकला नसता. केवळ भगवंताची कृपा आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांची साधकांवरील प्रीती यांच्यामुळे साधक तीव्र त्रासातही जिवंत राहू शकले. देवाच्याच कृपेने साधकांना त्रासाशी लढून त्यांवर मात करून साधनेचे प्रयत्न करण्यासाठी शक्ती आणि स्फूर्ती मिळत आहे. यासाठी साधकांनी देवाच्या चरणी आणि परात्पर गुरुमाऊलीच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करायला हवी.

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान) सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.२.२०१८, रात्री १०.४०)

• आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
• वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक